‘परतावा’ हा शब्द प्रत्येकाला परिचित आहे. एक ठराविक रक्कम ठराविक मुदतीत भरल्यानंतर ठराविक दिवसांनी आपल्याला काही रक्कम नियमित मिळत जाते किंवा एकदम मिळते. रक्कम जितकी जास्त तितका परतावा अधिक.
आजकाल नव्हे बऱ्याच दिवसांपासून नात्यातही अशाच परताव्याची अपेक्षा ठेवली जाते, ती पूर्ण झाली तर ठीक, नाही झाली तर मग नातेसंबंध तर बिघडतातच पण नात्यांचे मानसिक स्वास्थ्य देखील बिघडते आणि नाती घुसमटतात. माझी वर्तमानपत्रातील एका कविता वाचून एका माऊलीचा फोन आला. पुण्याच्या आसपासच्या एका गावातील होती. प्रथम तिने कविता आवडल्याचे सांगितले मग तिची समस्या सांगितली,
“माझा मुलगा बघा मुंबईला नोकरी करतो, अगोदर सारखा फोन करायचा पण तिकडे त्याने मनाने आंतरजातीय लग्न केलेय, आता फोन तुटक होऊ लागलेत, मी फोन केला तर जास्त बोलत नाही. माझ्या दुसऱ्या मुलाला पण नोकरी लावतो म्हणाला पण आता तेही नाही म्हणतोय. (थोडक्यात लग्न झाल्यापासून तो बदललाय) मी तुम्हाला त्याचा नंबर देते. तुम्ही त्याला फोन करून समजवाल का? तिने मला तिच्या मुलाचा फोन नंबर दिला आणि सांगितले मी तुम्हाला उद्या फोन करते, काय म्हणतोय ते मला सांगा’.
मी बरं म्हणले. क्षणभर वाटले, करावा का फोन? पण दुसऱ्या क्षणी वाटले, आपली ना त्या माऊलीशी ओळख ना तिच्या मुलाशी मग आपण कसे काय त्याला फोन करून काही समजावू शकतो? आणि त्याने आपला अपमान केला तर? बरं त्यांच्या घरगुती समस्या काय आहेत आपल्याला काय माहिती? आणि अशा त्रयस्थ माणसाला काही बोलण्याचा, समजवण्याचा आपल्याला काय अधिकार? मी काही त्याला फोन केला नाही. दुसऱ्या दिवशी त्या माऊलीचा परत फोन आला, “केला का हो ताई फोन? मी त्या माऊलीची समजूत काढली, हे बघा ताई तुमचा मुलगा पत्रकार आहे, त्याला असा कितीसा पगार असणार? बरं मुंबईसारख्या शहरात तो राहतोय म्हणल्यावर त्याचा खर्च अधिक असणार शिवाय नुकतेच लग्न झालेय म्हणल्यावर त्याचेही काही प्रॉब्लेम असू शकतात. तुम्ही फोन केल्यावर त्याला विचारले का? तू कसा आहेस? तुझी बायको कशी आहे? याव्यतिरिक्त कधी मायेने चौकशी केली का? तुम्ही फोनवर जर सतत तुमच्या मुलाला नोकरी कधी लावणार? पैसे कधी पाठवणार? असे विचारत असला तर वैतागणारच ना तो? त्यालाही तुमच्या प्रेमाची गरज आहे.
रहाता राहिला तुमच्या मुलाला नोकरी लावण्याचा प्रश्न! एकतर तुमचा मुलगा अजून शिकतोय आणि कुणाला वशिल्याने नोकरी लावायचे दिवस संपलेत ताई. त्याचे त्याने भविष्यात काय करायचे ते ठरवू देत आणि एक सांगू ताई? आपली मुले आपणास जन्माला घाला म्हणत नसतात. आपणच ती हौसेने जन्माला घालतो, प्रेमाने पालन पोषण करतो, त्यांना चांगले शिक्षण देतो व त्यांच्या सुखी जीवनासाठी धडपडतो. हे आपलं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. आपल्या म्हातारपणी त्यानेही आपली काळजी घ्यावी, विचारपूस करावी हे त्याचेही नैतिक कर्तव्य असते. पण तरीही आपण उठसूट त्याला आपण त्याच्यासाठी केलेल्या गोष्टींचा पाढा वाचत असू तर मुलांना निश्चित राग येणार आणि वाईटही वाटणार. त्यापेक्षा त्याच्याकडून कोणतीच मागणी न करता त्याची मायेने चौकशी करा, बघा तुमचा मुलगा स्वतःहून परत फोन करेल आणि तुमच्याशी चांगला बोलेल देखील.
माझं म्हणणं त्या माऊलीला कितपत पटले? माहीत नाही. तिने फोन ठेवला. पुढे काय झाले मला माहीत नाही मात्र माझे कोडे मात्र सुटले. मी तिच्या मुलाला फोन केला असता तर तिच्या मुलाने कदाचित खरी परिस्थिती सांगितली असती, त्याची बाजूही सांगितली असती किंवा कदाचित तुम्ही मला विचारणाऱ्या कोण म्हणून अपमानही केला असता, पण कोणाच्या नात्यातली, घरची परिस्थिती मला काहीच माहिती नसताना अनोळखी व्यक्तीला जाब विचारण्याचा किंवा खासगी गोष्टीत नाक खुपसण्याचा मला अधिकारच काय?
मी आसपास अशी कित्येक उदाहरणे पाहतेय. आई वडील सतत मुलाची तक्रार करत असतात. मान्य आहे मातापित्यांचे आपण वृद्धापकाळी आधार व्हावे, त्यांची काळजी घेतलीच पाहिजे पण त्यांनीही ज्येष्ठ म्हणून सतत अधिकारच गाजवला पाहिजे का? बऱ्याचदा हेच चित्र दिसते. छोट्या छोट्या गोष्टीत मानापमान पहाणे, प्रत्येक गोष्टीत आम्हाला विचारलेच पाहिजे हा टोकाचा हट्ट करणे, उठसूठ नको तितके न विचारता सल्ले देणे, रुसून बसणे खरेच शोभते का? परत पाढा वाचायचा, “आम्ही त्याच्यासाठी अमुक केलं, तमुक केलं’. मग मुलांना आपण जन्म एवढ्याचसाठी देतो का? त्याने परतफेड करण्यासाठीच? त्यांच्यासाठी केलं ते आपलं कर्तव्य नसते का? मुले मोठी झाली की त्यांना जरुरीपुरते स्वातंत्र्य द्यायला हवेच. आपण योग्य ते संस्कार आणि आवश्यक तितकीच मार्गदर्शकाची भूमिका वठवायची असते. खरेतर आजकाल प्रत्येकाचं जीवन धावपळीचे, ताणतणावाचे झालेय. प्रत्येकाला मायेचा ओलावा हवा असतो आणि आईवडिलांकडे मुले त्याच आशेने पाहतात पण क्वचितच आई वडील आपल्या मुलांचा आधार होतात. मुले म्हातारी झाली तरी त्यांच्यावर माया करतात.
आपला मुलगा बाप झालाय म्हणल्यानंतर त्यालाही त्याच्या मुलांची, कुटुंबाची जबाबदारी असते, बऱ्याचदा मुलांची आर्थिक दमछाक होते अशा वेळेस थोडेसे दुर्लक्ष झाले तर आपण समजून घेतले पाहिजे त्यांना. उलट त्याने त्याच्या मुलाला काही आणले हौस मौज केली तर आईवडील लगेच बरोबरी करतात.
बऱ्याचदा आईवडिलांनी त्यांचे जीवन छान एन्जॉय केलेले असते तरीही मुलाच्या जीवनात ते सतत कटकटी करत राहतात. यामुळं नात्यात तणाव निर्माण होत जाऊन ती तुटतात. यासाठी आपले आर्थिक स्वावलंबन तर हवेच पण हात पाय चालतात तोपर्यंत घरातील छोटी मोठी कामे करत राहिले तर आपलाही वेळ जातो आणि मग हातपाय थकल्यावर आपण भार नाही होणार. याशिवाय आपली मुले मोठी करत असताना आपल्या आर्थिक कुवतीनुसार आपणही आपली हौस मौज करून घ्यावी, जीवनाची मजा घ्यावी म्हणजे उतारवय शांत समाधानाने जगता येईल. आज सर्वच परिस्थिती अस्थिर होत आहे, सतत बदल होत आहेत, महागाई वाढत आहे, जगण्याचे संदर्भ बदलत आहेत. अशावेळी आपण आपल्या मुलांचा देखील जरूर विचार करायला हवा. आपल्या आवडीच्या छंदात मन रमवून आनंदी रहायला शिकायला हवे. (म्हणजे रात्रंदिवस टीव्ही पहाणे नव्हे) आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून रहाता कामा नये.
वानप्रस्थाश्रम म्हणजे वनात जाणे नसून घरातच प्रत्येक गोष्टीतून आसक्ती काढून विरक्त होत जाणे व निर्लेप जगणे. आपण लहानाचा आधार होणे, अनुभवाने समृद्ध होणे, शांत जगणे, हसत हसत मृत्यूच्या गावाकडे प्रवास करणे. आपण प्रेमाची, मायेची, आपुलकीची, आनंदाची पेरणी करू, प्रत्येक नात्यात जेवढी गुंतवणूक करू तितका आपल्याला परतावा नक्कीच चांगला मिळेल आणि नाहीच मिळाला तरी आत्मिक समाधान, शांती तरी नक्कीच मिळेल. आपण जशी गुंतवणूक करू, परतावाही तसाच मिळेल.
– सुचित्रा पवार