सकाळी साडेआठची वेळ. सगळीकडं शुकशुकाट. चारी बाजूला मोठमोठी झाडं. मध्येच खुरटी झुडपं. कधीमधी एखादा सपाटीचा पल्ला. बैलगाडीच्या चाकाचाच काय तो आवाज. अधनंमधनं गाडीवानानं बैलांना दिलेली हाळी सगळा माहोल चिरून जात होती. वस्तीचा कुठं लवलेशही नव्हता. मधूनच एखाद्या पक्ष्याचा आवाज. एखादं फुलपाखरू उडताना दिसत होतं. प्रवास सुरू होऊन जवळपास तास व्हायला आला होता. बैलगाडीत बसून आंगं आंबून गेलं होतं. तेवढ्यात लांब घराची कौलं दिसू लागली. जीव भांड्यात पडला.
बैलगाडीचा हा प्रवास सकाळपासून सुरू झालेला असला तरी इथं येण्यासाठीचा प्रवास खूप आधीपासून सुरू झाला होता. त्या दोघींनी अखेरीस आदिवासी भागात काम करण्याचं निश्चित केलं आणि त्या निघाल्या. अप्पांच्या घरी राहायची सोय झाली होती. पाच-सहा कपड्यांचे जोड, ताट-वाट्या-तांब्या, थोडी पुस्तकं आणि अंथरुण-पांघरुण एवढा संसार घेऊन त्या दोघी तिथं पोचल्या. अप्पांनी गावापासून थोडं लांब असलेल्या आदिवासी पाड्यापासून कामाला सुरुवात करायचा सल्ला दिला. बैलगाडीची व्यवस्था केली.
दहा-बारा घरं होती. कारवीच्या फांद्या नि मातीची घरं. एक-दोन घरांवर नळीची कौलं होती. बाकीच्या घरांचं छप्पर गवतानं शाकारलेलं. सगळीच दारं बंद होती. बैलगाडी झाडाखाली लावून गाडीवानानं बैल मोकळे केले. वैरण टाकली. या दोघी, गाडीवान आणि त्यांच्यासोबत आणखी एक मदतनीस असे चौघं होते. ते तिघं खाली उतरून घरांपुढं जात होते पण एकही दार उघडं नव्हतं. पहिल्याच दिवशी अशा नकारात्मक अनुभवानं त्या दोघींचं मन खट्टू झालं होतं. कुणी दारच उघडलं नाही तर कसं होणार? एक-दोन घरांसमोर जाऊन आवाजही दिला पण आतून काहीच प्रतिसाद नाही.
आता दाराची कडी वाजवावी असं ठरवून ती एका घराच्या ओसरीवर आली, हलकेच दाराची कडी वाजवली आणि दार किलकिलं झालं. दाराच्या फटीतून दोन डोळे दिसत होते, आत सगळा अंधार. दार उघडल्यावर एक तीन-चार वर्षांचं मूल बाहेर आलं. अंगावर एकही कपडा नाही. चार-पाच दिवस आंघोळ न केलेला अवतार. नाकातून शेंबूड वाहतोय, केसाला तेल नाही.
तिनं बैलगाडीकडं जाऊन सोबत आणलेलं प्यायचं पाणी घेतलं, त्यातलं थोडं पाणी वापरून त्या मुलाला स्वच्छ केलं आणि त्याला खायला काही जिन्नस दिले. मग त्याची विचारपूस करू लागले तर ते मूल नुसतं टक लावून त्यांच्याकडं बघत बसलेलं. त्यांच्या प्रश्नाला ते काहीच प्रतिसाद देत नव्हतं. त्यांना वाटलं कदाचित मुकं नाहीतर बहिरं असेल हे मूल. थोड्या वेळानं ते काहीतरी बोललं खरं पण त्याचा अर्थ काही यांना लागला नाही. कारण त्याची भाषा वेगळी होती. मग त्यांच्या लक्षात आलं की आपण ही भाषा जाणणारा माणूसही सोबत घ्यायला पाहिजे.
यांचे प्रश्न सुरू होते आणि त्या मुलाचं खायचं काम सुरू होतं. खाऊन त्याचं सगळं तोंड भरलं होतं. खायचे जिन्नस संपले तसं त्या मुलांनं पुन्हा हात पुढं केला. तिनं पदरानं त्याचं तोंड पुसलं नि आणखी खाऊ त्याच्या हातावर ठेवला. तसं ते मूल हसलं नि दुडूदुडू पळत परत घरात शिरलं.
आसपासच्या घरांचे दरवाजे अजून बंदच होते. त्यामुळं त्या परतीच्या वाटेनं निघाल्या, पण त्यांच्या डोक्यातून त्या मुलाचं चित्र जात नव्हतं. यांच्या जगण्याचेच प्रश्न इतके बिकट आहेत तर शिक्षणाचं काय, यावर मेंदूत घुसळण चालली होती. पाड्यावर तर पोचलो, एक मूल तरी भेटलं असा आशावादी विचार करत दुसऱ्या दिवशी आणखी तयारीनं जायचं ठरवलं.
दुसऱ्या दिवशीचा निश्चित आराखडा आदल्या दिवशीच्या मंथनातून तयार झाला होता. त्या दिवशीच लहान मुलांसाठी काही कपडे, खाऊ आणि खेळणी घेतली होती. दुसरा दिवस उजाडला तशी बैलगाडी पुन्हा निघाली. बैलगाडीत आता कालच्या माणसाऐवजी आदिवासी भाषा येणारा माणूस होता. आणि एक मोठा रिकामा ड्रम होता. त्या पाड्याच्या थोडं अलीकडं एक ओहोळ होता तिथनं त्यात पाणी भरून घेतलं. अंघोळीचा साबण, तेल या वस्तूही होत्या. कपडे, खाऊ, खेळणीही सोबत होती.
पाड्यावर पोचल्याबरोबर आदल्या दिवशी ज्या घराचं दार उघडलं होतं त्या घरासमोरच गेले तर तेच मूल पुन्हा तसंच बाहेर आलं. काल त्याला स्वच्छ केल्यामुळं ते जरा बरं दिसत होतं. त्या मुलाला दोघींनी जवळ घेतलं. अंगणातच एका कोपऱ्यात मोठा दगड होता. त्या दगडावर त्याला नेऊन चांगली अंघोळ घातली. त्याला कपडे घातले आणि त्याच्या हातात खाऊ दिला.
हे सगळं चाललेलं असताना इतर घरांची दारंही किलकिली व्हायला लागली. त्यातनं मुलं बाहेर आली. काही लहान होती तर काही मोठी. सात-आठ वर्षांची. त्या सगळ्यांना एकेक करून अंघोळ घातली. कपडे घातले आणि खाऊ दिला. सोबतचा माणूस त्यांच्या भाषेत त्यांच्याशी बोलत होता, त्यामुळं या माणसांपासून आपल्याला धोका नाही, याची त्यांना खात्री झाली होती.
मग त्यांना एका झाडाखाली गोल करून बसायला सांगितलं नि ती मुलं बसली. त्यांच्यासमोर सगळी खेळणी मांडली. ते कसं खेळायचं हे ही त्यांना ठावूक नव्हतं. पण त्यांना ते कळाल्यावर ती हरखून गेली. त्या दोघींच्या डोळ्यांत आभाळात मावणार नाही इतका आनंद साचला होता.
एकेक दिवस सरत होता. मुलं गोळा होत होती. खेळत होती. त्यांच्या भाषेत बोलत होती. खाऊ खात होती. एव्हाना मुलांच्या घरच्यांनाही याची माहिती झाली होती. मुलांचे आई-वडील पहाटेच शेतात किंवा जंगलात कामाला निघून जात होते. एक दिवस खास संध्याकाळी त्या पालकांना भेटायला त्या दोघी आल्या. सोबतच्या दुभाष्यानं त्यांच्या भाषेत शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. त्यांना फार काही कळलं नाही, पण या माणसांपासून आपल्याला नि आपल्या मुलांना धोका नाही इतकी खात्री पटली.
आता प्रश्न होता शिकवायचं कसं? मग त्याच्यावरही त्या दोघींनी उपाय काढला. ठरलेल्या झाडाखाली पोरं गोळा व्हायची. मग त्यांना छोटे दगड, काटक्या, फुलं, पानं यांचा वापर करून गणित शिकवायला सुरुवात केली. पोरं आकडे, बेरीज-वजाबाकी शिकू लागले. पण अक्षरं शिकवण्याची काही सोय नव्हती.
एके दिवशी जवळच्या समुद्रकिनारी फिरताना त्यांच्या पायाला वाळू चिकटली नि त्या दोघींना एकदम शोध लागला. एका कंपनीतून वापरलेले पुठ्ठे आणले. झाडाचा डिंक गोळा केला. तो त्या पुठठ्यांना लावला आणि त्यावर ही समुद्राकाठची वाळू ओतली. वाळू चिकटू बसली. मग त्या वाळूवर काडीने अक्षरं गिरवायची सुरुवात झाली. आभाळाची लेकरं आभाळाखालच्या पाना-फुलांतून आणि मातीतून जगण्याचं नवं कौशल्य शिकायला लागली.
– बी. चंद्रदास