श्रेय हा शब्द “श्री’ म्हणजे लक्ष्मी की जी धन आणि कीर्ती यांची देवता आहे या शब्दापासून तयार झाला आहे. परंतु रूढार्थानं श्रेय म्हणजे जी कृती (बहुतांश चांगली) त्याचा कर्ता असण्याची भूमिका घेणे असा होतो. ज्याला आपण इंग्रजीत “क्रेडिट’ घेणे म्हणतो ते श्रेय.
खरं तर श्रेय हे एक प्रकारचं फल आहे. आपण जर एखादी चांगली गोष्ट केली तर फलस्वरूप आपल्याला त्याचं श्रेय मिळतं. हे श्रेय धनाच्या, कीर्तीच्या, वस्तूच्या किंवा कृतीच्या स्वरूपात असू शकतं. उदाहरणार्थ, समजा नोकरीत आपण चांगलं काम केलं तर त्याचं धनाच्या रूपात म्हणजे पगारवाढीत, कीर्तीच्या म्हणजे कर्तृत्वाचं वृत्त छापून येणं, वस्तूच्या रूपात म्हणजे एखादा करंडक किंवा प्रशस्तिपत्र मिळणं आणि कृतीच्या स्वरूपात म्हणजे बढती मिळणं अशा प्रकारे श्रेयप्राप्ती होऊ शकते.
भगवद्गीतेत अर्जुन आपली शंका श्रीकृष्णाला विचारतो की :
गुरूनहत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ।।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, युद्धामध्ये गुरूंना आणि इतर ज्येष्ठांना न मारता भीक मागून पोट भरणं श्रेष्ठ होय. कारण गुरुजनांसारख्या श्रेष्ठ अशा मानवांची हत्या करून मला जे भोग मिळतील ते रक्तानं माखलेले असतील. इथे हत्या हे पाप न करण्याचं श्रेय असा उल्लेख आहे. म्हणजे एखाद्या कृतीची फलनिष्पत्ती असा अर्थ आहे.
मनुष्याला श्रेयाची अपेक्षा नेहमीच असते. प्रमोशन, इन्क्रिमेंट यांची आशा धरून बसलेले लोक आपल्याला कायम दिसून येतात. श्रेय न मिळाल्यास मनुष्य दुःखी होतो, निराश होतो. पण त्याहीपेक्षा आपल्या कामाचं श्रेय दुसऱ्या कुणी घेतलं (लाटलं अस बहुधा म्हटलं जातं) तर कमालीची वेदना होते. हे मी माझ्या करिअरमध्ये स्वतः पाहिलं आहे आणि अनुभवलंही आहे. असं म्हणतात की एक वेळ केलेल्या कामाचा मोबदला किंवा प्रशस्ती नाही मिळाली तरी चालेल, परंतु भलत्याच व्यक्तीला ती मिळता कामा नये.
अगदी हॉटेलमधल्या वेटरलाही चांगली सर्व्हिस दिल्याबद्दल “टिप’ची इच्छा असते.
सध्या राजकारणात अनेक चांगल्या गोष्टींचं श्रेय घेण्याची अहमहमिका चाललेली दिसून येते. राजकारणात ज्या प्रमाणे एखाद्या संकटनिवारणाचं किंवा प्रकल्प पूर्ण झाल्याचं श्रेय घेण्याचा आटोकाट प्रयत्न होतो तसाच तो कॉर्पोरेट क्षेत्रातही होतो. कर्मचारी वर्ग आणि त्यांचे बॉस यांच्यामधील हा मुद्दा कळीचा ठरतो, कारण अनेकदा इतरांनी यशस्वीरीत्या केलेल्या कामाचं श्रेय बॉस घेताना आढळून येतात.
बॉस हा कर्मचारी आणि वरिष्ठ व्यवस्थापन यांच्यामधला दुवा असतो, त्यामुळे त्याच्या शब्दाला वजन असतं. तथापि यशाचं श्रेय बऱ्याचदा वरिष्ठ घेतात आणि अपयशाचं खापर मात्र कनिष्ठांच्या माथी मारतात, असं दिसून येतं. अपयश हे अनाथ संतती आहे (कुणीही पितृत्व स्वीकारत नाहीत) तर यश हे अनौरस संततीप्रमाणे आहे (पितृत्व अनेकांकडे असतं) अशी इंग्रजी म्हण हीच वृत्ती दर्शवते.
या संदर्भात आपले भूतपूर्व राष्ट्रपती आणि “मिसाइल मॅन’ डॉ. अब्दुल कलाम यांनी सांगितलेली एक गोष्ट महत्त्वाची आहे. कलामांकडे एका उपग्रहाच्या प्रक्षेपणाची सूत्रं होती. दुर्दैवानं प्रक्षेपण अयशस्वी झालं. माध्यमांसमोर हे कसं जाहीर करायचं या चिंतेत कलाम पडले. पण त्यांचे वरिष्ठ प्रा. सतीश धवन त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी हे अपयश आपल्या शिरावर घेतलं. मात्र पुढील काही महिन्यांत जेव्हा कलामांनी यशस्वी प्रक्षेपण केलं तेव्हा त्यांना माध्यमांसमोर उभं करून धवन यांनी सर्व श्रेय कलामांना दिलं!
अलीकडे वाईट गोष्टींचं श्रेय घेण्याची पण अनिष्ट प्रथा पडत चाललेली आहे. एखाद्या अपघाताचं उत्तरदायित्व स्वीकारणं ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल, पण ज्या स्फोटात निरपराध माणसं मारली जातात त्याचं “श्रेय’ जेव्हा एखादी दहशतवादी संघटना घेते ती नक्कीच अयोग्य गोष्ट होय. याचं कारण बहुधा गुन्हेगारीचं उदात्तीकरण हे असावं.
असलं श्रेय तर अनुचितच आहे. टीमवर्कमुळे मिळालेलं यशाचं श्रेय हे वाटून देणं योग्य ठरेल. मात्र दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेणं हे सर्वथैव त्याज्य आहे.
– श्रीनिवास शारंगपाणी