आज ढोलके हत्ती, ढब्बू अस्वल, अहंकारी सिंह महाराज आणि गर्जेराव वाघ यांची सभा भरली होती. सभेचा विषय होता, “मोर्चा’. सर्व मानव जातीवरती हल्लाबोल मोर्चा करायचा आहे. असे एकमताने ठरले होते.
मागचे काही दिवस जंगलात याची चर्चा सुरू होती. तेवढ्यात शेपटी हलवत कोल्हा आणि लांडगा तेथे आले. “तुझ्या वाचून करमेना’ अशी त्यांची मैत्री! पण जवळ आले की मात्र सतत भांडत असत. त्यांनी घाबरत घाबरतच अहंकारी सिंहरावांना विचारले, “काय हो मानव वसतीवरती मोर्चाचे कारण काय?’
त्यावर कोल्ह्याला काहीच कळत नाही. अशी मुद्रा करीत सिंहराव म्हणाले, “अहो यावर्षी पाऊस किती लांबला… आपले पाणवठे बघा आटत चाललेत. त्यात या लोकांना काही उद्योग नाही. एक सारखे येथे कॅमेरे घेऊन आपले फोटो काढायला येतात. आपल्याला त्रास देतात. पण या माणसांना बोलणार कोण? अहो, आमच्या मुलांनासुद्धा आता शांतता मिळत नाही हो. ना अभ्यास करायला ना कुठे बागडायला जाता येत. सारखी आपली त्या कॅमेऱ्याची भीती.’
कोल्हेराव म्हणाले, “बरोबर आहे महाराज! मीसुद्धा फार वैतागलो आहे. आमच्या लांडगे भाऊंचेसुद्धा हेच मत आहे. पण काय करणार? आपण पडलो दुबळे. आपले सध्या “एकीचे बळ’ कमी झाले आहे. आपण पण हल्ली माणसासारखे आपापल्यापुरतेच बघायला लागलो आहोत. याचा हा परिणाम आहे.
कोणीही येतो आणि झाड तोडून नेतो. हे कसे चालेल? आपली मुळी या माणसांना आता भीतीच वाटत नाही. हे काही बरोबर नाही.’
कोल्हेरावानी सर्व प्राण्यांना दुबळे हे बिरुद लावल्यानंतर मात्र गर्जेराव वाघाने जोरात डरकाळी फोडली. त्याबरोबर ससे, हरणे, शिकारी कुत्रे सगळे एकदम चिडीचूप झाले.
सशाच्या बिळामध्ये छोटी छोटी पिल्ले होती. पण पाण्याविना बिचाऱ्यांचे घसे सुखले होते. पिंगट ससा आणि त्याची पत्नी आपल्या पिल्लांना पाणी कसे मिळेल याच विचारात होते. त्यांचे काही सभेमध्ये धड लक्ष नव्हते. पण सिंह महाराजांसमोरून कसे हलणार? घरी कसे जाणार? ते आपले सभेला यायचे म्हणून, हजेरी लावायला आले होते.
तेवढ्यात तिथे चिवचिवाट करत चिमणी आली. पिसारा फुलवत मोर आला. साळिंदर, मैना, पोपटराव, सात बाया यांनी एकच गलका केला. सभेच्या ठिकाणी बसण्याचे, प्रत्येक पक्ष्याचे एक एक झाड ठरले होते. सर्वजण झाडावर ऐटीत बसले आणि सभेत काय चालले आहे ते ऐकू लागले. खाली जातो कोण? कोणाची बिशाद खाली उतरण्याची?
पक्ष्यांचे राजे “मोर दादांनी’ मात्र कसाबसा जीव एकवटून, सिंह महाराजांना विनंती केली. “अहो माणसांवर मोर्चा नेण्याच्या आधी, जरा आमच्याकडे पहा. आम्ही आपले “बळीचे बकरे.’ कधी आमचा विचार करता का? महाराज, कोणी यावं आम्हाला पकडावं. माणसे तर बाजूलाच राहू देत. प्राणी जगतात काय चालले आहे? आपण याचा विचार करावा. हे निवेदन आपल्यापुढे ठेवत आहे. आम्ही तुमच्या मोर्चामध्ये सामील होऊच असे नाही. याची आपण दखल घ्यावी.’
सिंह महाराजांनी आपले चिटणीस अस्वल दादा, यांना मोर दादांचे निवेदन लिहून घेण्याची विनंती केली. खडकट्ट खडकट्ट… अस्वल दादांची नखे लिहिताना वाजू लागली. त्याबरोबर झाडावर बसलेले पोपटराव घाबरून गेले. कोणाचे लक्ष नाही असे पाहून त्यांनी परतीचा मार्ग धरला. आकाशात खूप उंचावर गरुडराव घिरट्या घालीत होते. आज जंगलात काहीतरी चालले आहे. हे त्यांनी आपल्या तीक्ष्ण नजरेने हेरले. त्यांनी कदंब वृक्षाच्या टोकावर क्षणभर विसावत खालच्या सभेचा अंदाज घेतला. काही क्षणातच पुन्हा ते आकाशात उंच भरारी मारू लागले.
तेवढ्यात सरसर करत पाऊस आला. प्राण्यांचा नेहमीचा पाणवठा तुडुंब भरला. ससा आणि त्याच्या प्रिय पत्नीला खूप आनंद झाला. बेडूकराव डरांव डरांव करत उड्या मारू लागले. मोरदादांनी आनंदाने छान नाचही केला. उंच उडणाऱ्या गरुडाने लांबून येणारी माणसे पाहिली. पहिल्या पावसात फोटो घेण्यासाठी, ती कॅमेरे सरसावत जंगलात शिरत होती. त्याने विशिष्ट आवाज करताच सर्व प्राणी आपापल्या जागा शोधत, जंगलात इकडे तिकडे पांगले. मोर्चाचे सर्वांच्या मनातले स्वप्न मात्र तिथेच राहिले.
– अनुराधा भिडे