पारनेर – मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रेच्या नियोजनासाठी मराठा समाजाच्या समनवयकांनी पारनेर व सुपा येथे गुरुवारी सायंकाळी नियोजन बैठका घेतल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज २० जानेवारीपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथन पदयात्रेने मुंबईला जाणार आहे. या पदयात्रेत लाखो मराठा बांधव सहभागी होणार असून, ही पदयात्रा अंतरवली सराटी, शहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, नगर, केडगाव, सुपा, शिरुर, वाघोली, शिवाजीनगर, पुणे, मुंबई एक्सप्रेस हायवे, लोणावळा, पनवेल, मुंबई अशा मार्गाने जाणार आहे.
मराठा मोर्चा नगर जिल्ह्यातून जात असून सुपा परिसरात या मोर्चाचा मुक्काम व मोर्चेकरांच्या अन्न, पाणी, निवास सोयीसाठी गुरुवारी पारनेर व सुपा येथे नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी नियोजनाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
यात महिला व पुरुष यांची वेगवेगळी व चार ते सहा ठिकाणी व्यवस्था करणे तसेच रस्त्याच्या दुतर्फा पाणी टॅंकर उभे करणे, मोर्चा बरोबरील टॅंकर रोड लगतच्या विहिरी, बोअरवेलवरुन भरण्याची सोय करणे, जेवणाची पाकीटे भरुन ती विभागून वाटप करणे, राहण्यासाठी मोकळे प्लाॅट साफ करून ठेवने, जास्तीत जास्त स्वंयसेवक महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त करणे, मोर्चात महिला मोर्चेकरी असल्याने आपल्या परिसरातील महिला स्वयंसेवक तयार ठेवणे, तसेच पारनेर तालुका हद्दीत श्रीगोंदा, संगमनेर, अकोले आदी तालुक्यातील मराठा बांधव जमा होतील, हा हिशेब धरुन नियोजन करणे, मोर्चाचे स्वागत, रहाणे, जेवण, पाणी आदी गोष्टींसह मोर्चा शिरुर, पुणे जिल्ह्यातील हद्दीत सुरक्षित पोहच होईल, आदी बारीक सारीक गोष्टीवर नियोजन करण्यात आले.
१० जानेवारीच्या सराटीतील बैठकीत मोर्चाचे मुक्काम वेळापत्रक आल्यावर पुढील नियोजनासाठी गोष्टीवर नियोजन करण्याचे चर्चेत ठरले. या बैठकीला नगर येथील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पारनेर सकल मराठा समाजाचे अनेक मान्यवर, पदाधिकारी, पत्रकार यावेळी उपस्थित होते.