उत्तर प्रदेशातील कुविख्यात माफिया अतिक आणि अश्रफ यांची पोलीस बंदोबस्तात झालेली हत्या आणि त्यापूर्वी त्याच्या मुलाचे झालेले एन्काउंटर हे अनेक प्रश्न निर्माण करणारे आहेत. कोणत्याही माफियाला जेव्हा पोलीस एन्काउंटरमध्ये ठार करतात तेव्हा सामान्य जनतेला मनापासून आनंद होतो आणि पोलिसांविषयी त्यांच्या मनात असणारा आदरभाव वाढत असतो. परंतु काही वेळा हे एन्काउंटर बनावट होतात का अशा शंकाही जनतेतून उपस्थित केल्या जातात. अतिक आणि अश्रफच्या मरणाचे दुःख कोणाला होणार नाही; परंतु यामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. तसेच अशा एन्काउंटरना राजमान्यता मिळणे धोक्याचे ठरू शकते.
काही वेळा खरोखरीच पोलीस जिवावर उदार होऊन किंवा प्राण पणाला लावून अशा गुन्हेगारांना कंठस्नान घालत असतात. परंतु काही वेळा अशा एन्काउंटर्सबद्दल जनतेच्या मनात प्रश्न उपस्थित राहतात. तो एन्काउंटर खरोखरीच आत्मबचावासाठी पोलिसांनी केला की तो फेक एन्काउंटर होता अशा शंका घेतल्या जातात. अशा शंकांचे मोहोळ उठले की माध्यमांमधून दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जातात.
अखेरीस हे प्रकरण न्यायालयाच्या उंबरठ्यावर जाते आणि न्यायालयही मग अशा एन्काउंटर्सची सत्यासत्यता तपासण्यासाठी एखाद्या आयोगाची स्थापना करते. पण या न्यायालयीन आयोगाच्या निर्णयाचे काय होते याचे जनतेला कसलेही सोयरसुतक नसते; परंतु गुन्हेगारांच्या एन्काउंटरनंतर समाजातून व्यक्त होणारे समाधान, काही प्रसंगी आनंदोत्सव साजरा करणे या गोष्टी समाजाचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी होत चालल्याचे द्योतक म्हणाव्या लागतील.
महाराष्ट्रात 1990 च्या दशकात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर अंडरवर्ल्ड गुंडांचे एन्काउंटर झाले होते. त्यात अनेक कुविख्यात गॅंगस्टर्स मारले गेले. त्याचा आनंद सर्वांनाच झाला. परंतु या एन्काउंटरमधून काही पोलीस अधिकारी एन्काउंटर स्पेशालिस्ट किंवा चकमक फेम म्हणून प्रसिद्ध पावले. हे चकमक फेम चमकोगिरी करत आपण इतक्या गुन्हेगारांना ठार केले, असे सांगत स्वतःचा डंका पिटू लागले. त्यातून काही काळ ते लोकांच्या डोळ्यात हिरो बनले.
परंतु त्यांच्यावरही नंतर गंभीर आरोप होऊ लागले. या चकमक फेम पोलीस अधिकाऱ्यांनी एका गॅंगकडून सुपारी घेऊन प्रतिस्पर्धी गॅंगमधील गुंडांना ठार केल्याची टीका होऊ लागली. महाराष्ट्रात अशा घटना घडल्या आहेत हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. किंबहुना, अशा काही चकमक फेम अधिकाऱ्यांना आपल्याच “कर्तृत्वामुळे’ तुरुंगातही जावे लागले आहे. त्यामुळेच अशा चकमकी खरोखरीच होतात की नाही, हा प्रश्न एन्काउंटरनंतर सातत्याने उपस्थित होत राहतो.
सध्या याची चर्चा होण्याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची पोलीस बंदोबस्तात झालेली हत्या. अतिक आणि अशरफविषयी कोणालाही प्रेम वाटण्याचे कोणतेही कारण नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तापदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर “मी गुंडगिरीचा, माफियाराजचा बीमोड करेन आणि माझ्या राज्यात अतिरेकी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत’ असे जाहीर केले होते. त्यांच्या या भूमिकेचे सर्वांनीच स्वागत केले आणि त्यानुसार योगी आदित्यनाथांनी कार्यवाहीही सुरू केली. उत्तर प्रदेशात जिथे जिथे बेकायदा अतिक्रमणे होती तिथे तिथे बुलडोजर फिरू लागले. ही गोष्ट खरीच आहे की, उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जात असत.
लोकांच्या मनात गुंड, माफिया, संघटित गुन्हेगारी करणारे गुन्हेगार यांच्याविषयीची भीती वाढू लागली होती. एखाद्या हिंदी चित्रपटातील दृश्याप्रमाणे तेथे दिवसाढवळ्या जीपमध्ये मोठमोठ्या रायफल्स घेऊन गुंड फिरू लागले होते. यातील बहुतेक जण राजकीय नेत्यांचे संरक्षक म्हणून फिरत होते. राजकीय नेत्यांनाही त्यात मोठेपणा वाटू लागला होता. अशा गुंडांना, माफियांना सोबत घेतल्याने आपली प्रतिष्ठा वाढते असा त्यांचा समज होऊ लागला. त्याचाच फायदा घेऊन या गुंडांकडून जमिनी हडप करणे, लुटालूट, सामुदायिक बलात्कार यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांचा अक्षरशः सपाटाच लावण्यात आला होता. योगी आदित्यनाथांनी त्याला चाप लावण्यात काही प्रमाणावर यश मिळवले आहे.
योगी आदित्यनाथ मागील काळात मुंबईला आले होते तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळातील माझे मित्र असणाऱ्या आशुतोष टंडन यांनी मला भेटायला बोलावले होते. मलादेखील योगी आदित्यनाथांचा अभ्यास करायचा असल्याने भेटायला गेलो होतो. मी, योगी आदित्यनाथ, त्यांचे मुख्य सचिव आणि लालजी टंडनांचे चिरंजीव आशुतोष यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मी त्यांना काही प्रश्न विचारले होते. त्यातील काही प्रश्नांची त्यांनी अगदी समर्पक उत्तरे दिली होती. त्यांचा गुन्हेगारीचा बीमोड करण्याबाबतचा निर्धार पक्का असल्याचे त्या चर्चेतून मला जाणवले. त्याच चर्चेत त्यांनी मनातील एक खंतही व्यक्त केली. ती म्हणजे आमची यंत्रणा भ्रष्ट होते त्यावेळी आम्हाला त्यांच्यावर ताबा मिळवता येत नाही.
म्हणून मी माझीच यंत्रणा स्वच्छ करण्याचे ठरवले आहे. त्याचे प्रत्यंतर आपल्याला आले. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेश सरकारने एका पत्रकार परिषदेत गेल्या 6 वर्षांच्या कारकिर्दीत 10 हजारांहून अधिक पोलीस एन्काउंटर झाल्याचे स्पष्ट केले होते. तथापि, काही एन्काउंटर्सबाबत लोकांच्या मनात शंकाही उपस्थित झाल्या. आताही अतिक अहमदच्या मुलाचा एन्काउंटर हा खरोखरीच आत्मबचावासाठी पोलिसांनी केला की एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंगचा भाग आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सबब, गुंड-माफियांच्या एन्काउंटरबाबतची कारणे सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ असतील तर कोणालाही ते आवडतीलच; परंतु त्यामध्ये संशयाला सुईइतकी जरी जागा असेल तर त्यावेळी त्याचा धिक्कार केला पाहिजे. कारण अशा फेक एन्काउंटरना राजमान्यता देणे ही धोक्याची घंटा ठरू शकते, हे लक्षात घ्यायला हवे. म्हणून जनतेसमोर खरं काय घडलं हे येणे गरजेचे असते. न्यायालयीन आयोग स्थापून काहीही साध्य होत नाही.
सध्याची प्रयागराजमधील जी घटना घडली ती अत्यंत धक्कादायक आहे. पोलिसांच्या उपस्थितीत, बंदोबस्तात दोन जणांची हत्या होण्यातून अनेक प्रश्नांचे मोहोळ उठले असून ते स्वाभाविक आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची भीती कमी झाली आहे का? उत्तर प्रदेशात प्रतिस्पर्धी गॅंग तितकीच सक्षम आहे का? उत्तर प्रदेश पोलिसांना या हल्ल्याबाबत कोणतीही पूर्वमाहिती मिळू शकत नाही, हे कोणाचे अपयश समजायचे? सर्वांत शेवटचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे यामागचा उद्देश नेमका काय होता? न्यायालयीन आयोग हा विशिष्ट कक्षेत काम करतो. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने या संपूर्ण प्रकरणाबाबत पारदर्शकपणा दाखवणे गरजेचे आहे. अन्यथा, अतिक आणि अशरफ हे मेल्याचे दुःख होणार नाही; पण कायदा आणि पोलिसांबद्दलच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होता कामा नये.
याखेरीज आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा गुन्हेगारांना असणारा राजकीय वरदहस्त किंवा राजाश्रय. छोटासा राजकीय उद्देश सफल करुन घेण्यासाठी म्हणून किंवा त्यांचे आपल्या मतदारसंघात प्राबल्य आहे म्हणून अशा गुन्हेगारांना जाणीवपूर्वक काही राजकारणी हाताशी ठेवतात, वाढवतात ही वस्तुस्थिती आहे. कित्येकदा कायद्याच्या कचाट्यात अडकले तरी त्यांची जामिनावर मुक्तता कशी होईल याची सोयही या नेत्यांकडून राजकीय स्वार्थासाठी केली जाते. यातून राजकारणी आणि माफिया यांचे एक नेक्सस तयार झाले आहे. याचा कळस म्हणजे गुन्हेगार म्हणून कुप्रसिद्ध असणारे लोक राजकीय नेते, लोकप्रतिनिधी बनून सत्तेत येऊ लागले आहेत. ही अर्थातच धोक्याची घंटा आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हेगाराला शिक्षा ठोठावण्यात येणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यातून न्यायव्यवस्थेचे पावित्र्य तर वाढतेच; परंतु सामान्य नागरिकाच्या मनातही एक प्रकारची सुरक्षितता वाढते. असे झाले नाही तर अशा गुंडापुंडांचा नायनाट झाल्याविषयी समाजात आनंद साजरा होणे हे स्वाभाविक आहे. पण ते सदृढ लोकशाहीसाठी योग्य नाही. किंबहुना, कायद्यापुढे आणि न्यायव्यवस्थेपुढे ते एक आव्हान आहे. आमचा कायदा अपंग झाला आहे आणि कायद्यावरचा लोकांचा विश्वास उडाला आहे, पोलीसच चांगला न्याय देऊ शकतात ही गोष्ट अत्यंत चिंतेची आहे.
(शब्दांकन ः हेमचंद्र फडके)
– ऍड. उज्ज्वल निकम