करंजगाव – मावळ तालुका सुजालम सुफलम आहे. पावसाळ्यात महाराष्ट्रातून व इतर राज्यांतून पर्यटनासाठी नागरिक येतात. परंतु मावळ तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. नाणे मावळातील जलवाहिनीचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जलवाहिनीचे काम त्वरित पूर्ण करा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मावळ तालुक्यातील नाणे मावळ हे महत्त्वाचे ठिकाण आहे. नाणे मावळात पर्यटन व्यवसाय विकसित होत आहे. पावसाळ्यात पर्यटकांची नाणे मावळाला पसंती मिळू लागली आहे. नाणे मावळात अनेक डोंगर, धरण, नद्या, देवस्थाने असल्यामुळे पुणे, मुंबई तसेच आजूबाजूच्या तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक पर्यटन करण्यासाठी येतात.
पावसाळ्यात फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्या मनात नेहमीच अशा निसर्गरम्य आणि शांत परिसरात आपले घर असावे अशी भावना निर्माण होते. परंतु पावसाळ्यात सर्वत्र दिसणारे पाणीच पाणी मात्र उन्हाळा लागताच आटून जाते. आणि येथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ येत आहे. पाण्यासाठीची महिलांची होणारी पायपीट थांबण्यासाठी नाणे मावळात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु ठेकेदार कामवर लक्ष देत नसल्याने आणि ग्राम प्रशासनाचा अंकुश नसल्याने जलवाहिनीचे काम मागील काही दिवसांपासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील ठेकेदार व ग्रामपंचायतचे पदाधिकारी लक्ष देताना दिसून येत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठे नाराजीचे वातावरण आहे.
महिलांच्या डोक्यावर हंडे
भर उन्हात पिण्याचे आणि इतर पाण्यासाठी महिलांना रानात अथवा ज्या ठिकाणी विहिरीत पाणी आहे तेथे हंडा, कळशी घेऊन पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे. गावातील जलवाहिनीचे काम संथगतीने सुरू असल्याने घरातील नळाला पाणी कधी येईल आणि आमच्या डोक्यावरील हंडा कधी खाली येईल, अशी भावना महिला वर्गातून व्यक्त होत आहे.