आयपीएलचे वेड असलेल्या नवतरुणांना भारताचे दिग्गज फलंदाज सलीम दुराणी यांच्याबद्दल फारशी माहिती नसेल; परंतु त्याच्या समकालिनांनी दुराणी यांची मैदानावरील धमाकेदार कामगिरी पाहिली आहे. क्रिकेटच्या इतिहासात सलीम दुराणी हे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जात होते. चाहत्यांच्या मागणीनुसार षटकार ठोकणारा फलंदाज अशी त्यांची ख्याती होती. उंच आणि निळ्या डोळ्यांचे, सलीमभाई हे अत्यंत स्टायलिश खेळाडू होते. ते जिथे जायचे तिथे गर्दी व्हायची. अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारे सलीम दुराणी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू होत.
साठीच्या दशकामध्ये भारतीय क्रिकेटविश्वावर आपला एक स्वतंत्र आणि अमिट ठसा उमटवणाऱ्या सलीम दुराणी यांच्या निधनामुळे समस्त चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. भारतीय क्रिकेटचा इतिहास खूपच रंजक आणि आश्चर्यकारक आहे. अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या दमदार कामगिरीने इतिहास रचला आहे. असे अनेक क्रिकेटपटू आजही चर्चेत आहेत. सलीम दुराणी हे यापैकीच एक होते.
क्रिकेटच्या इतिहासात एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख सदैव राहील. त्यांच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य म्हणजे ते चाहत्यांच्या मागणीनुसार षटकार ठोकत असत. तत्कालीनच नव्हे तर आजच्या वेगवान क्रिकेटच्या काळातही ही बाब भल्या-भल्या कसलेल्या फलंदाजांना शक्य होत नाही; परंतु दुराणी यामध्ये माहीर होते. मैदानात जमलेल्या प्रेक्षकांच्या गर्दीतून ज्या बाजूने आवाज येईल त्या दिशेने उत्तुंग षटकार खेचणे ही त्यांची खासियत होती.
सलीम दुराणी हे मूळचे अफगाणिस्तानचे. त्यांचा जन्म अफगाणिस्तानातील काबूल येथे झाला असला तरी नंतर त्यांचे कुटुंब कराचीमध्ये स्थायिक झाले. कुटुंब कराचीला पोहोचले तेव्हा दुराणी केवळ आठ महिन्यांचे होते. 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा सलीम दुराणी यांचे कुटुंब भारतात आले. अफगाणी लोकांप्रमाणे उंच बांधा आणि निळे डोळे यामुळे दुराणी यांचे व्यक्तिमत्त्वही आकर्षक होते. ते त्या काळातील स्टायलिश खेळाडूंपैकी एक मानले जात होते. दुराणी जिथे जायचे तिथे गर्दी होत असे. स्टेडियममध्ये फलंदाजीसाठी ते उतरले की खेळ सुरू होताच “सलीम भाई इधर’, “सलीम भाई इकडे’ असा ओरडा प्रेक्षकांमधून हमखास ऐकायला मिळायचा. त्यानुसार षटकार ठोकण्याच्या शैलीमुळेच दुराणी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते.
भारतीय क्रिकेटच्या उदयात त्याचे मोठे योगदान आहे. अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारे सलीम दुराणी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू होत. मैदानाबाहेर रोमॅंटिक आणि हृदयस्पर्शी तरुण असणारे सलीमजी पिचवर उभे राहिले की अतिशयर धीरगंभीर खेळाडू असत. 1960 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मुंबई कसोटीत त्यांनी पदार्पण केले. वस्तुतः सलीम दुराणी यांच्या क्रिकेटमधील कामगिरीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता त्यात विशेष असे काहीच नसल्याचे किंवा ऐतिहासिक, विक्रमी असे फार काही नसल्याचे दिसून येते. दुराणी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये भारतासाठी एकूण 29 कसोटी सामने खेळले. या 29 सामन्यांत एकूण 1202 धावा केल्या. त्यामध्ये एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश होता. याखेरीज त्यांनी एकूण 75 बळी घेतले. तथापि, या आकड्यांवरून दुराणींचे, त्यांच्या कामगिरीचे किंवा त्यांनी दिलेल्या योगदानाचे मूल्यमापन करता येणार नाही. किंबहुना तसे करणे हा त्यांच्या लोकप्रियतेवर आणि त्यांनी दिलेल्या योगदानावर अन्याय ठरेल.
दुराणी यांची कारकीर्द मोठी नसली तरी त्यांनी आपल्या खेळाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. 60-70 च्या दशकात ते त्यांच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखले जात असत. स्पष्टपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक उल्लेखनीय गुण होता. एकदा एका पार्टीत पॅट पोकॉक या इंग्लंडच्या ऑफस्पिनरला ते म्हणाले, “जेव्हा तू गोलंदाजी करशील तेव्हा मी तुला पहिल्याच चेंडूवर ईस्ट स्टॅंडवर षटकार मारेन’. विशेष म्हणजे झालेही तसेच. पोकॉकने मुंबईतील कसोटी सामन्यात पहिला चेंडू टाकला आणि दुराणी यांनी त्याला दिलेल्या शब्दाप्रमाणे पहिल्याच चेंडूवर ईस्ट स्टॅंडच्या दिशेने षटकार मारला. हा षटकार पोकॉकच्या आयुष्यभर स्मरणात राहिला.
सलीम दुराणी यांना विनोद करणे आणि मोठ्याने हसणे आवडत असे. सुनील गावस्कर यांनाही त्यांच्या शैलीचे वेड लागले होते. सुनील गावस्कर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांचा भरपूर उल्लेख केला आहे. 1971 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये सुनील गावसकर यांनी पाच कसोटी सामन्यांमध्ये 774 धावा बनवून भारताला कॅरेबियन मैदानावर पहिला मालिका विजय मिळवून दिला होता. तथापि, पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये क्लाइव्ह लॉईड आणि गॅरी सोबर्स यांची विकेट घेतली नसती तर हा विजय कदाचित शक्यच झाला नसता.
त्यानंतरच्या इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघामध्ये त्यांना स्थान देण्यात आले नाही. कारण त्यावेळी भारतीय क्रिकेट बोर्डावर मुंबई गटाचे वर्चस्व होते. इंग्लंडमधील हवामानामध्ये दुराणींना खेळता येणार नाही असे मुंबई गटाला वाटले. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या तीनही दौऱ्यांमध्ये दुराणींना वगळण्यात आले. इंग्लंडविरुद्ध ईडन गार्डनच्या मैदानावर अर्धशतक झळकावल्यानंतरही त्यांना कानपूर कसोटी सामन्यात वगळण्यात आले. साहजिकच दुराणींचे चाहते यामुळे नाराज झाले. त्यांनी “नो सलीम, नो टेस्ट’ असे पोस्टर्स झळकावले होते.
सुनील गावसकर यांनी एकदा असे म्हटले होते की, सलीम दुराणी यांचे आत्मचरित्र लिहायचे झाल्यास त्याचे शीर्षक “आस्क फॉर अ सिक्स’ असे असेल. वस्तुतः त्याकाळात पाच दिवस चालणाऱ्या एका कसोटी सामन्यासाठी 300 रुपये मानधन मिळत असे; परंतु दुराणी केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणि क्रिकेटवरील प्रेमासाठी खेळत राहिले. आजच्या युगात आयपीएलचे वेड असलेल्या तरुणांना दुराणींबद्दल फारशी माहिती नसेल; परंतु त्यांच्या समकालिनांनी दुराणी यांची मैदानावरील धमाकेदार कामगिरी पाहिली आहे.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री परवीन बॉबीसोबत नायक म्हणून एक चरित्रपटही केला. अभिनेत्री तनुजासोबत “एक मासूम’ या चित्रपटातही त्यांनी काम केले होते. त्यांनी आयुष्यात अनेक चढउतारही पाहिले. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज दिली. वयाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागले, पण त्यांनी इतरांना याची जाणीव होऊ दिली नाही. 2011 मध्ये त्यांना बीसीसीआयने “लाइफ टाइम अचिव्हमेंट ऍवार्ड’ देऊन सन्मानित केले होते. आयुष्यभर जिंदादिल राहिलेल्या या दिग्गज क्रिकेटपटूने गुजरातमधील जामनगरमध्ये अखेरचा श्वास घेतला; पण क्रिकेटच्या इतिहासातील पानांवर त्यांचा अमिट ठसा सदैव कायम राहील.
– नितीन कुलकर्णी