प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वैभवाचा एक काळ असतो. या काळात व्यक्ती सर्वार्थाने सुखी आनंदी असते, दुःखाचा एखादा काटा टोचला तरी त्याला वैभवाच्या हिरवळीत त्याची बोच बोथट होते. हा काळ कधी दीर्घ असतो कधी अगदी थोडा; दिवस पालटतात, वैभव आणि वैभवाचा काळ ओसरतो पण वैभवाच्या खुणा आपल्या जीवनावर ठसे उमटवून जातात. ओलसर मऊ मातीत प्राजक्त ओघळावा आणि सगळी मातीच सुगंधी व्हावी तसेच एकांत क्षणी, जीवन जगत असताना माणसाला कधीतरी मग त्या ठशाशी साधर्म्य असलेली एखादी गोष्ट, प्रसंग आल्यावर मन भूतकाळात डोकावते न मग वैभवाच्या दिवसांचा पट उलगडत जातो आणि मन त्या आठवणींनी सुगंधी होऊन प्रफुल्लित होते.
दुःखाच्या क्षणीही मग काही सुखावह क्षण तो पुन्हा जगून घेतो; भूतकाळात जाता येत नसले तरी ते क्षण पुन्हा जगल्याची अनुभूती येते. तो ही एक भासच असतो पण बऱ्याचवेळा भासात जगण्याची देखील मजा असते.
कुणाच्या वाट्याला भरमसाठ संपत्ती येते, कुणाच्या जीवनात राजेशाही थाट येतो, कुणाच्या जीवनात अमाप प्रसिद्धी येते, कुणाला अप्रतिम सौंदर्य मिळते; वैभवाच्या व्याख्या ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून असतात. आजी आजोबांचे दिवस जातात, आईवडिलांचे येतात, तेही जातात आपण मोठे होत जातो न मग आपल्या आईवडिलांच्या कृपाछायेतल्या मजेदार दिवसांची सोबत घेऊन आपला जीवनप्रवास चालत राहतो; पण मन मात्र रेंगाळत रहाते आपल्या जीवनातल्या त्या वैभवाच्या खुणांच्या भोवती. एखाद्या विसाव्याच्या क्षणी हे क्षण स्मृतींच्या ओंजळीतून घरंगळत राहतात अन आपण हरवून जातो त्या जादुभऱ्या क्षणांत.
मला आठवतात आमच्या बालपणीच्या वैभवाचे दिवस. आपले अंगण तर आपलेच होते पण आसपासच्या मोकळ्या मैदानांचे आणि शेजारपाजाऱ्यांच्या अंगणांचे देखील आम्ही अनभिषिक्त सम्राट अन् सम्राज्ञी होतो. तिथल्या फुलांवरची भिरभिर फुलपाखरे आणि झाडांवरची आनंदी पाखरे! कुणाच्याही अंगणात जा, खेळा, पळा कुठल्याही मैदानात कुठलेही डाव मांडा, कुणाच्याही घरातून इकडून तिकडे बिनधास्त ये जा करा, कुणाच्या माडीवर जा, कुणाच्या बैलगाडीत बसून खेळा कुणीच काही म्हणत नव्हते. हा, एखादेच खडूस माणूस असायचे पण मग तसल्या माणसांच्या घरात दारात आम्ही चुकूनपण जात नव्हतो.
आमची घरे शक्यतो मातीची घरे. पांढऱ्या मातीने लिंपलेली व पोतेरा दिलेली असायची आणि जमिनी शेणाने सारवलेल्या. बऱ्याच घरात सोपा, पडवी, मधली खोली आणि स्वयंपाकघर. कुणाचा अक्खा वाडाच तर कुणाच्या वाड्यातल्या दोन खोल्या! सोप्यात जोता, जोत्यावरच्या मोकळ्या जागेत धान्यांची पोती, पत्र्याचा हौद, वर टांगलेल्या तारा किंवा दांडीवर मक्याची कणसे , लसणाच्या पेंड्या लटकत असायच्या. देवळीत आरसा फणी, एखादा कंगवा, कुंकवाचा लाकडी करंडा, अन् छोटासा आरसा. बऱ्याचदा भिंतीतच आरशाची काच बसवलेली असायची. त्यातच बघून केस, कुंकू नीटनेटके करायचे. घरात मुली असतील तर पोन्ड्सचा अंडाकृती टोपणाचा गुलाबी डबा आणि अगदीच कॉलेजला जाणारी कुणी असतील तर स्नो (आमच्या भाषेत इस्नो!) निळ्या काचेच्या छोट्या बाटली वजा बरणीत हा स्नो असायचा. घट्ट गंधाची गोल पांढरी प्लॅस्टिक बाटली, ‘जाई’ काजळाची एक डबी बस्स इतकेच “मेकप’ साहित्य! पुढं गोल गंधांची बाटली जाऊन ‘शृंगार’ची लांबडी चॉकलेटी गंधांची बाटली आली.
भिंतीवर देवादिकांच्या फोटोबरोबरच मागील तीन पिढीतील कुटुंबप्रमुखांचे फोटो (वास्तूशास्त्र बिस्त्र काय भानगड नव्हती) त्याचबरोबर सध्याच्या पिढीतील कुटुंबातील मोठ्यांचे लहानपणी किंवा तरुणपणीचे फोटो काचेच्या फ्रेममध्ये भिंतीवर ओळीने लटकायचे. मधल्या खोलीत अंथरूण-पांघरूण, वाकळा आणि कपडे ठेवायला दोरी. लोखंडी किंवा लाकडी पेट्या.. स्वयंपाक घरात एक किंवा दोन चूली, (भांडी घासायला चुलीतली राख) कोळशाची शेगडी आणि भिंतीतली फडताळ किंवा लाकडी कपाट. तिजोरी बिजोरी असल्या गोष्टी दुर्मिळ होत्या. अड्यावरचं शिक्काळ मुंग्या मांजरापासून दूधाचं संरक्षण करायचं. मुलगी बघायला पाहुणे आले की, कुणाच्यापण आजूबाजूच्या घरात मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम व्हायचा.
प्रत्येकाच्या अंगणाला लागून अंगणे होती त्यामुळं इकडून तिकडं सहज वावर असायचा म्हणजे अगदी नव्या नवरीला सूचना द्यायच्या असो किंवा नवशिक्या पोरीला स्वयंपाकात मार्गदर्शन असोत, आसपासचे कुणीही बिनदिक्कत जाऊन-येऊन सांगायचे.एकमेकांच्या अंगणातल्या आणि घरात शिजलेल्या पण भाज्या इकडे तिकडे सहजच फिरायच्या. दुपारी तिपारी भूक लागली न आपलं कालवण संपलेलं असलं तर हक्काने वाटी घेऊन शेजाऱ्याच्याकडचं कालवण आणायचं किंवा आपल्यातील आवडलं नसलं तरी आपल्या वाटीभर कालवणाची देवाणघेवाण होऊन पोट भरायचे.वेगळा पदार्थ, उन्हाळ्यातील पापड, कुरड्या, भातुड्या चवीसाठी गल्लीभर फिरायच्या. कुणाची म्हैस, गाय व्याली की चीक, कोवळं दूध, दही, ताक घरोघरी वाटायचं.दिवाळीचा फराळ आपल्या अगोदर शेजाऱ्याच्या घरात पोहचायचा. आसपासच्या किमान पाच-दहा घरांशी सलोख्याचे, स्नेहाचे संबंध असायचेच.
आमच्या घराच्या जवळ गावंदर असल्याने आम्हाला निसर्गाचा आनंद भरभरून घेता आला. पिके कापणीला आली की पक्ष्यांची गर्दी व्हायची आणि ते पक्षी आमच्या अंगणातल्या झाडाझुडावर निवांत विश्रांती घ्यायचे. बाजूलाच लगेच शेते असल्याने त्यांची घरटीही आसपासच्या झाडांवर, खोबणीतून ढोलीतून असायची. संध्याकाळी खेळून दमलो की मोकळ्या मैदानात किंवा रस्त्यावर निवांत बसून आकाशातले पाखरांचे थवे न्याहाळत राहायचो. ढगांच्या कापसात वेगवेगळे आकार शोधायचो, कधी हरीण कधी राक्षस कधी देव तर कधी शिवाजीमहाराज दिसायचे.
आकाशात तिन्हीसांजेला होणारी रंगांची उधळण आणि तांबूस, केशरी, पिवळ्या, काळ्या नानारंगी छटा पाहून हरकून जायचो; नित्यनेमाचे निसर्गातील हे बदल आमच्या जीवनाचे अविभाज्य भाग होते. आसपासचे पशुपक्षी, फुलपाखरे, झाडेझुडे, दगड धोंडे, ओढे, नाले इतकेच काय दूरवर उन्हात झळझळणारे दाट मृगजळ देखील आमचेच वाटायचे; जवळ जाऊन त्यात हात बुडवावा असं वाटायचं; हे सारे आमचे सखेसोबतीच होते. शाळेत जाताना रमत गमत जाणे येणे आणि मग निसर्गातले हे दररोजचे बदल स्वीकारत अन् न्याहाळत त्याच्याशी एकरूप होत जगणे अंगी मुरले होते. शेतातली पिके काढली की मुलांना पतंग उडवायला रान मोकळेच! कितीदा सड घुसून पाय रक्तबंबाळ व्हायचे, काटे टोचून पायात मोडायचे पण आनंदाच्या त्या क्षणांपुढे कोणत्याच वेदना क्षुल्लक होत्या.
निसर्गचक्राप्रमाणे आमचे खेळही बदलत असत, म्हणजे पावसाळ्यातले खेळ वेगळे, उन्हाळ्यातले खेळ वेगळे! पावसाळ्यात चिखलात खेळणे, मातीची भांडी बनवणे असले खेळ खेळत असू पण खरी खेळाची मजा उन्हाळ्यातच यायची. सुट्टी दीर्घकाळ चालायची आणि शाळा, अभ्यास असलं काहीच नसायचं, त्यामुळं सर्व सुट्टीवर आमचाच हक्क होता. आम्हाला उन्हाळ्यात कुठल्या कलासेस अथवा स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला बसवले जात नव्हते. त्यामुळं अधूनमधून घरी बोलवलं की सांगितलेलं काम करायचं आणि पुन्हा खेळायचं.
जोंधळ्याचे पीक निघून कडब्याच्या गंज्या परड्यात विसावयाच्या.
मजबूत टणक गणगटे काढून साठवून ठेवायचे आणि गणगटांनी खेळायचे.प्रत्येकाच्या समसमान गणगट घेऊन चौकोनी किंवा गोल रिंगणात मांडून सपाट दगडाने (याला आम्ही व्हस्टर म्हणायचो)टिपून रिंगणातून बाहेर काढायचे असाच कोईंचा आणि चिंचोक्यांचा डाव असायचा.ओढलेल्या(जिंकलेल्या)कुया अंगणात पुरून ठेवायचो त्यावर ओळखीची खूण ठेवून दुसऱ्या दिवशी पुरून ठेवलेल्या कुया काढून खेळायचो. कधीतरी रात्री अचानक पाऊस यायचा आणि पुरलेल्या कोयी मुजुन जायच्या, थोड्या दिवसांत त्या जागेत आंब्याचे कोवळे तांबूस कोंब वरती यायचे मग लक्षात यायचे, ‘इथं कोयी पुरल्या होत्या !’
याचबरोबर दुपारच्या वेळी सावलीत बसून काचा कवड्या, भातुकली ,(भातुकलीच्या खेळात बोळकी, हिंगाचे, पोंड्सचे रिकामे झालेले डबे, टोपणे, सगळं चालायचं भातुकलीचा संसारसेट क्वचितच मिळायचा) गदी गाई, गजगे, बिट्या, जीबली, लपंडाव खेळत असू. (मुलेही आमच्यासोबतच खेळत, भेदाभेद मुळीच नव्हता, छेडाछेडी किंवा आतासारखं अजून पहिलीत जात नाही तोपर्यंत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असले प्रकार नव्हते.)
सर्वचजण सवंगडी निर्मळ निकोप मनाचे होते. कुणाही मुलाची ओळख ‘शेजारचा’ अशी नसायची, ‘माझा भाऊ ‘ अशीच असायची. चुकलं तर मरेस्तोवर मार असायचा, मुलगी ‘मोठी’ झाली की खेळ बंद व्हायचे लगोर, काट्याकोली, विष अमृत, सुरपाट्या गट्टया, आयरे, पत्यांच्या पानाने, विटी (चिन्नी )दांडू, कबड्डीने खेळायची. आमचे टाइम पास असायचे-एकत्र बसून गप्पा मारणे, ढगांचे आकार, आकाशाचे रंग न्याहाळणे, पक्ष्यांचे, फुलपाखरांचे, वेगवेगळ्या कीटकांचे निरीक्षण करणे ,झाडांच्या पानांच्या पिपाण्या करून वाजवणे, कर्दळीच्या बिया पानांच्या सुरळ्या करून त्यावर ठेवून फुंकरीने उडवणे, चिकाडीचे तांबडे तुरे तोडून ते झाडाच्या ढोलीत खोबणीत ठेवून “कोंबडे झोपले’ म्हणायचे. बाभळीच्या गोल गोल शेंगा तोडून त्या पैंजण, जोडवी म्हणून पायाला बोटाला बांधून जोरजोरात पाय आपटायचे आणि शेंगा खूळ खूळ वाजवायचो. चिंचेचा कोवळा पाला, कोवळ्या चिंचा ओरबाडून खाणे किंवा त्यात मीठ टाकून दगडावर चेचून खाणे, जुन्या वहितली कोरी पाने काढून त्यांची वही शिवणे, फाटकी पुस्तके चिकटवणे हे असायचे.
तीन टाइम पोटभर जेवायचो, डाळींची किंवा वाळल्या कडधान्यांची आमटी न भाकरी, भाजी क्वचितच, दूध क्वचितच, भात फक्त संध्या काळीच तोही रेशनच्या तांदळाचा. भाजलेली चवळी, मूग, हरभरे, फुटाणे, चुरमुरे मक्याची कणसे, भुईमुगाच्या ओल्या शेंगा, सिजन मध्ये चवळी-मुगाच्या ओल्या शेंगा, ऊस, ज्वारीचे गोड बांड (ज्वारीचे टणक ताट), ज्वारीचा हुरडा, हरभऱ्याचे डहाळे, मक्याची भाजलेली, उकडलेली, वाफवलेली कणसे, गाजरं, केळी, हिरव्या-पिकल्या चिंचा हे आमचे वरचे खाऊ होते.
बिस्कीट, ब्रेड, पाव असले खाऊ आमच्या आसपास ही फिरकत नव्हते. चहाबरोबर कधीतरी शिळी चपातीच. कधीतरी पाच-दहा पैशांचा बटर बुडवून खायला मिळायचा.पाहुणे आले तर तेही चपाती उसळ किंवा भजी, वड्याच आणायचे त्यामुळं बेकरी वस्तूंना किंमत नव्हती.उन्हाळ्यात करवंद जांभळं, चोखून खायचे छोटे आंबे रानात-काट्याकुट्यात हिंडून खायचो. कुठल्याही विहिरीचे, हौदाचे पाणी कचरा बाजूला सारून घटाघटा प्यायचे. पाण्याची बाटली, ब्रिसलरी असलं आमच्या गावीही नव्हतं. दुधाचं रिकामं पातेलं आणि तुपाची बेरी भाकरीबरोबर खायला ‘तू-मी’ व्हायचं. (आज त्याला कोण विचारत पण नाही)
सण समारंभ यायचे जायचे पण ते साधेपणाने यायचे मात्र जीवनाचा आनंद द्विगुणित करून जायचे. पहिली कपडे फाटली की दुसरी नवीन मिळायची. दिवाळी -दसरा असली काय भानगड नव्हती. घरातली कपडे जुनी, फाटकी, शिवलेली असायची. दिवाळीला पहिली फाटली असली तरच नवीन मिळायची अन्यथा मग आहे ती ठेवणीतलीच कपडे वापरायची पण यामुळं दिवाळीचा किंवा कुठल्याच सणाचा आनंद कमी होत नव्हता. ‘मोठे झाले की मिळेल’ हा आशावाद मनात पेरलेला असायचा . आसपासची सर्व सामाजिक परिस्थिती थोड्याफार फरकाने तीच होती त्यामुळं भेदाभेद नव्हताच. भविष्याची चिंता कुणालाच नव्हती, बॅंक बॅलन्स कुणाकडेच नव्हते पण आलेला प्रत्येक दिवस आनंदाने जगत होती माणसं. काटकसर आणि बचतीचा मंत्र रोमारोमात भिनला होता, त्यामुळे उधळ माधळ करून माजायचे नाही हा कानमंत्र होता. काळ बदलत गेला. माणसांकडे आर्थिक सुबत्ता आली त्याचबरोबर अहं आला.
“आम्हाला काय कमी?’ ही भावना बळावली. अंगणे बंदिस्त झाली. त्याचबरोबर शेजाऱ्यांसाठी सदैव खुली असणारी दारे आणि मनाची अंगणेही बंद झाली. आम्ही जिथे जिथे खेळलो, बागडलो ती अंगणे घरानी व्यापली. झाडे पाडली, शेतांचे प्लॉट पडले. सार्वजनिक नळावर जिथ पाणी भरत होतो ते नामशेष झाले. चाफा, कवठ, चिंचेची झाडे कधीच संपली. ‘मी, माझं’ ही चढाओढीची व एकमेकांना मागे टाकण्याची ईर्षा प्रत्येकात निर्माण होऊन काल परवा एका ताटात, एका पंगतीला जेवणारे स्वतःचे वेगळेपण जपू लागले न माणुसकीच्या भिंतीला तडा जाऊन चांगुलपणाच्या वैभवाला उतरती कळा लागली. ज्या मातीच्या घरांत हे अमूल्य वैभव होते त्याजागी भक्कम, पक्के टोलेजंग इमले उभे राहिले फक्त भौतिक श्रीमंतीचे वैभव मिरवत. माझ्या मनात मात्र हे जगलेले वैभवाचे दिवस प्राजक्त रोवून गेलेत, जो कधीही फुले टपटपतो आणि माझ्या स्मृती गंधित करून जातो.
– सुचित्रा पवार