महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं त्या पु. ल. देशपांडे अर्थात भाईंच्या सांगीतिक वाटचालीवर लेखात भाष्य करावयाचे आहे.
भाईंवर खास करून बालगंधर्व आणि मास्टर कृष्णरावांच्या गायकीचा प्रचंड प्रभाव होता. 8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबईला गावदेवी येथे हेमराज चाळीत जन्म झालेल्या भाईंचा तब्बल 20 वर्षांचा कालखंड विलेपार्ले येथे गेला. त्या काळात घरातील वातावरण संगीत आणि साहित्याला पोषक होते. अगदी लहानपणीच भाई हार्मोनियम वाजवू लागले. पु.लं.नी बऱ्याच ठिकाणी “माझं पहिलं प्रेम संगीतावर आहे’ असं सांगून ठेवलंय.
ते म्हणतात, संगीतात जो कैवल्यानंद प्राप्त होतो त्याची सर दुसऱ्या कशात नाही. एवढेच नव्हे तर माझ्या मृत्यूनंतर माझ्या समाधीवर “याने कुमार गंधर्वाचे गाणे ऐकले आहे’ एवढेच लिहा असेही सांगितले होते. तेव्हा संगीत हा पु.लं.चा श्वास होता.
अगदी लहानपणी बालगंधर्व एकदा घरी आले असताना भाईंनी त्यांच्यासमोर त्यांचीच गाणी पेटीवर ऐकवून शाबासकी मिळवली होती. पण पेटीवादनात पु.लं.नी करिअर केले नाही. थोर संगीतज्ज्ञ वामनराव देशपांडे म्हणतात, पु.लं.नी पेटीचा व्यासंग चालू ठेवायला हवा होता. तसे झाले असते तर गोविंदराव टेंभ्यांनंतर पु.लं.चेच नाव घेतले गेले असते, एवढं त्यांचा हात उत्तम होता. पु.लं.नी शास्त्रीय कंठसंगीताचेही धडे घेतले होते. बेळगावला असताना कागलकर बुवांकडे ते गाणं शिकत. 12-15 वर्षे वयात तबल्याचा छंदही त्यांना लागला. त्यांची ग्रहणशक्ती अफाट असल्याने प्रत्येक वाद्यावर हात टाकून बघायचा आणि ते उत्तम वाजवायचे ही त्यांची खासियतच बनली आणि त्यातून एक उत्तम वाद्यमेळकार म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी केल्याचे दिसून येते.
कॉलेजच्या जमान्यात पु.ल. भावगीताचे कार्यक्रम करीत असत. कवी अनिल, ना. घ. देशपांडे, राजा बढे, भा. रा. तांबे, गडकरी मास्तर या नव्या-जुन्या कवींच्या कविता पु.लं.नी आपल्या मैफलीत गाजवल्या. “तुजसाठी राजा, मी लाख बोल साहिले’ ही राजा बढेंची किंवा “नादात गुंगसी जे, शब्दात सांग बाले’ ही बा. भ. बोरकरांची किंवा “नदी किनारी – फार नको वाकू’ ही ना. घ. देशपांड्यांची रचना पु.ल. कमालीच्या तन्मयतेने म्हणत आणि श्रोतृवर्गावर आपली अमीट छाप सोडत.
पु.लं.ना अगदी लहानपणापासून संगीत मैफली ऐकण्याचा शौक होता. पण एक तर लहान वय आणि तिकिटासाठी पैसे नसणे यामुळे फार पंचाईत होई. एकदा एका ठिकाणी मास्टर कृष्णरावांचा कार्यक्रम होता. मैफल ऐकण्याची तीव्र इच्छा पण त्या संस्थेमध्ये कोणाशी काहीच संबंध नव्हता. मग पु.लं.नी एक युक्ती केली. मास्टर कृष्णरावांचा टांगा कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्याबरोबर त्यांनी टांग्यातून त्यांचा तानपुरा उचलला आणि बैठकीवर नेऊन ठेवला. कृष्णरावांना वाटले संस्थेचा स्वयंसेवक आहे आणि संस्थेच्या लोकांना वाटलं कृष्णरावांचा माणूस आहे. पु. लं. मात्र कृष्णरावांच्या अगदी जवळ गाणं ऐकायला बसून गेले. ही ओढ, ही असोशी, ही संगीताविषयीची एकतानता त्यांच्या सांगितिक कारकिर्दीला एका उंचीवर पोहोचविण्यासाठी कारणीभूत ठरली आहे.
पु.ल.ना आयुष्यभराचं व्यसन होतं ते गाण्याचं. मग त्यांनी नाटकात छोट्यामोठ्या भूमिका करण्यासही प्रारंभ झाला. कालखंड मोठा संघर्षाचा होता. वडील नुकतेच गेलेले. फर्गसन कॉलेजला शिक्षण सुरू असताना एका हौशी गटासोबत पुण्याहून मुंबईला “एकच प्याला’ या गडकऱ्यांच्या नाटकात भूमिका करण्यासाठी रेल्वेने पु.ल. चाललेले असताना कर्जतला अवचितपणे नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर डब्यात शिरले. चिंतामणराव आणि पु.ल. त्यापुढच्या प्रवासात त्यांच्या लाडक्या विषयावर बोलण्यात गुंग झाले. विषय होता गडकरी मास्तर! पु.लं.चे उतारेच्या उतारे पाठ आणि नाट्यपदं कंठात बसलेले. उतरताना चिंतामणराव पु.लं.ना म्हणतात, मी नवीन नाटक कंपनी काढतोय, तुम्ही याना तिच्यात.
अर्थात त्या काळात खोटी आश्वासने देण्याऱ्यांचा पु.लं.ना वीट आला होता. त्यामुळे चिंतामणरावांच्या त्या बोलावण्याकडे पु.लं.नी फारसे लक्ष दिले नाही. पण चिंतामणरावांचे बोलावणे खरे होते. एक दिवस एक गृहस्थ पत्ता काढीत पु.लं.कडे आले आणि तेथून ललितकुंज नाटक कंपनीत त्यांची वर्णी लागली. या कंपनीत भावबंधन नाटकात कामण्णा व प्रभाकर, पुण्यप्रभावमध्ये भूपाल, राजसंन्यासमध्ये रायाजी, शारदामध्ये कोदंड, सत्तेचे गुलाममध्ये कान्होबा आदी भूमिका त्यांनी केल्या. चिंतामणरावांनी दिलेले अभिनयाचे धडे आणि शब्दफेकीची संथा पु.लं.ना आयुष्यभर पुरली. ती त्यांच्या संगीत दिग्दर्शनावरही उमटलेली दिसते.
पुलंचे पेटीवादनावरील प्रभुत्व साऱ्यांनाच ठाऊक होते. त्यांनी स्वतंत्र पेटीवादनाचे कार्यक्रम फारसे केले नाही किंवा तसे पूर्णवेळचे ध्वनिमुद्रणही उपलब्ध नाही. पण गाण्यांच्या कार्यक्रमांना मात्र त्यांनी साथ केलेली आहे. मल्लिकार्जुन मन्सूर, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व यासारख्या दिग्गजांसोबत ते साथीला बसले आहेत. मुख्य म्हणजे या साऱ्या लोकांची गायकी वेगवेगळी आहे पण पुलंना आणि गायकांना त्याची अडचण झाल्याचे जाणवत नाही. पेटीची आदर्श साथ ती, जी गायकाच्या बरोबर जाते. गायकाच्या सुरांच्या मागून सावलीसारखं जाणारा वादक उत्तम म्हणवला जातो. मुष्किल जागा काढण्यात पु.ल. तरबेज होते. गायकाला कुठलाही त्रास न होता विरामस्थळात त्याच्या खालू असलेल्या गाण्याला खुलवील अशी साथ पुलं करीत असत.
13 जून 1946 रोजी म्हणजे सत्तावीसाव्या वर्षी पु.ल. सुनिता ठाकूर या रत्नागिरीच्या तरुणीशी विवाहबद्ध झाले. तत्पूर्वी मुंबईच्या ओरिएंट हायस्कूलमध्ये पु.ल. इंग्रजीचे शिक्षक म्हणून रूजू झाले. तेथेच सुनिता ठाकूरही शिक्षिका होत्या. एक लोकप्रिय शिक्षक म्हणून पुलंची प्रतिमा होती. ठाकूर कुटुंब रत्नागिरीचं सधन आणि प्रतिष्ठित कुटुंब होतं. सुनीताबाईंचे वडील वकील होते. स्वतंत्र विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्यांपैकी ठाकून वकील एक होते. त्यामुळे या दोघांच्या विवाहाला कसलीही अडचण आली नाही.
1949 च्या “चले जाव’ चळवळीत भाग घेतल्याबद्दल कॉलेजमधून काढून टाकल्यानंतर बॉम्ब बनवणं, पत्रकं वाटणं, भूमिगत होणं, तुरुंगात जाणं हे सारं सुनीताबाईंनी पूर्वीच अनुभवलं होतं. अशा सुधारकी विचारांच्या सुनीताबाई आणि पु.लं.च लग्न अगदी साधं नोंदणी पद्धतीने 50 रुपयांत झालं. मुख्य म्हणजे ठरलेल्या दिवशी रजिस्ट्रारला वेळ नव्हता म्हणून अगदी अचानक अप्पा म्हणजे पुलंचे सासरे आदल्या दिवशीच त्याला घरी घेऊन आले आणि सह्या करून घेतल्या. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अप्पांनी परिचित स्नेह्यांना चहापाण्याला बोलावलं आणि अप्पांचा जावई उत्तम गायक आहे हे साऱ्यांना ठाऊक झाल्याने मग नवीन जावयाच्या गायनाचीच मैफल साग्रसंगीत पार पडली. पेटी-तबला आणि उत्तम श्रोते यांच्या साथीतं ही मैफल उत्तररात्रीपर्यंत चालली.
पुलंची गाण्यांची निर्मिती दोन स्तरांवरची आहे, भावगीत आणि चित्रपटगीत असे तिचे स्तर आहे. भावगीतात निर्मितीकार मुक्तपणे आविष्कार दाखवू शकतो. चित्रपटगीतात तसे नसते. चित्रपटातील प्रसंगाची पार्श्वभूमी, भोवतीचा परिसर, वेळेची मर्यादा, दिग्दर्शकाचे धोरण या साऱ्यामुळे संगीतकाराच्या स्वातंत्र्यावर बंधन येते. या साऱ्या गोष्टी स्वीकारूनही पु.लं.नी काही संस्मरणीय रचना तयार केलेल्या आहेत. त्यांच्या संगीतरचनेवर मास्टर कृष्णराव यांचा तर गायकीवर बालगंधर्वाचा प्रभाव दिसतो हे मी यापूर्वीच सांगितले आहे.
द्रुतलयीतली गाणी पुलंना बांधायला अधिक आवडतात. शब्दांच्या अर्थाला अनुरूप चाल बांधण्याचे त्यांचे कसबही यामध्ये दिसून येते. पुलंनी 88 चित्रपटगीतांना चाली दिल्या आहेत. त्यापैकी आज निम्म्याच उपलब्ध आहेत. या चालींमध्ये रागांचं वैविध्य दिसून येतं. शंकरा, पहाडी, चंद्रकंस, भीमपलास, पुरिया, केदार, यमन, खमाज, झिंझोटी, काफी, भैरवी असे अनेक राग ते वापरतात. त्यात पुन्हा गाण्यांचा बाजही ते वेगवेगळा हाताळतात. काही ठिकाणी स्त्रीगीते, काही ठिकाणी भजन, काही ठिकाणी हादग्यातली गाणी, काही ठिकाणी ठुमरी, काही ठिकाणी ग्रामीण ढंग असणाऱ्या लोककला असे नाना ढंग दिसून येतात.
एव्हाना पु.लं. सिनेमा आणि संगीतात स्थिरावले असताना साहित्यातही मुशाफिरी करू लागले होते. “अभिरूची’सारख्या तत्कालीन प्रख्यात मासिकात त्यांचे लेखन प्रसिद्ध होण्यास प्रारंभ झाला होता. त्याचवेळी वंदे मातरम्, कुबेर, दूधभात, अंमलदार, घरधनी, देव पावला, मोठी माणसं आणि सबकुछ पुलं असं ज्याचं वर्णन केलं जातं, तो गुळाचा गणपती असे पुलंचे काही गाजलेले चित्रपट आणि त्यातील गाणीही लोकांसमोर आली.
– डॉ. विनोद गोरवाडकर