भोंडल्याच्या किंवा भुलाबाईच्या गाण्यांमध्ये एक गाण विशेषत्वानं महत्त्वाचं आणि लोकप्रिय आहे. ते म्हणजे “कारल्याचं बी पेरं गं सुनबाई, मग जा आपुल्या माहेरा!’ यामध्ये नवविवाहित सुनबाई आपल्या सासुबाईला सांगते की मला माहेराचं बोलावणं आलंयं, जाऊ का मी? पण सासुबाईला सुनेनं एवढ्यात माहेरी जावं असं वाटत नाहीय! म्हणून मग ती सुनेला खूप कामं सांगते. अगदी कारल्याचं बी पेरण्यापासून ते भाजी करून त्याची भांडी घास आणि मग जा माहेरी! सुन बिचारी सगळं काही करते… शेवटी माहेरी जाण्याची परवानगी मला का मागतेस? असा प्रश्न विचारून सासू तिचा हिरमोड करते. खोलात शिरून या गाण्यातला अर्थ जाणून घेतला की, कुटुंबापासून कार्यालयापर्यंत सर्वत्रच असं कारल्याचं बी पेरणारे अनेक जण दिसतात.
सणावारांचे दिवस संपत आले. दिवाळी तसा शेवटचा मोठा सण मानला जातो. त्यानंतर सणवार असतात; पण धावपळ बऱ्यापैकी संपलेली असते. रिकामंपण, हिवाळा आणि आळस हाही एक वेळ घालविण्याचा चांगला उपक्रम आहे. वर्ष संपायला दीड-दोन महिने उरलेले असतात. मनाशी वर्षातील दिवसांचा लेखाजोखा सुरू होतो. आपल्या आयुष्यातील एक वर्ष कमी झालेलं असतं!
नातवंडं जेव्हा दिवाळीत फुलझड्या उडवतात, तेव्हा त्यांच्या निरागस चेहऱ्यावरील आनंदात आपल्या आयुष्याचे प्रतिबिंब पाहावं. वयाचा हिशेब मांडावा आणि ही दिवाळी आनंदात गेल्याचं समाधान मानावं! खरंच मानला तर सुखाचीच पर्वणी नाहीतर… फक्त बेरीज! सुखाची बेरीज वाढवित न्यावी! दु:खाला वजा करीत जावं, मग सुखं म्हणजे नक्की काय असतं! असा प्रश्नच पडत नाही.
सहजचं निवांत बसले असताना भोंडल्यांची गाणी आठवली! इकडे नागपूरकडे त्याला भुलाबाईची गाणी असं म्हणतात. दसऱ्यापासून कोजागिरीपर्यंत या भुलाबाई बसतात. भुला म्हणजे पार्वती आणि भुलोजी म्हणजे शंकर भगवान! हे दोघे माहेरी येतात. काही ठिकाणी महिनाभर, तर काही ठिकाणी पाच दिवस गाणी गातात. कोजागिरीला त्यांचा समारोपाचा दिवस! रात्रभर गाणी गायची, खिरापती ओळखायच्या, खाऊ खायचा आणि भुलाबाईची पाठवणी सासरी करायची. मग ती काही वर्षभर माहेरी येत नाही. आपल्या सणांमागच्या सगळ्याच कथा या नात्यांशी निगडित आहेत.
आज इतकी वर्षं झालीत; पण ठराविक दिवसाला ठराविक सणांची, आठवणींची जोडसाखळी मनात असतेच. आज पुन्हा ती सारी खेळगाणी, लोककला, पारंपरिक गाणी पुनरुज्जीवित झालेली आहेत. कितीही नाही म्हटलं तरी याचे श्रेय दूरदर्शनवरील मालिकांना जातं! नात्यांची गुंफण, सणांचे पारंपरिक सादरीकरण, त्याला अनुसरून वेशभूषा हे मालिकांमध्ये दाखवलं जातंय. त्यामुळे नवीन पिढीला ते आपोआपच समजतंय, हेही तसे थोडके.
या भोंडल्याच्या किंवा भुलाबाईच्या गाण्यांमध्ये एक गाण विशेषत्वानं महत्त्वाचं आणि लोकप्रिय आहे. ते म्हणजे कारल्याचं बी पेरं गं सुनबाई, मग जा आपुल्या माहेरा! नवविवाहित सुनबाई आपल्या सासुबाईला सांगते की मला माहेराचं बोलावणं आलंयं, जाऊ का मी? पण सासुबाईला सुनेनं एवढ्यात मोहरी जावं असं वाटत नाहीय! म्हणून मग ती सुनेला खूप कामं सांगते. अगदी कारल्याचं बी पेरण्यापासून ते भाजी करून त्याची भांडी घास आणि मग जा माहेरी! सून बिचारी सगळं काही करते… शेवटी माहेरी जाण्याची परवानगी मला का मागतेस? असा प्रश्न विचारून सासू तिचा हिरमोड करते. हे गाणं तेव्हा खूप चढाओढीनं गायलं जायचं. त्याचा अर्थ समजत नव्हता, उमगतं तर नव्हताच नव्हता. आज विचार करू जाता त्यातील अर्थ केवळ समजलाच नाही तर उमगला आहे आणि काही प्रमाणात तसं जीवनही जगत राहिलोय. अजूनही विचारलं जातंच ना, “जाऊ का?’
हे कारल्याचं बी फक्त माहेरापुरतं मर्यादित नाही, तर इतरही वेळी फार महत्त्वाचं असतं! एकदा मुलीकडे गेले होते. संध्याकाळचा वॉक करण्यासाठी मुलीनं कौतुकानं शूज वगैरे आणून दिले. बाहेर पडताना मी तिला सांगायचे, जावयाला सांगायचे… “”लवकर येते.” तो नुस्ती मान डोलावायचा. मुलगी मात्र “सावकाश ये’ म्हणायची.
एक दिवस दोघंही हसत होते. मुलगी मला म्हणाली, आई गं, हा म्हणतो, आई रोज का विचारते? रोज का सांगते “बाहेर जाते, इतक्या वेळात येईन. त्यांनी कशाला सांगायचं!”
मी मनात म्हटलं, घरात तर “आंघोळीला जाऊ का?’ हेही विचारावं लागतं! कारल्याची शेती करणारे काही लोक असतात. खरी शेती नाही तर भोंडल्याच्या गाण्यातील कारल्याची शेती! असो. या विचारून करणाऱ्या प्रत्येक कामाची गम्मत आजकालच्या मुलींना नाही कळणार!
नोकरीत असा एखादा बॉस (कारल्याचा शेतकरी) असतो. तुम्हाला सर्व मोकळेपणानं कामं करण्याची परवानगी देतो. आपण एकदम खूश! काय छान वातावरण! एकदम खेळीमेळीचं वातावरण आहे ऑफिसमध्ये. प्रत्येकाला स्वातंत्र्य. फक्त रिझल्ट शंभर टक्के हवा! पण आपल्याही नकळत कारल्याचं बी बरेलेलं असतं. त्याला फुलं येतात. कारलं लागतं.
प्रत्येक कामात निर्णय घेताना विचारावं लागतंय बॉसला… आपलं त्याला काहीच पटत नाहीये… स्वातंत्र्याच्या आड लपलेलं कारलं आता स्पष्ट दिसू लागतं आणि एका अवचित क्षणी गाणं आठवायला लागतं. “कामाचे तास संपूनही एवढं करू जा’, असं म्हणत आपली कामं वेळेच्या नंतरही वाढत राहतात. एक ऑफिसमध्ये आणि एक घरी… पण हे झाडं असतचं. कधी सासूच्या रूपानं, कधी नवऱ्याच्या रूपानं, कधी कधी तर मुलंही या कारल्यासारखीच वागतात. आई गं, येवढं करू दे ना प्लीज! अशा वेळी आपण भोंडल्यातील गाण्यातल्या सुनबाईसारखं “आधी हे करू मग आपलं काम करू’ असं सांगतो. मनासारख्या माहेराला शेवटी मनातच ठेवावं लागतं हे खरं!
शेवटी काय, तर कारल्याच बी पेर गं! हे भोंडल्याचं गीत लहानपणी आपण म्हणतो; पण मोठेपणी ते कायमच आपल्यासोबत चालतं! ही अशी गाणी. माहेराचं अप्रुप… कौतुक… आज नाहीच कळणार! अनेक स्त्री लेखिका, कवियत्री यांनी स्त्री गीतं लिहिली. ती त्या-त्या सामाजीवनाची प्रतिबिंबं होती. त्यात गोडवा होता. आजही आहे. अतिशय सोपे शब्द, संवादात्मक आशय आणि कुणालाही म्हणता येतील अशी सरळ चाल. वयाच्या अशा कोणत्याही टप्प्यावर असताना ती गाणी कोणी म्हणायला सुरुवात केली की आपणही नकळत साथ देवू लागतो. पुढे चंद्राच्या प्रकाशात अंगणात रेखलेला भोंडला किंवा समईच्या प्रकाशातील शंकर पार्वती आणि हातांचा टिपऱ्यांचा ठेका त्यावर ही गाणी पुढच्या साऱ्या आयुष्यातल्या कारल्याच्या बीची ताकद आणि मानसिक बळ देऊन जातात. ही सारी शिदोरी (अर्थात आठवणींची) नेहमीसाठी पुरते.
आपण म्हणतो, का त्या अशा कशा इतक्या आनंदी राहतात घरीदारी एवढी प्रतिकुलता असताना? बाईच्या चेहऱ्यावर कायम हास्य असतं. सगळ्याचं ऐकतात. उत्तर किंवा प्रतिप्रश्न विचारत नाहीत. काय कारणं असावं? मला एवढंच म्हणावंसं वाटतं की, ही आनंदीवृत्ती त्यांना ही शिदोरीच पुरवित असते. कारण कारल्याच बी पेरल्यापासून ते त्याच्या भाजीचं भांडं घासून ठेवण्यापर्यंत लागणारी सहनशक्ती अपार आहे. न संपणारी आहे.
– अरूणा सरनाईक