मुंबई – परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठीच्या निर्बंधामध्ये बदल करण्यात आले आहेत. परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी आरटीपीसीआर अनिवार्य करण्यात आली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलीतील तफावत दूर केली असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केले आहे.
मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. अजित पवार म्हणाले, ओमायक्रॉनच्या बाबतीत आपण अधिक काळजी घ्यायला हवी. काल केंद्र सरकराचे आणि आपल्या नियमावतील थोडीशी तफावत होती, पण रात्री उशीरा एकसारखे नियम असावेत यावर चर्चा झाली. परदेशातून भारतातील विमानतळावर प्रवासी आले तर एकसारखा नियम असावा, असा प्रयत्न आपण केला आहे. देश म्हणून एक नियम असायला हवेत. इतर राज्यातून येणाऱ्यांना 48 तासाचा आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवावा लागतो. आपण इतर राज्यात जातो तेव्हा आरटीपीसीआर रिपोर्ट लागतो, तर आपल्या राज्यात येण्यासाठी लागेल, असे पवार म्हणाले.
शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, शाळांसंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा झाली आहे. 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय झाला तेव्हा नवा विषाणू नव्हता. मुलांच्या आरोग्याचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. काही जण 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करायच्या म्हणत होते. मुंबई महापालिकेने तसा निर्णय घेतला आहे. मुंबईचा कायदा वेगळा आणि इतर महापालिकांचा कायदा वेगळा आहे, असे ते म्हणाले.
मुख्य सचिव म्हणून चक्रवर्ती यांची नियुक्ती
आता मुख्य सचिव म्हणून देबाशिष चक्रवर्ती यांना नियुक्त केले आहे. मुख्य सचिवांना मुदतवाढ द्यायची असेल तर सर्व राज्यांना तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा लागतो. माझ्या माहितीनुसार केंद्र सरकारकडे तीन राज्यांचे प्रस्ताव गेले होते. त्यातील दोन राज्यांच्या मुख्य सचिवांना तीन-तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मात्र कुंटेंना मुदतवाढ मिळाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची नियुक्ती त्याच दिवशी सल्लागार म्हणून केली आहे. यापूर्वी अजय मेहता यांना दोनदा केंद्र सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती, असेही ते म्हणाले.