मुंबई – प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीचा उद्देश हा कॉंग्रेस वगळून प्रादेशिक पक्षांची आघाडी बनवणे हा होता. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थन होते, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ममता बॅनर्जी यांचा कालचा दौरा उद्योजकांना आकृष्ट करण्यासाठीचा नसून तो केवळ बहाणा होता, त्यांचा खरा अजेंडा हा राजकीयच होता. कॉंग्रेसला बाजूला ठेवून देशात आघाडी स्थापन करण्याचा ममतांचा प्रयत्न असून त्याला शरद पवार यांची साथ आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
निवडणुकीचे 2024 हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच आहे, म्हणूनच त्यांना हरण्यासाठी काय करता येईल यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. 2019 च्या निवडणुकीतही असेच प्रयोग झाले. मात्र लोकांनी मोदी यांच्यावरच विश्वास ठेवला. आताही जनता मोदी यांच्यावरच विश्वास ठेवणार आहे, असे ते म्हणाले.
आता कॉंग्रेसला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याने कॉंग्रेसचे नेते सावध झाले आहेत. ते प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे आता तुमचा आधी अंतर्गत सामना काय होतो हे ते पाहतील आणि त्यानंतर ते आमच्याशी कसे लढायचे ते ठरवतील, असा उपहासही त्यांनी केला.
ममता बॅनर्जी या थेट बोलतात आणि शरद पवार यांची बिटविन द लाइन बोलण्याची पद्धत आहे. ममता म्हणाल्या की देशात यूपीए अस्तित्वात नाही, ज्यांना लढायचेच नाही त्यांना आम्ही काय करणार आणि शरद पवार म्हणाले की जे कोणी भाजप विरोधात लढायला तयार आहेत असा सर्वांनाच घेऊन आम्ही आघाडी स्थापन करू. ममतादीदी आणि शरद पवार या दोघांचे बोलणे एकच आहे, असे फडणवीस म्हणाले.