मराठी कॅलेंडर उघडलं की चैत्र ते फाल्गुन प्रत्येक महिन्यांत सण असतातच आणि ते सण साजरे करणं ही आपली संस्कृतीच आहे. कुटुंबातील स्त्री पुरुष यांची दिनचर्या त्यानुसार ठरत असे. त्या दिवशी तो विशिष्ट सण का साजरा करायचा याची कारणे कहाण्यांमध्ये सांगितलेली असतात. कुठलीही नवी गोष्ट सुरू करायची तर ती यशस्वी व्हावी म्हणून चांगली वेळ, मुहूर्त बघितला जातो.
मग ते प्रवासाला जाणं असो, घरबांधणी असो, व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणं असो, नवी खरेदी असो, महत्त्वाची खरेदी असो, अगदी पेशंटला हॉस्पिटलमधून घरी आणणं असो, एखाद्या गर्भवतीचं सिझेरियन असो त्यासाठी योग्य वेळ पाहिली जाते. लग्न ठरवायला जाताना, मुलगी/मुलगा बघायला जाताना. मोठे व्यवहार करताना चांगली वेळ काळ पाहिला जातो. गुढीपाडव्याच्या सणापासून सुरू झालेले हे सण उत्सव फाल्गुन महिन्यात होळीलाच थांबतात.
आपले सण शेतीशी निगडित वेगवेगळ्या कृतींशी जोडलेले आहेत.आपल्या आरोग्याशी निगडीत आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्या उत्सव प्रियतेशी निगडित आहेत. शिवाय नातेसंबंध जपणं आहेच. पर्यावरणाबाबत आपण अलीकडच्या काळात जागरूक झालो आहोत. पण आपल्याला याविषयी पूर्वीपासून संदेश मिळत होते.
श्रावणात कधी ऊन कधी पाऊस, हिरवाई असते. मनही आनंदलेली असतात. त्यामुळे तेव्हा सण जास्त असतात. भाद्रपदात आधी पडलेल्या पावसाने झाडे बहरलेली असतात. त्यामुळे हरितालिका आणि गणपती यांना फुलं आणि पत्री दोन्ही वहाण्याचे महत्त्व आहे. झेंडूच्या फुलांचे महत्त्व दसऱ्याला आहे. तेव्हा ती फुले येतात. म्हणून शस्त्रांची पूजा, वाहनांची पूजा झेंडूच्या फुलांनी करतात. शिवाय ही फुले दोन तीन दिवस सुकत नाहीत.
आपट्याचं झाड तेव्हा बहरतं. पाठोपाठ येणाऱ्या दिवाळीत शेतीचा पहिला हंगाम संपून नवीन पिके येतात. त्याच्या हातात थोडा पैसा आलेला असतो वेळही असतो म्हणून दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यापूर्वी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. दिवाळीत थंडी असते. भूक लागते आणि पचनही व्यवस्थित होतं. त्यासाठी फराळाचे वेगवेगळे पदार्थ करून पोटाचे आणि जिभेचे लाड करणं.
एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावीशी वाटते. काही वर्षांपूर्वीपर्यंत चिवडा, लाडू, शंकरपाळी हे पदार्थ फक्त दिवाळीतच व्हायचे त्यामुळे त्याचं कौतुक होतं. दिवाळीची वाट पाहाण्यात मजा होती. आता मात्र बारा महिने हे पदार्थ मिळतात. दिवाळीचा संदर्भ सांस्कृतिक कारणांशी जोडल्याने “दिवाळी पहाट’ हे संगीताचे कार्यक्रम बहुतेक दिवाळीत रोज असतात.
इतर वेळी भेटी, एकत्र वेळ घालवणे होत नाही म्हणून दिवाळीत एकमेकांकडे फराळ, गप्पा यांचा आस्वाद घ्यायचा. नातेवाईकांनी एकमेकांकडे जायचं किंवा जवळपास सहलीला जायचं. जेणेकरून एकत्र वेळ घालवून सहवासाचा आनंद घ्यायचा. आपले नव्या वर्षातले संकल्प सांगायचे. आपल्याला जे मिळाले आहे त्यात देवाचा वाटा आहे म्हणून देवदिवाळी साजरी केली जाते. खंडोबाचे नवरात्र साजरे केले जाते. अनेक जणांचा या तिथी, सण, उत्सव यावर विश्वास नसतो. ते पाश्चात्यांचं अनुकरण करतात. म्हणून मातृदिन, पितृदिन, भगिनी दिन आपण साजरे करतो यानिमित्ताने त्यांना भेटणं, त्यांची आठवण आहे हे त्यांना जाणवून देणं यातून आपली उत्सव प्रियता दिसते.
दानाचे महत्त्व या सणांशी निगडित आहे. प्रत्येक सणाला वेगवेगळ्या गोष्टी दान करणे. जानेवारी महिन्यात संक्रांतीला आपल्या शरीराला थंडीमुळे उष्ण पदार्थांची गरज असते म्हणून तीळ, गूळ, गुळाच्या पोळ्या केल्या जातात. माघात थंडी जास्त म्हणून होळी पेटवली जाते. त्या काळात पानगळ झालेली असते त्यामुळे झाडांच्या काटक्या जाळायच्या, वर्षांतला शेवटचा सण म्हणून वर्षभरात ज्यांच्यावर राग असेल, त्यांना होळीच्या वेळी शिव्या देणं आणि राग, द्वेष होळीत जाळून टाकणे आणि चैत्र महिन्यात सुरू होणाऱ्या नव्या वर्षाला मोकळ्या मनाने, आनंदाने सामोरं जाणं.
डॉ. नीलम ताटके