राजकीय व्यवस्थापनाबाबत जाणून घेऊन फक्त ती राजकीय प्रक्रिया कशी आहे यामध्ये न अडकता राजकीय व्यवस्थापनाचे पैलू जाणून कामाला लागले पाहिजे. राजकीय नेतृत्व घडत असताना महत्त्वाची बाब म्हणजे कार्यकर्त्यांना जबाबदारीचे योग्य पद्धतीने वाटप करून त्यांच्याकडून सुसंवादाच्या माध्यमातून ते काम करून घेण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. त्यामुळे नक्कीच प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल आणि तो कार्यकर्ता कायमस्वरूपी सोबत राहील.
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. सत्तर टक्के जनता ही खेड्यापाड्यांत राहते. त्याचबरोबर भारत देशात सर्वात जास्त युवकांची संख्या आहे, असे अनेक सर्वेक्षणातून, संशोधनातून आढळून आलेले आहे. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. सर्व जाती, धर्म, पंथ गुण्यागोविंदाने नांदताना याठिकाणी दिसत आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये विविध विचारसरणीचे विविध पक्ष कामकाज करताना दिसत आहेत.
राजकीय पक्षांमध्ये काम करणारे कार्यकर्तेसुद्धा जी विचारसरणी आपणाला पचते त्या विचारसरणीचा राजकीय पक्ष स्वीकारतात. परंतु अनेक वेळा युवकांमधील आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी यामुळे विचारधारेचा विचार न करता फक्त आपला स्वार्थ आणि लालसेपोटी एखाद्या पक्षाचे काम करताना दिसून येतात. अशा प्रकारे काम करताना अनेक वेळा अशी वेळ येते की, त्या युवकांना पक्षातील पदाधिकारी नेते टिशू पेपर सारखे वापरतात.
खूप वेळ झाल्यानंतर कळून येते, त्यावेळी या युवकांचे वय आणि जबाबदारी फार पुढे गेलेली असते. असे युवक त्यानंतर व्यसनाधीनता, अवैध धंदे, हाणामारी, गुंडागर्दीकडे वळताना दिसून येतात. अशा युवकांवर अनेक वेळा पोलीस केसेस दाखल होतात. काही काळ त्यांचा नेता त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु बराच कालावधी गेल्यानंतर सर्व कोर्ट केसेस बाबत खर्च आणि वेळ हा त्या युवकांना द्यावा लागतो. या पोलीस केसेसमुळे त्यांना रोजगारापासून वंचित राहावे लागते.
शासकीय-निमशासकीय नोकरीपासून वंचित राहावे लागते. अशा बाबी त्यांच्यासमोर आल्या की त्यांना फक्त पश्चातापा शिवाय काहीच जवळ राहत नाही. मग या सर्व गोष्टी टाळायच्या असतील तर आजच्या युवकांनी सतर्क राहिले पाहिजे.
राजकारण आणि पैसा हे समीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. राजकारणात काम करताना आपली आर्थिक परिस्थिती ही मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून योग्य ठिकाणी पैसा उपयुक्त असतो. तो जर असेल तर आपणाला अनेक अडचणी सोडविता येतील. अनेक अडचणीच्या वेळेस आपली अशी स्थिती होते की “चणे आहेत तर दात नाहीत’ मग अशावेळी आलेली संधी आपल्यापासून दूर जाते. त्यामुळे आर्थिक परिस्थितीसुद्धा आपण सुधारली पाहिजे.
आपण राजकारणामध्ये काय करणार आहात, ते ध्येय आपले प्रथम निश्चित केले पाहिजे. मगच त्या कामाच्या माध्यमातून तुमची स्पष्टता त्या वेळेच्या बाबतीत जाणवेल आणि तुम्ही आत्मविश्वासाने काम कराल आणि आपले ध्येय गाठाल.
राजकारणात सकारात्मक नकारात्मक तटस्थ परिस्थिती उद्भवू शकेल त्याबाबत परिस्थितीनुसार आपणाकडे नियोजन असले पाहिजे. जर नियोजन नसेल तर आपण अडचणीत येऊ. ते न होण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी आवश्यक आहे. राजकारणाशी संबंध असणाऱ्या नवनवीन संकल्पना शोधून त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आपण स्वीकारलेल्या राजकीय पक्षाची विचारधारा व कार्यकर्ते वाढीसाठी सतत प्रयत्नशील राहावे लागेल. जेणेकरून आपली आपल्या पक्षाची वैचारिक व सांघिक ताकद वाढेल.
आपल्या राजकीय परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांच्या बाबतीत एक ना धड भाराभर चिंध्या, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नये. कारण कार्यकर्ता हीच नेत्याची ताकद आणि ओळख असते. जेवढी कार्यकर्त्यांमध्ये धमक असते त्यापेक्षा दहापटीने नेत्यांमध्ये धमक निर्माण व्हायला कार्यकर्ते कारणीभूत असतात. आपल्या अंगी निर्णयक्षमता असणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा एखादा राजकीय निर्णय घ्यावयाचा असतो तेव्हा तो निर्णय पूर्णक्षमतेने घेणे जरुरीचे आहे.
या सर्व बाबींचा विचार केला असता सध्याची राजकीय सामाजिक परिस्थिती आणि युवकांची भूमिका ही फार अंधकारमय दिसून येत आहे. फक्त पैसा, गुंडा गर्दी, राडारोडा, वारसदार या बाबींना फार मोठ्या प्रमाणात महत्त्व दिले जाते. त्यामुळे राजकारणात हाडाच्या युवकांची संख्या फार कमी दिसून येत आहे. उगीच झेंडा आणि दांडा याचा विचार कराल तर स्वतःला बरबाद कराल.
एक दिवस असा येईल की, हताश होऊन पश्चाताप करत बसाल. असे होऊ नये म्हणून ध्येयवादी, सत्यवादी, विकासात्मक संघटन कौशल्याच्या अनुषंगाने आपल्या विचारधारेशी प्रामाणिक राहा. आजच्या युवकांना राजकारण, समाजकारण समजण्यासाठी हा विचार प्रपंच मांडलेला आहे. भविष्यात प्रगत देश म्हणून आपला भारत देश ओळखला जावा यासाठी हाडाच्या युवकांनी राजकारणात हिरीरीने सहभाग घ्यायला हवा.
डॉ. खुशाल मुंढे