खुप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या ओळखीच्या गृहस्थांचा फोन आला, काही विशेष नाही. पण घरी या ना ग मारायला. कधी येताय्? त्या गृहस्थांच्या आवाजातील काहीशा तातडीची जाणीव झाल्यामुळे मी त्यांच्या घरी गेलो. चहा-पाणी झाल्यावर त्या गृहस्थांनी माझ्या काही विनोदी किश्शांची आठवण काढली आणि ते पुन्हा सांगण्याची विनंती केली. मग काय एकामागोमाग एक अशी गमतीशीर गप्पांची आणि आठवणींची मैफलच रंगली.
घरातील सर्व जण म्हणजे त्या गृहस्थांची पत्नी, ते स्वत: आणि त्यांचा मुलगा हे अक्षरश: हास्यरसात बुडून गेले. मलाही खूप बरं वाटलं. पुढे काही दिवसांनी ते गृहस्थ पुन्हा भेटले असताना त्यांनी मला बोलावण्याचं कारण सांगितलं आणि मी थक्कच झालो. त्यांच्या घरात पत्नीच्या सततच्या आजारामुळे आणि मुलगा नोकरीत टिकत नसल्यानं वैफल्य आणि विषण्णता आली होती.
कुटुंबातील संवाद जवळ जवळ नाहीसा झाला होता. अशा परिस्थितीत वातावरण हलकं आणि आनंदी करण्यासाठी मला बोलावलं होतं. हाच तो “प्लॅसिबो’ परिणाम. पुढे हुरूप येऊन मुलाला नोकरीत स्थैर्य आलं. पत्नी मात्र दुर्दैवानं वर्षभरात देवाघरी निघून गेली.
प्लॅसिबो म्हणजे व्यक्तीच्या श्रद्धेमुळे आणि विश्वासामुळे बरं वाटण्याची प्रक्रिया. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा विश्वास असेल की अमुक-अमुक डॉक्टरचं औषध फार गुणकारक असतं तर त्या डॉक्टरनं एखादी लिमलेटची गोळी किंवा साधं पाण्याचं इंजेक्शन दिलं तर त्या व्यक्तीला बरं वाटू लागतं. हे सगळं प्लॅसिबो परिणामामुळे घडतं!
प्लॅसिबो या लॅटिन शब्दाचा अर्थ मी सुखदायक होईन असा आहे. अनेक देशांमध्ये प्लॅसिबो ही एक व्यवस्था-स्वीकृत उपचारपद्धती आहे. या उपचारपद्धतीत रुग्णाचा कोणत्या डॉक्टरवर किंवा उपचारपद्धतीवर गाढ विश्वास आहे ते पाहिलं जातं आणि मग निरुपद्रवी औषधं किंवा पदार्थांचा वापर करून त्या व्यक्तीला बरं करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक मनोरुग्णांवर या पद्धतीचा चांगला उपयोग झाल्याचं दिसून आलं आहे. काही खेडूत डॉक्टरकडे डागदरसायेब, वाईच सुई टोचा की अशी मागणी करताना आढळून येतात. याचा अर्थ त्यांचा इंजेक्शन या उपचारपद्धतीवर गाढा विश्वास असतो.
जरा खोलवर विचार केला तर असं आढळून येईल की प्लॅसिबोचा आपल्या मानसिकतेशी जवळचा संबंध आहे. आपल्याला आवडणारा माणूस वेळप्रसंगी चुकीचं बोलला किंवा वागला तरी आपण त्याबद्दल वाईट वाटून न घेता स्वत:ची समजूत घालून घेतो. नावडतीचं मीठ अळणी या आपल्याकडील वाक्प्रचारात हेच सुचवायचं आहे की नावडतीनं मीठ घातलं तरी ते आपल्याला अळणी लागतं. याउलट आवडत्या व्यक्तीनं मीठ नाही घातलं तरी ते आपल्याला अळणी वाटत नाही-ठीकच वाटतं!
आनंद चित्रपटात डॉ. कुलकर्णी (रमेश देव) त्याच्यावर दृढ विश्वास असलेल्या एका रुग्णाला अशाच प्रकारे काही लाल, हिरव्या आणि पिवळ्या गोळ्या देऊन त्या विशिष्ट वेळी घ्यायला सांगतात. खरं तर त्या रुग्णाला काहीही झालेलं नसतं. तो उगीचच प्रकृतिचिंतेनं ग्रस्त असतो. त्याचप्रमाणे त्या रंगीत गोळ्यांतही काही दम नसतो. पण त्या गोळ्या डॉ. कुलकर्णींनी हातात ठेवल्याबरोबर तो रुग्ण उत्साहित होऊन बरा झालेला दाखवलं आहे. हा प्लॅसिबो परिणामाचाच प्रकार आहे.
काही काळापूर्वी होमिओपॅथी या उपचारपद्धतीला अनेक तज्ज्ञांनी ती प्लॅसिबो प्रकारात मोडत असल्याचा दावा केला होता. त्यामागे होमिओपॅथीमधील औषधांची मात्रा खूपच सूक्ष्म असल्यानं जर परिणाम होत असेल तर तो केवळ उपचारपद्धतीवर विश्वास असल्यामुळेच होत असला पाहिजे असा विचार व्यक्त केला गेला होता.
संत-महात्म्यांनी केवळ दुखऱ्या भागावरून हात फिरवल्यानं, आशीर्वाद दिल्यानं अथवा प्रसाद दिल्यानं रोग बरा झाल्याचं श्रद्धाळू लोक छातीठोकपणे सांगतात यामागेही प्लॅसिबो परिणामच आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.
काहीही असो. मी सुरुवातीला दिलेल्या उदाहरणाप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला दुसरी प्रेमळ व्यक्ती केवळ भेटल्यानं आणि बोलल्यानं जर बरं वाटत असेल तर ते ठीकच आहे, असं मला वाटतं. असा प्लॅसिबो समाजात वाढीस लागायला हवा. करोना साथीमध्ये मात्र कुणाची भेटगाठ घेता न आल्यानं प्लॅसिबोनं हात दिला नसणार!
श्रीनिवास शारंगपाणी