पुढील काही महिने केवळ कॉंग्रेससाठीच नव्हे तर बिगर-भाजप, बिगर-एनडीए अशा सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कॉंग्रेसने आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर केल्यास पक्षाला 2024 मध्ये लोकसभेच्या निम्म्यापैकी निम्म्या म्हणजे 136 च्या आसपास जागा जिंकता येऊ शकतात. कॉंग्रेसला सोबत न घेता शरद पवार, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन आणि अन्य प्रादेशिक नेत्यांची एकजूट करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय राजकारणात निरर्थक आणि अप्रासंगिक ठरू शकतो.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या राष्ट्रीय राजकारणामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. अलीकडेच त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतरच्या वार्तालापात बोलताना त्यांनी यूपीए अस्तित्त्वातच नसल्याचे वक्तव्य केले. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणाने कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे.
कॉंग्रेस संपत चालली आहे किंवा त्याच मार्गाने पुढे चालली आहे, अशी भविष्यवाणी जे करतात, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, कॉंग्रेस आजही पूर्णांशाने सक्रिय आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांप्रमाणेच पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील निकालांमधून असे संकेत मिळतात, की मतदार भाजपला सावध होण्याचा इशारा देत आहेत.
कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये तृणमूल कॉंग्रेसकडून केली जात असलेली घुसखोरी तसेच त्रिपुरा, गोवा, आसाम आणि अन्य ठिकाणी तृणमूलच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना फोडण्यासाठी प्रयत्नशील असलेली तृणमूल कॉंग्रेस त्रिपुरा, गोवा, आसाम आणि अन्य राज्यांत मोठ्या महत्त्वाकांक्षेसह निवडणुकीच्या शर्यतीत सामील झाली आहे. या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जाण्याने सर्वांत जुन्या अशा कॉंग्रेस पक्षाचे मनोबल खच्ची होईल, असाही प्रचार केला जात आहे. तसे पाहायला गेल्यास, ईशान्येकडील राज्यांमधील राजकारणाची दखल अभावानेच घेतली जाते.
संयुक्त जनता दल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही ईशान्येकडील राज्यांमध्ये पकड असल्याचे दाखवून दिले होते, त्याला फार दिवस झालेले नाहीत. त्यानंतर भाजपने सिक्कीम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आदी राज्यांत आयाराम-गयारामची कला आत्मसात केल्याचेच सिद्ध करून दाखविले होते.
ममता बॅनर्जी यांचा पक्ष कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यामुळेच अस्तित्वात आला आहे, हे विसरता कामा नये. प्रणव मुखर्जी, सीताराम केसरी आणि पी. व्ही. नरसिंहराव यांच्या राजकारणामुळेच ममता बॅनर्जी यांना कॉंग्रेसमधून बाहेर पडावे लागले होते. त्यात नेहरू-गांधी कुटुंबाची किंवा राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल किंवा प्रियंका गांधी यांची कोणतीही भूमिका नव्हती. ममतांचे सोनियांबरोबर अनेक दशकांपासून चांगले संबंध राहिले आहेत.
ममतांचे कार्यालय आणि त्यांच्या घरीही राजीव गांधी यांचे छायाचित्र आजही प्रामुख्याने पाहायला मिळते. विचारधारेचा विचार करताना तृणमूल कॉंग्रेसचा जाहीरनामा पाहिल्यास तो सामाजिक आणि आर्थिक बाबतीत कॉंग्रेससारखाच असल्याचे आढळून येते. या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या महत्त्वाकांक्षी नेत्यांवर नियंत्रण ठेवण्यात ममता बॅनर्जींमुळे मदत होत आहे,
तोपर्यंत ममतांची आगेकूच सोनिया, राहुल आणि प्रियंका यांना अजिबात खटकणार नाही, याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. केजरीवाल पहिल्या दिवसापासूनच दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, गोवा, गुजरात आदी राज्यांत कॉंग्रेसवर टीका करण्यात अग्रेसर राहिले आहेत. यातील गोवा वगळता अन्य राज्ये तृणमूल कॉंग्रेसच्या दृष्टीने वर्ज्यच राहिली आहेत.
कॉंग्रेस आणि बिगर-भाजप, बिगर-एनडीए पक्षांची वाटचाल 2024 च्या लोकसभा निवडणुकीशी जोडलेली आहे, हे या ठिकाणी आपण विसरता कामा नये.
कॉंग्रेस आपल्या अंतर्गत व्यवस्थेची घडी बसविण्यासाठी आणि आपल्या नेतृत्वाच्या मुद्द्याचे निराकरण करण्यासाठी संघर्ष करीत आहे. कॉंग्रेसला केरळ, पंजाब, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, कर्नाटक, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि अन्य काही राज्यांमधून लोकसभेच्या 100 पेक्षा अधिक जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, एम. के. स्टॅलिन, व्ही. कुमारस्वामी, चंद्राबाबू नायडू, अखिलेश यादव आणि अन्य नेत्यांच्या बिगर-भाजप, बिगर-एनडीए पक्षांना संसदेतील एकूण जागांपैकी 150 जागा जिंकण्याची गरज भासेल.
सध्याचे हे राजकीय चित्र सर्वांना पटणारे आहे. कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वालाही, लोकसभेच्या 50 जागा जिंकण्याची तृणमूलची इच्छा समजू शकते. असे झाल्यास बिगर-एनडीए आणि बिगर कॉंग्रेसी पक्षांमध्ये ममता बॅनर्जींना समान दर्जा प्राप्त होईल, हेही कॉंग्रेसला माहीत आहे. कॉंग्रेस आणि नेहरू-गांधी कुटुंबाचा विचार करायचा झाल्यास, पक्षाला स्वबळावर 100 पेक्षा अधिक जागा जिंकल्यानंतरच पंतप्रधानपदाची संधी मिळू शकेल. हेच कॉंग्रेसचे लक्ष्य असेल.
जर कॉंग्रेस पंजाबात पराभूत झाली किंवा उत्तराखंडमध्ये सत्तेत परतण्यात पक्षाला यश आले नाही किंवा गोवा, मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आले तर कहाणी पूर्णपणे बदलून जाईल. अशी अवस्था कॉंग्रेसमध्ये फूट पडल्याने किंवा कॉंग्रेसमधून पक्षांतरे झाल्याने उद्भवू शकते. आतापर्यंत कॉंग्रेसच्या ज्या नेत्यांची निष्ठा अढळ होती, त्यांचा धीर सुटत चालल्याचे दिसू लागले आहे. त्यातूनच मतभेद आणि निष्क्रियता निर्माण झाली आहे.
कॉंग्रेसने पंजाब आणि राजस्थानात अशाच प्रकारची संकटे झेलली आहेत. काही व्हर्च्युअल अंतर्गत बैठकांमध्ये मामला इतका पुढे गेला की, नेत्यांनी एकमेकांविषयी अपशब्द काढले. सोनिया गांधींनीसुद्धा या गोष्टी पाहिल्या आहेत. अठराव्या लोकसभेत 100 पेक्षा अधिक खासदारांचा आकडा गाठण्यासाठी आणि चर्चेत कायम राहण्यासाठी कॉंग्रेसला बरेच काही करावे लागणार असून, त्यासाठी आतून आणि बाहेरूनही पक्षावर दबाव आहे.
पक्षाचे प्रमुखपद स्वीकारण्यात राहुल गांधींनी दर्शविलेली अनुत्सुकता वातावरण आणखी विचित्र बनवीत आहे. विरोधाभासाच्या वातावरणातच पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकांना सामोरा जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिगत रेटिंग, मोठ्या विकास योजना, कोविड-19 व्यवस्थापन याबरोबरच प्रचंड मोठे लसीकरण अभियन, मुत्सद्देगिरीत मिळालेले यश, राममंदिरासारखे भावनात्मक मुद्दे अशा सर्व मुद्द्यांचा वापर करण्यास भाजप त्यावेळी उत्सुक असेल.
दुसरीकडे कॉंग्रेस राज्यांमधील अशा प्रादेशिक सहकारी पक्षांच्या भरवशावर असेल ज्यांचा दबदबा निवडणुकीवर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरे, शरद पवार, एम. के. स्टॅलिन, नवीन पटनायक, व्ही. कुमारस्वामी, चंद्राबाबू नायडू, अखिलेश यादव आदी नेत्यांनी जर संसदेतील जागा मोठ्या संख्येने ताब्यात घेण्यात यश मिळविले तर कॉंग्रेसला राजस्थान, हरियाणा, पंजाब, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम आणि ईशान्येकडील अन्य राज्ये, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांत चांगली कामगिरी करावी लागेल. जिथे कॉंग्रेसची थेट टक्कर भाजपशी आहे, अशा भागांत चांगले यश मिळवावे लागेल.
कॉंग्रेसने डाव्या पक्षांसह बिगर-एनडीए पक्षांबरोबरही सेतू जोडून ठेवला आहे. विविध राज्यांत महाआघाड्या तयार करता याव्यात हा त्यामागील उद्देश आहे. अशा महाआघाड्या तयार करण्यासाठी गरज पडल्यास सोनिया गांधींना पुढे आणले जाऊ शकते. काहीही झाले तरी पुढील काही महिने केवळ कॉंग्रेससाठीच नव्हे तर बिगर-भाजप, बिगर-एनडीए अशा सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.
आपल्या घराची डागडुजी करणे, नेतृत्वाचा तिढा सोडविणे, पंजाबात सत्ता कायम राखणे आणि उत्तराखंडमध्ये जिंकणे यासाठी कॉंग्रेसने आपल्या क्षमतांचा केलेला वापर पक्षाला 2024 मधील लोकसभेच्या निम्म्यापैकी निम्म्या म्हणजे 136 च्या आसपास जागा जिंकण्यास सहाय्यभूत ठरू शकतो. कॉंग्रेस पक्षाला सोबत न घेता शरद पवार, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन आणि अन्य प्रादेशिक नेत्यांच्या पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय राजकारणात निरर्थक आणि अप्रासंगिक ठरू शकते.
– रशिद किडवई,
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक