श्रीकांत कात्रे
घरबसल्या काही उद्योग व्यवसाय करून काही उत्पन्न मिळवायला हवे, असा विचार अनेक जण करतात. पण प्रत्यक्ष कृती करून स्वावलंबी होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी जिद्द लागते, कष्ट करण्याची तयारी लागते. असा संघर्ष केला रोहिणी मोरे यांनी. घरातूनच व्यवसायाचा श्रीगणेशा करत त्या स्वावलंबी झाल्या. एवढेच नव्हे तर स्वतःच्या व्यवसायात स्थिरता मिळवतानाच त्यांनी इतर महिलांनाही स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांच्या व्यवसायात स्पर्धा मोठी असली तरी त्यांनी वेगळेपण जपत आपला जम बसविला. आता इतर महिलांना मदत करण्याच्या हेतूने त्यांना व्यवसाय अधिक वाढवायचा आहे…
दुसऱ्याकडून वस्तू विकत घेऊन त्याची विक्री करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःचेच उत्पादन घेऊन मार्केटिंग केले तर अधिक फायदा होऊ शकतो, या विचारातून चिपळूणच्या रोहिणी मोरे यांनी घरगुती स्वरूपात पापड तयार करून विक्री करण्याचे ठरविले. त्यापूर्वी त्या औषध दुकानदारांना लागणाऱ्या छोट्या कागदी पिशव्याही तयार करायच्या. त्या बचत गटाचे काम करीत होत्या. त्यामुळे काही घरगुती स्वरूपात उद्योग सुरू करावा, असे त्यांना वाटत होते.
घरबसल्या पापडाचे उत्पादन घेऊन व्यवसाय करण्याचे त्यानी निश्चित केले. अर्थातच पापड व्यवसायात मोठी स्पर्धा असली तरी पापडाची चव आणि विविधता जपत त्यांनी हळहळू व्यवसायात जम बसविण्याचे प्रयत्न सुरू केले. सुरवातीला खूप संघर्ष करावा लागला. बाजारातील दरापेक्षा दुकानदार कमी दराने पापड विकत घ्यायचे. पण त्यांनी चिकाटी सोडली नाही. हाताने पापड तयार करायचे आणि मार्केटिंगसाठी प्रयत्न करायचे अशी सुरवात झाली. आता त्या गरजू महिलांना पापड तयार करण्याचे काम देऊन त्यांना रोजगार देऊ लागल्या आहेत. पण अशी स्थिती येण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. माणदेशी फाउंडेशनचे त्यांना सहकार्य मिळत गेले. त्यात विशेषतः मार्केटिगसंदर्भात झालेल्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या व्यवसायाला गती मिळाली. माणदेशीने उद्योगांची पाहणी करण्यासाठी महिलांची सहल नेली होती. त्यावेळी त्यांना पापड तयार करण्याची मशीन पाहयला मिळाली. ही मशीन उपयोगाची आहे, असे त्यांना वाटले. चार पैसे अधिक मिळवायचे असतील तर ही मशीन घेतली पाहिजे, अशी खूणगाठ बांधून त्यांनी प्रयत्न सुरू केले. मग 50 हजार रुपये कर्ज काढून त्यांनी मशीन खरेदी केली.
उडीद, पोहे असे नेहमीचे पापड तयार करण्याबरोबरच नाचणी, टोमॅटो, मिरची ठेचा, पालक, शाबुदाणा, बटाटा असे सर्व प्रकारचे उत्पादन त्या घेऊ लागल्या. मार्केटिंगसाठी माणदेशीकडून त्यांनी तंत्र शिकून घेतले. पॅकेजिंग, अकाउंटस, डीजिटल मार्केटिंग यासाठीही त्यांना मार्गदर्शन मिळाले. चिपळूण परिसरासह गुहागर, मार्गताम्हाणे अशा गावांमधील दुकानांमधून त्यांचे पापड दिसू लागले. त्याचबरोबर मुंबई, पुणे अशा शहरांतून येणाऱ्या चाकरमान्यांकडूनही उत्पादनाला मागणी येऊ लागली. दुबईतून येणारे या भागातील काही लोक परत जाताना मोरे यांचे पापड घेऊन जातात, ही बाब त्यांनी जपलेल्या दर्जाला दाद देणारी आहे. शिमगा, गणपती अशा सणांसाठी मुंबईतून येणारे कोकणातील चाकरमानी म्हणजे या पापडांचे ग्राहक असल्याचे त्या सांगतात. रोज एक हजारांपर्यंत पापड तयार करतात. एकच मशिन आहे.
मशीन चालविण्यावर पापड किती गतीने करता येतो, याचा अंदाज येतो. पापडाचे काम करण्याबरोबरच त्या पूर्वीप्रमाणे औषधांच्या दुकानासाठी कागदी पाकिटेही तयार करून देतात. साधारणतः एक ते दोन हजार पाकिटे त्या तयार करतात. त्याशिवाय दिवाळी किंवा इतर सणांच्यावेळी लागणारे हंगामी पदार्थ त्या तयार करून देतात. या कामासाठी त्या गरजू महिलांची मदत घेतात. त्यात दिवाळीचे सगळे पदार्थ त्या तयार करतात. पापडाची मागणी लक्षात घेऊन काही महिलांकडून त्या अधिक संख्येने पापड तयार करून घेतात. खेड देवघर हे त्यांचे मूळ गाव. चिपळूणपासून दीड तासांच्या अंतरावर. परंतु, झोकून देऊन व्यवसायात काम करत राहिल्यामुळे त्या आता चिपळूणमध्येच रमल्या आहेत. रोज पहाटे पाच वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. घरकाम करून सकाळी साडेसात- आठपासूनच त्या कामाला सुरवात करतात. ते रात्री उशिरापर्यंत. एखादी नोकरी करणारी व्यक्ती वेळ देते. हा तर स्वतःच व्यवसाय आहे.
त्यामुळे दिवसातील अधिकाधिक वेळ व्यवसायासाठी देते, असे त्या सांगतात. या सर्व कामाच्या व्यापातून काही सामाजिक संघटनांचे कामही त्या करतात. यापुढील काळात अधिक गरजू महिलांना अधिक रोजगार मिळून त्या आर्थिकदृष्ट्या सबल होतील, यासाठी त्यांना प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी व्यवसाय वाढवायचा आहे. काही मशिनरी अजून घ्यायची आहे. टेस्टी पापड लोकांपर्यंत पोहचवायचे आहेत, असे त्या सांगतात. त्याचबरोबर इतर महिलांना आर्थिक स्थिरता मिळावी म्हणून त्यांची धडपड सुरू आहे. ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या व्यवसायात स्थिर होते आणि स्वतःबरोबर इतर महिलांचा विचार करते, हे खूप महत्त्वाचे आहे. जिद्द आणि मेहनतीने आपले स्वतःचे विश्व निर्माण करणे सोपे नाही. रोहिणी मोरे यांनी स्वतःला सिद्ध करत इतरांनाही यशाचा मार्ग दाखविण्याची कामगिरी केली आहे. ती निश्चितच अनेकांसाठी प्रेरणा देणारी आहे.