पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक रस्त्यांची सध्या खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असताना महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. या खड्ड्यांमुळे वैतागलेल्या रिक्षाचालकाने खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला अन् जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील खड्डे दगड, वीज अन् माती टाकून बुजविले.
पिंपरी चौकातून वल्लभनगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे नुकत्याच झालेल्या पावसामुळे पडले आहेत. त्याबाबत स्थानिकांनी अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रार केल्या आहेत. मात्र, याकडे महापलिकेकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी एकमेव असलेल्या मुख्य मार्गावरच पडलेल्या खड्ड्यांमुळे खराळवाडीलगतच्या भागात वाहणे खड्डयात आदळून अपघात होत होते. अपघाताची मालिका दैनंदिन चालू असतानाच सोमवारी येथील खड्डयात अडकून दोन वाहने घसरुन पडली. यामध्ये दोघेजण जखमी झाले.
हा प्रकार घडल्यानंतर रिक्षाचालक संतोष शिंदे यांनी पुढाकार घेऊन खड्डे बुजविण्यास स्वत:हून सुरुवात केली. दगड, माती आणि वीटांचा वापर करून खराळवाडी जवळील मोठ-मोठे खड्डे त्यांनी बुजविले. आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली मात्र खड्डे बुजविण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. शिंदे यांनी दोन ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर या ठिकाणी असलेले मोठ-मोठे खड्डे बुजविले. प्रशासनाने यातून तरी शहाणपण घेऊन खड्डे बुजवावेत.