फुरसुंगी, दि. 1 (प्रतिनिधी) -उरुळीदेवाची येथील आदर्शनगरमधील मंजूर कामे पावसाळा संपताच पूर्ण करून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नसल्याची माहिती कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली.
उरुळीदेवाची-आदर्शनगर येथील रस्त्यांच्या कामासाठी आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून 40 लाख रुपयांचा निधी मंजूर असून याठिकाणी कॉंक्रिटचा रस्ताही झालेला आहे, त्यापुढील रस्त्याचे खडीकरणाचे काम झाले आहे. पाऊस असल्यामुळे डांबरीकरण केल्यास रस्ता खराब होईल.त्यामुळे पावसाळा संपताच या रस्त्याचे डांबरीकरण करून या भागातील रस्त्याची समस्या कायमची सोडविली जाईल, अशी माहिती कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारी महेंद्र शेवाळे, संजय जाधव, संदिप बांदल, सुभाष थिटे, सुरज शेवाळे यांनी दिली.
सुभाष थिटे यांनी सांगितले की, आदर्शनगरच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार संजय जगताप तत्पर आहेत. चुकीची माहिती दिल्याने येथील रस्त्याचे काम बंद पडले, काम होणार आहे. नागरीकांचा गैरसमज झाल्याने काही स्थानिक नागरीकांनी लोकवर्गणी काढुन रस्त्याचे जेसीबीच्या सहाय्याने दुरुस्ती केली. येथील समस्या सोडविण्यासाठी आमदार तत्पर आहेत, याच कारणातून पाऊस उघडताच या रस्त्याचे डांबरीकरण करून केले जाईल. आदर्शनगरच्या मूलभूत सोयीसुविधा पूर्ण करून या भागाचा सर्वांगीण विकास साधल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे सुभाष थिटे यांनी सांगितले.