औंध, दि. 1 (प्रतिनिधी) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मार्ट सिटी प्रकल्पाचे उद्घाटन 2016 मध्ये करण्यात आले. औंध मधील आंबेडकर वसाहतीचे पुनर्वसन स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्याच्या कामाचे उद्घाटनही पंतप्रधानाच्या हस्ते करण्यात आले होते. यासाठी 65 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला. परंतु, गेल्या सात वर्षांमध्ये यावर काहीही काम करण्यात आलेले नाही. सदर प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे ढकलून देण्यात आला. या प्राधिकरणाने त्यावर सात वर्षांत काही काम केले नाही.
शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनाचे सर्व प्रकल्प बंद पडले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प स्मार्ट सिटीने स्वतः पुढाकार घेऊन सदर जागा ताब्यात घेऊन कायद्यात उपलब्ध असलेल्या तरतुदीनुसार मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या आधारावर नागरिकांची सहकारी सोसायटी स्थापन करून प्रकल्प राबविण्यात यावा, अशी मागणी करीत माजी नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या नेतृत्वात, आंबेडकर वसाहत पुनर्वसन संघर्ष समितीने “स्मार्ट सिटी कार्यालयासमोर ढोल-ताशा गजर आंदोलन केले.
याबाबत अर्चना मुसळे यांनी सांगितले की, औंधमधील 4.2 किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासून करण्यात आलेले नाही. ठेकेदाराकडे मनुष्यबळ नाही, यंत्रणा नाही व तो काम करण्यास सक्षम नाही. केलेले काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून त्यावर स्मार्ट सिटी प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही. ओटा मार्केट आरक्षण जागा विकसित करण्यासाठीचे एक कोटी रुपयांचे टेंडर काढूनही काम करण्यात आलेले नाही, महादजी शिंदे रस्त्याचे 18 कोटीचे टेंडर काढून तेही काम केले गेलेले नाही, पहिल्या टप्प्यातील आयटीआय रोडवरील 3.9 कोटी रुपयाचे काम अर्धवट ठेवले, औंध येथील नियोजित स्मार्ट सिटी क्लिनिकचे काम गेल्या सात वर्षात करण्यात आलेले नाही यासह अनेक प्रकल्प अर्धवट सोडून दिलेले आहेत, ही सर्व कामे सुरु करण्यात यावीत यासाठी आंदोलन करण्यात आले.
याबाबतचे निवेदन स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांना देण्यात आले असून या सर्व विषयावर तातडीने बैठक घेऊ सर्व विषय मार्गी लावू, असे आश्वासन डॉ. कोलते यांनी दिले आहे. यावेळीे माजी नगरसेविका अर्चना मुसळे, डॉ. मधुकर मुसळे, मिलिंद कदम, रंजीत लोखंडे, अमोल घावरे, साजन ठोसर आदी उपस्थित होते.