पिंपरी -नदीला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. नदीकाठावरच पूर्वी मानवी वस्ती असायची. परंतु सध्या नदीच्या काठावर घर अथवा जमीन घेण्यास नागरिक तयार होताना दिसत नाहीत. कारण नदीचे वाढते प्रदूषण पाहून नदीच्या आरोग्यासह नागरिकांचे, शेतीचे आरोग्य धोक्यात आले आहे. चिखली, निघोजे परिसरातील काही शेतकऱ्यांची पाळीव जनावरे या दूषित पाण्यामुळे दगावली आहेत. परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रशासनाविषयी प्रचंड संताप असून नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
देहू आणि आळंदी तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या इंद्रायणी नदीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नदीजवळ घर आणि शेती असून देखील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. मावळातील डोंगर कपारीतून वाहत येणारी इंद्रायणी नदी पुढे जाऊन विस्तृत रूप धारण करते. परंतु देहूच्या पुढे निघाल्यानंतर चिखली, शेलारवाडी, निघोजे, मोशी, चिंबळ आदी परिसरात नदीत ड्रेनेज आणि केमिकलचे पाणी सोडण्यात येत असल्याने इंद्रायणीचे आरोग्य धोक्यात आले आहे.
इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी मिसळत असल्याने नदी प्रदूषणात वाढ झाली आहे. चिखली, कुदळवाडी येथील परिसरातून मोठ्या प्रमाणावर दूषित आणि केमिकलचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणीत जात आहे. त्यामुळे ड्रेनेजलाइनचे तसेच दूषित पाण्यामुळे इंद्रायणीची गटारगंगा झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. दूषित पाण्यामुळे परिसरातील जलस्रोत देखील खराब झाले आहेत. त्यामुळे नदी काठच्या गावांमधील नागरिकांना बारामाही नदी वाहत असून देखील पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
दिवसेंदिवस इंद्रायणीचे आरोग्य बिघडत चालले आहे. नदीचे पाणी दूषित होत असल्याने आम्हा शेतकऱ्यांची शेती धोक्यात आली आहे. जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. केमिकलयुक्त पाण्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे. उत्पादनात घट होत आहे. बुधवारी रात्रीपासून असे दूषित पाणी येण्यास सुरुवात होते. त्यामुळे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पाहणी करून संबंधितांवर कारवाई करावी.
– गणेश मोरे, शेतकरी.
आमची शेती, वस्ती इंद्रायणीच्या काठावर आहे. आमची जनावरे इंद्रायणीवर पाणी पिण्यासाठी जातात. परंतु मागील काही दिवसांपासून इंद्रायणीला आठवड्यातून दोन दिवस केमिकल आणि दूषित पाणी मोठ्या प्रमाणावर येते. हे दूषित पाणी पिल्यामुळे माझ्या पाळीव दोन म्हैशी, एक बैल आणि गाय मृत्यू पावली आहे. दूषित पाण्यामुळे मासे देखील सारखे मरून पडत आहेत. त्यामुळे शासनाने येथील नदीत येणाऱ्या दूषित आणि केमिकलयुक्त पाण्याची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करावी.
– शरद शिंदे, शेतकरी.
पाळीव जनावरांचा बळी
इंद्रायणी नदीला आठवड्यातून दोन दिवस दूषित आणि केमिकलयुक्त पाणी मोठ्या प्रमाणावर येते. हे दूषित पाणी जनावरांनी पिल्यामुळे निघोजे येथील एका शेतकऱ्याच्या दोन म्हैशी, एक बैल आणि गाय मृत्यू पावली आहे. दूषित पाण्यामुळे जलजिवांचा अधिवास देखील धोक्यात आला आहे. आठवड्यातून दोन दिवस मोठ्या प्रमाणावर मासे मरून पडत आहेत. त्यामुळे मच्छिमार करणारांचे देखील मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे नदी सुधार प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाहणी करून नदीचे प्रदूषण थांबविणे गरजेचे आहे. नदी काठावरील शेतकऱ्यांची जमीन नापीक बनत आहे. इंद्रायणी नदीवरून पाइपलाइन करून पिकांना पाणी देण्यात येते. परंतु सध्या इंद्रायणीला दूषित आणि केमिकलयुक्त पाणी येत असल्याने जमिनीच्या कलरमध्ये बदल घडून येत आहे. तसेच शेतकरी व जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. उत्पादनात घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे दूषित आणि केमिकलयुक्त पाणी नदीत सोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
आठवड्याला केमिकलचे पाणी
चिखली येथील शेलारवस्तीजवळून इंद्रायणी नदी वाहते. इंद्रायणी नदीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु इंद्रायणी नदीत तळवडे, चिखली परिसरातील छोटे मोठे उद्योग आपले केमिकलयुक्त दूषित पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडत आहेत. हे दूषित पाणी बुधवार, गुरुवार रात्री सोडण्यात येत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्यावर बुधवारी, गुरुवार आणि शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर केमिकलचा तवंग येत आहे. पाण्याला लालसर कलर येत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे व संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.