वडगाव मावळ – छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील गडकिल्ल्यांची झालेली दुरावस्था दूर व्हावी. गडास शिवकाळाप्रमाणे वैभव प्राप्त व्हावे म्हणून स्वराज्यातील किल्ले तिकोनागडाचे महत्त्व व किल्ल्याची होणारी दुर्दशा पाहता गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगाव मावळ यांनी किल्ल्याचा संवर्धन आराखडा तयार केला आहे.
हा आराखडा पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांच्या मार्गदशनाखाली तयार केला असून तो पुढील कार्यवाहीसाठी पुरातत्व खात्यासमोर सादर करण्यात आला आहे. तसेच सदर आराखड्याचे अनावरण वडगाव मावळ येथे विजय दिनानिमित्त करण्यात आले.
गडावर दुर्गसंवर्धनाचे काम करताना असंख्य अडचणी येतात. त्यात शासकीय पातळीवरील परवानगी, आर्थिक निधी, मनुष्यबळ, शास्त्रीय दृष्टीने करावयाचे संवर्धन ह्या अडचणी येत असतात. गडकिल्ले हे शासनाच्या ताब्यात असुन त्यावर दुर्गसंवर्धनाचे काम करायचे झाल्यास शासकीय बाबी पूर्ण करणे क्रमप्राप्त असते. पुरातत्व विभाग यांच्याकडुन वारंवार कळविण्यात येत असल्याने या बाबींची पूर्तता करून विकास आराखडा तयार करण्यात आला.
हे काम हे खर्चिक होते परंतु ते महत्वपूर्ण असल्याने संस्थेमार्फत हे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी एक लाख रूपय खर्च करण्यात आला. गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था ही प्रथमच अशी संस्था ठरली असून त्यांना असा प्रयत्न करत गडाचा आराखडा तयार केला आहे.
पुरातत्व खात्याच्या पॅनलवरील वास्तूविशारद आफळे असोसिएट यांना हे काम देण्यात आले आहे. त्यांनी गडावर प्रत्यक्ष येवून बारकाईने पहाणी करून ड्रोन शुट व इतर अत्याधुनिक साधनासह तिकोनागडाचा विकास आराखडा तयार केला. या आराखड्या मुळे किल्ल्यावरील कामासाठी काही मार्ग मोकळे झाले आहेत त्यामध्ये गडास शासकीय स्तरावरून निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. गडावरील सर्व वास्तूंचे वास्तूविशारद यांच्याकडुन दुरूस्ती आराखडा तयार करण्यात आल्यामुळे गडावरील वास्तुंची दुरूस्ती परवानगी पुरातत्व विभाग यांच्याकडुन वारंवार घेण्याची गरज नाही. तर दुसऱ्या संस्थांना परवानगीसाठी द्यावा लागणारा वेळ न घालवता त्यांचे आर्थिक नियोजना नुसार गडावरील छोटे किंवा मोठे काम आराखड्यावरून थेट चालू करता येणार आहे. शासनाकडुन निधी मिळाल्याने गडावर मोठ्या प्रमाणात गडसंवर्धनाचे काम सुरु होणार आहे. या आराखड्यामुळे दर वर्षी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग गडावरील अतितात्काळ दुरूस्त करावयाच्या वास्तूची यादी या माध्यामातुन उपलब्ध झाली आहे. अशा व अनेक बाबींचा फायदा या आराखड्यामुळे होणार आहे.