जाधववाडी, दि. 11 (वार्ताहर) -पिंपरी चिंचवड शहरात आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती होती. परंतु गावाचे रुपांतर शहरात आणि शहराचे औद्योगिक नगरीत रुपांतर झाल्याने शेतीची जागा इमारतींनी घेतली आहे. त्यामुळे शेत नामशेष होत असली तरी जाधववाडी परिसरातील काही शेतकऱ्यांनी अजूनही आपली शेती जपली आणि जोपासली आहे.
जाधववाडी ही खूप छोटी होती. शेती मोठ्या प्रमाणावर होती. परंतु बहुतांश शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन बिल्डरांना विकली. त्यामुळे शेतीच्या जागी टोलेजंग इमारती उभा राहिल्या आहेत. परंतु अजूनही जाधववाडी येथील प्रगतिशील शेतकरी माउली जांभुळकर, संतोष जांभुळकर व मिथून सातव यांनी आपली शेतजमीन जपली आहे. शेती जपून ती वहीत ठेवली आहे. सध्या त्यांच्या शेतात भातपीक डौलाने डोलत आहे. भातपिकामुळे जाधववाडीतील सिमेंटच्या जंगलात कुठेतरी हिरवीगार शेती दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या डोळ्यांना ही हिरवीगार शेती आल्हाद देत आहे. सध्या जाधववाडीतील शेतकऱ्यांच्या शेतात भात, गहू, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन विविध प्रकारच्या पालेभाज्या वांगी, भेंडी अशी पिके शेतकरी घेत आहेत.