सध्या नितीन गडकरी यांच्यानंतर मोदी सरकारमधील आणखी एक मंत्री चांगलेच फॉर्मात आले आहेत, त्यांचे नाव एस. जयशंकर. ते आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत, हे आधी आवर्जून सांगावे लागत होते, पण सध्या मात्र त्यांनी स्वतंत्र बाण्याने काम सुरू केले आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अनुषंगाने ते सध्या जी वक्तव्ये करीत आहेत त्याची बऱ्यापैकी चर्चा सुरू झाली आहे.
वास्तविक मे 2019 मध्ये ते प्रथमच केंद्रीय मंत्री झाले. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या कामगिरीकडे कुणाचे फारसे लक्ष जात नसे. किंबहुना ते बिन चेहऱ्याचेच विदेश मंत्री असल्यासारखे वाटत, पण रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून त्यांच्यातला बोलका मंत्री प्रकर्षाने जाणवू लागला आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे 37-38 वर्षे विदेश व्यवहार खात्यात काढली आहेत. यातील बहुतेक काळ हा कॉंग्रेस राजवटीचा होता. कॉंग्रेसचे परराष्ट्र धोरण हे कोणालाही दुखवायचे नाही आणि कोणाच्याही फारसे वाटेला जायचे नाही अशा स्वरूपाचे असायचे आणि हेच धोरण बहुधा त्यांच्या अंगी भिनले असावे. त्यामुळे ते परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे मंत्री असूनसुद्धा आतापर्यंत तसे दुर्लक्षितच राहिले.
पण जसे त्यांनी अमेरिका, युरोपीय देश यांना खडेबोल सुनवायला सुरुवात केली, तसे त्यांच्याविषयीचे कुतूहल वाढू लागले आहे. अन्यथा आजपर्यंत आपल्या परराष्ट्र मंत्र्यांचे काम केवळ पाकिस्तानला खडेबोल सुनावण्यापर्यंत मर्यादित होते. पण रोज उठून त्या गलितगात्र झालेल्या पाकिस्तानला काय खडेबोल सुनावयाचे, असा प्रश्न अलीकडच्या काळात निर्माण झाला होता.
या आधी मोदी सरकारच्या काळात सुषमा स्वराज या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम पाहात होत्या. पण त्या काळात पंतप्रधान मोदी हेच जणू या मंत्रालयाचे काम पाहात असल्याने सुषमा स्वराज यांना फार वाव मिळाला नाही. पहिल्या टर्ममध्ये मोदींचा उत्साह मोठा होता. त्याच उत्साहात ते बहुतेक सगळे जग हिंडून आले. ज्या देशात ते जात तेथील राष्ट्रप्रमुखाला ते कडकडून मिठी मारत आणि त्या देशाची भारताची मैत्री अधिक दृढ झाल्याचा देखावा त्यांच्या या कृतीतून व्यक्त होत असे. सुषमाजींना मात्र या काळात फारसे विदेश दौरे करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे पाकिस्तानला खडेबोल सुनावण्याखेरीज वेगळी कामगिरी त्यांना करता आली नाही. संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेतील भाषणातही त्यांची भाषणे याच मर्यादेत असायची.
गेल्या 70 वर्षांत आम्ही वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि अंतरीक्ष संशोधक निर्माण केले पण पाकिस्तानने या अवधीत केवळ दहशतवादी निर्माण करून जगाचा घोर वाढवून ठेवला, अशा सारखी वक्तव्ये त्या त्याकाळात करीत असत. पण बदललेल्या जागतिक परिस्थितीविषयी मात्र त्या फारशा भाष्य करीत नसत. किंबहुना नेमस्त पद्धतीने त्यांनी हे खाते सांभाळले. पण अलीकडच्या दोन-चार महिन्यांत जयशंकर हे मात्र या परिघाबाहेर पडून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका अत्यंत परखड शब्दांत मांडू लागले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगाने रशियावर आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे भारताने रशियाकडून तेल आयात थांबवावी, असा दबाव भारतावर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून येऊ लागला आहे. पण भारताने अत्यंत आक्रमकपणे रशियाकडून आपली तेल आयात सुरूच ठेवली आहे.
या युद्धाच्या आधी भारताच्या एकूण तेल आयातीपैकी केवळ 0.3 टक्के इतकी तेल आयात रशियाकडून होत असे, पण सध्या हे प्रमाण दहा पटीने वाढले आहे. त्यामुळे जगातील अनेक देश भारतावर खार खाऊन आहेत. अशा वातावरणात जयशंकर हे भारताची बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडताना दिसून येत आहेत. रशिया आमचा जुना मित्र आहे, जेव्हा आम्हाला शस्त्रास्त्रांची गरज होती त्यावेळी जगाने आमच्याकडे पाठ फिरवली पण रशियाने आम्हाला ही लष्करी सामग्री समर्थपणे पुरवली आहे. आजही आमच्या लष्करात रशियाकडून आलेली सामग्री कार्यरत आहे. हे जगाला निक्षुन सांगताना त्यांनी रशियाकडून आयात केल्या जाणाऱ्या तेलाचे समर्थन केले आहे. याच अनुषंगाचे वक्तव्य त्यांनी युरोपीय देशांना उद्देशूनही केले आहे. अमेरिकेने आजवर केवळ पाकिस्तानचीच पाठराखण केली असल्याने त्यांनाही याविषयी जयशंकर यांनी परखडपणे समज दिल्याचे दिसून आले आहे.
अमेरिकेने पाकिस्तानला एफ16 ही अत्यंत आधुनिक लढाऊ विमाने दिली, त्याचा वापर ते भारताविरोधात करण्याची शक्यता आहे हे माहिती असूनसुद्धा केवळ दहशतवाद्यांच्या विरोधातील लढाईसाठी आम्ही पाकिस्तानला ही मदत केल्याचे समर्थन अमेरिकेकडून केले गेले, हे जयशंकर यांनी स्पष्टपणे नमूद करून त्यांनी अमेरिकेला काही कानपिचक्या दिल्या आहेत. एवढे करूनच ते थांबले नाहीत तर अमेरिकेने आपल्या पाकिस्तानविषयीच्या धोरणाचा फेरविचार करावा असेही जयशंकर यांनी त्यांना बजावले आहे. या संबंधातील युक्तिवाद करताना जयशंकर यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानबरोबरच्या आपल्या इतक्या वर्षांचा आपल्याला नेमका काय लाभ झाला याचा विचार अमेरिकेने करण्याची गरज आहे.
अमेरिकेच्या मदतीमुळे आजवर ना पाकिस्तानचे काही भले झाले, ना अमेरिकेचे काही भले झाले. त्यामुळे अमेरिका आपल्या धोरणाचा फेरविचार करेल अशी परखड अपेक्षाही जयशंकर यांनी अलीकडेच व्यक्त केली आहे. या काळात सध्या मोदींच्या विदेश यात्रा बऱ्यापैकी थंडावलेल्या दिसत आहेत. त्यामुळे जयशंकर यांना बऱ्यापैकी मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे अनेक करारांच्या निमित्ताने आणि आंतरराष्ट्रीय परिषदांच्या निमित्ताने जयशंकर यांचे विदेश दौरे वाढले आहेत. एकामागून एक देश ते फिरत असून तेथे ते विविध विषयांवरील भारताची बाजू नेमकेपणाने मांडू लागले आहेत.
वास्तविक जयशंकर हे नॉन-पॉलिटिकल स्वरूपाचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्वही सौम्य स्वरूपाचे आहे. तथापि, त्यांना परराष्ट्र व्यवहार खात्याचा मोठा अनुभव असल्याने मोदींनी त्यांना मोकळीक दिली असावी. त्या मोकळिकीचा चांगला उपयोग ते आपल्या अनुभवाच्या जोरावर करीत आहेत ही भारतासाठी जमेचीच बाजू मानली पाहिजे. त्यांनी आता अशाच आक्रमक शैलीत चीनलाही खडेबोल सुनावून त्यांच्याही आक्रमकपणाला पायबंद घालण्यासाठी आपला वेळ खर्ची केला तर ते अधिक उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा त्यांच्याकडून आता व्यक्त करता येऊ शकते.