पिंपळे निलख, दि. 11 (वार्ताहर) -वाकड बायपास रस्त्यावर मुख्य बीआरटीएस रस्त्याचे काम करण्यात आले आहे. परंतु या मार्गाच्या बाजूला असलेला पदपथ तसेच सर्व्हिस रस्त्याचे काम अर्धवट असल्याने येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना तृतीयपंथी व इतर समस्यांचा समाना करावा लागत आहे. त्यामुळे येथील पदपथ व स्वच्छतेची कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पिंपळे निलख ते वाकड या बीआरटीएस मार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर गवत उगवले आहे. त्यामुळे हा रस्ता आहे की गुरांना चरण्यासाठी कुरण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या मार्गावरील पदपथ तसेच सर्व्हिस रस्त्याचे काम अर्धवट आहे. तसेच इतर विकासकामे मागील काही वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. औंध पुण्याच्या दिशेने पिंपळे निलख वाकड दिशेला जाणाऱ्या मुख्य बीआरटीएस रस्त्यावरच गवत वाढल्याने कुरण झाले असल्याचे चित्र आहे. ज्या ठिकाणी गवत वाढले आहे त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून विकास काम सुरू आहे. अद्याप ते पूर्ण झालेले नाही.
बेवारस वाहनांची वाढतेय संख्या
पिंपळे निलख ते वाकड मार्गाच्या कडेला अनेक नागरिक आपली बंद पडलेली वाहने टाकून जात आहेत. ही वाहने कित्येक दिवसांपासून बेवारसपणे धूळ खात पडून आहेत. तसेच फळ विक्रेते व इतर वस्तूंची विक्री करणारे व्यावसायिक आपली वाहने रस्त्याच्या कडेला पार्क करून उभा असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
तृतीयपंथीयाचा वाढला त्रास
या मार्गावर सांगवीकडून वाकड दिशेला जाणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले उड्डाणपुलाखाली तृतीयपंथी उभा असतात. ते रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांकडे पाहून अश्लील चाळे करून पैशांची मागणी करतात. परंतु पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करतात. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी नागरिक करत आहेत.
महापालिका प्रशासन येथील रस्त्याची समस्या सोडवत नाही. रस्त्याच्या कडेला गवत वाढले आहे. तसेच उड्डापुलाखाली तृतीयपंथीयांचा त्रास आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी योग्य पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे. महापालिका प्रशासनाने येथील मार्गावरील गवत काढले नाही तर गायी, म्हैस चरण्यासाठी आणून प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात येईल. – शशिकांत निकाळजे, सी. आर. सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य.
या मार्गावरील विकासकामांची तसेच साफसफाईची सर्वांत मोठी समस्या आहे. तसेच उड्डाणपुलाखालील तृतीयपंथीयांचा त्रास दररोजचा आहे. यातून महापालिका व पोलीस प्रशासनाने नागरिकांची सुटका करावी. – सुमित दिवेकर, पिंपळे निलख, रहिवासी.