सातारा, (प्रतिनिधी) – सध्या देश पातळीवर भयानक अवस्था आहे. ज्यांनी रयतेला लुटले तेच आता सत्तेच्या तुकड्यासाठी लाचारी पत्करत आहेत. अशा अवस्थेमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारी विचारांचा अखेरचा श्वास घेणाऱ्या मातोश्री कमलाबाई वसंत आंबेकर यांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली असून त्यांना काँग्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. अशा शब्दात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी भावना व्यक्त केल्या.
क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी व जुन्या जमान्यातील पत्रकार कॉम्रेड वसंत आंबेकर यांची पत्नी मातोश्री कमलाबाई आंबेकर यांच्या निधनाने खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. क्रांतिकारी विचाराची नव्या पिढीला मार्गदर्शनाची खरी गरज असताना त्यांचे निधन झाले. त्यांचे विचार कधीही मरणार नाहीत. हेच विचार भविष्यात काँग्रेसला संजीवनी देतील. असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मातोश्री कमलाबाई आंबेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून वंदन केले.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विराज शिंदे, सरचिटणीस नरेश देसाई, त्याचबरोबर ज्येष्ठ संपादक बाळासाहेब आंबेकर, प्रकाश आंबेकर, प्रभाकर आंबेकर, विलास आंबेकर, निर्भीड पत्रकार सुजित आंबेकर, दीप्ती आंबेकर, माळवदे, मनीष आंबेकर अभिज्ञ आंबेकर रोहन आंबेकर, जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्ष अरुणा नाझरे व नागरिक उपस्थित होते.