नवी दिल्ली – पंतप्रधान मोदींची गॅरंटी, सर्व विकासकामे, राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा आणि जनतेला दिलेल्या योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तर आणि तरच भाजपाला मध्य प्रदेशात २९ जागा जिंकण्याचे स्वप्न साकार करता येऊ शकेल, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला राज्यात सुरुवात केली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मध्य प्रदेशात निवडणुकीच्या नियोजनासाठी ग्वाल्हेरमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, भाजप प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते.
अमित शहा यांनी सर्व लोकसभा जागांवर पक्षाला ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळवून देण्याची रणनीती आखली आहे. प्रदेशाध्यक्ष व्ही.डी.शर्मा यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर आतापर्यंत केलेल्या तयारीची माहिती दिली. शाह यांनी आपल्या भाषणात ग्वाल्हेर-चंबळ विभागातील कार्यकर्त्यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि मेहनत यांचा उल्लेख केला.
या बैठकीला उपस्थित असलेले ग्वाल्हेरचे खासदार विवेक नारायण शेजवलकर यांनी सांगितले की, शहा विधानसभा निवडणुकीपूर्वीच येथे आले होते. तेव्हाही आपल्याला दीडशेहून अधिक जागा जिंकायच्या आहेत, असे टार्गेट त्यांनी दिले होते. आजही आपल्याला सर्व २९ जागा जिंकायच्या आहेत, असे टार्गेट त्यांनी दिले आहे.