कोल्हार – राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द – चिंचोली पाणी योजनेस मंजुरी मिळून आठ महिने उलटून गेले तरी काही ग्रामस्थांच्या तक्रार अर्जामुळे हे काम रेंगाळले होते. त्यामुळे दोन्ही गावातील तब्ब्ल वीस हजार नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याबाबत दैनिक ‘प्रभात’ वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले आणि थेट महसूलमंत्र्यांच्या दरबारी मध्यस्थीची विनंती करण्यात आली.
पाणीप्रश्न हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक ग्रामस्थांची बैठक बोलावून यावर तोडगा काढला आणि तात्काळ पाणी योजनेचे काम सुरु करण्याचे आदेश देण्यात आल्याने दोन्ही गावाच्या नागरिकांचा पाणीप्रश्न मार्गी आहे. राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द आणि चिंचोली या दोन्ही गावांना जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना गेल्या आठ महिन्यापूर्वी मंजूर झाली.
या योजनेचे काम गावातीलच एका ठेकेदाराला मिळाले, मात्र दोन्ही गावांचा पाणी साठवण तलाव हा संयुक्त असून यामध्ये शासन नियमाप्रमाणे प्लॉस्टिक कागदाचा वापर करून पाण्याचा साठा करण्याची तरतूद होती. ही तरतूद ग्रामस्थांना मान्य नसल्याने त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊन काम गावच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला, या सर्व प्रकारावर दैनिक ‘प्रभात’ मधून बातमीपत्र छापून यावर प्रकाश टाकण्यात आला. यानंतर स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले आणि पाणी योजनेसाठी थेट महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनाच या योजना मार्गी लागण्याकामी साकडे घालण्यात आले.
महसूल मंत्र्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करीत काम मार्गी लावण्यात भूमिका बजावली. गावातील तक्रारदार आणि स्थानिक प्रशासन आणि जबाबदार ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक बोलावली. या बठकीचे नेतृत्व मंत्री विखे यांचे स्विय सहाय्यक मच्छिद्र अंत्रे यांनी केले. बैठकीत सरपंच अनिता शिरसाठ, दिगंबर शिरसाठ, महेश शिरसाठ, दत्तात्रय शिरसाठ, भाऊसाहेब लोंढे, दिगंबर घोगरे, दीपक शिरसाठ, दिग्विजय शिरसाठ यांच्यासह महिला सदस्य उपस्थित होत्या. यावेळी पाणी योजना मार्गी लावण्याकामी स्वतः महसूलमंत्री लक्ष घालणार असून भविष्यात या योजनेत कुठलीही आडकाठी येणार नाही असे सूचित करण्यात आले. त्यामुळे नागरिकांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्यामुळे नागरिकांमधून विखे कुटुंबीय आणि दैनिक ‘प्रभात’ चे आभार व्यक्त करण्यात येत आहे.