आज दुपारपर्यंत वाहतूक ठप्प
नीरा – नीरा-वाल्हा दरम्यान रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम रखडल्याने पंढरपूर पालखी मार्गावरील वाहतूक रविवार (दि. 3) दुपारपर्यंत ठप्प राहणार आहे. गेली दोन दिवस पालखी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होती. शनिवारी (दि. 2) सायंकाळी सात वाजता काम पूर्ण होऊन रस्ता खुला होणार होता, पण अपुऱ्या कामागारांमुळे काम संथगतीने सुरू होते.
पुणे-मिरज लोहमार्गावरील नीरा ते वाल्हा दरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक 27 किलोमीटर 79/-01 रेल्वे रूळाच्या दुरूस्ती, निरीक्षण व ओव्हर आँईलिंगसाठी शुक्रवारी (दि.1) सकाळी सात पासून ते शनिवारी (दि. 2 )सायंकाळी सात वाजेपर्यंत रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रेल्वे रूळाचे काम शनिवारी (दि. 2) सायंकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. तथापी अपुुऱ्या कामगारांमुुळे रेल्वे रूळाचे दुरूस्तीचे काम रखडले आहे.
वास्तविक ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रशासनाने पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा-वाल्हा रस्त्यवरील एकमेव असलेले रेल्वे गेटचे दुरूस्तीचे काम काढल्याने दिवाळीवरून पुणे, मुंबईकडे परतीच्या प्रवासास निघालेल्या प्रवाशांचे आतोनात हाल झाल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वेच्या दिरंगाई बाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, नीरा-वाल्हा रस्त्यावरील रेल्वे गेट रविवारी (दि. 3) दुपारपर्यंत वाहतुकीसाठी खुले करण्यात येईल, असे रेल्वेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.