लोणंद – गुळूंचे (ता. पुरंदर) येथील वैशिष्ट्यपूर्ण ज्योतिर्लिंगाची काटेबारस यात्रेस नुकताच प्रारंभ झाला आहे. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात शेकडो समई गेले बारा दिवस तेवत ठेवल्या जाणार आहेत. या बारा दिवसांच्या काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रा पाहण्यासाठी राज्यातून तसेच कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश येथून शिवभक्त येत असतात.
दिपावलीच्या प्रतिपदेला (पाडव्याला) सकाळी दहा वाजता स्वयंभू शिवलिंगाची पुजा केली गेली. महाआरती झाल्यावर मंदिरात समई पेटविण्यात आल्या. गावातील प्रत्येक कुटूंबातील प्रमुखांनी मंदिरात येऊन प्रत्येकी एक समई स्वहस्ते पेटवल्या. घरटी एक समई या प्रमाणे सुमारे तीनशे समई बारा दिवस-रात्र अखंडपणे तेवत आहेत. परगावी असलेल्या माहेरवाशीण नियमितपणे तेल वाहतात. पुर्वी या समई मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात असायच्या, कुटुंब संख्या वाढल्याने समईंच्या संखेत वाढ झाली, कालांतराने कासव मंडपात, आणि आता या सर्व समईंसाठी मंदिराबाहेर अग्नेय बाजूला जागा उपलब्ध करून त्यांना काचेचा निवारा करण्यात आला आहे.
विशेषत: सर्व समई जुन्या काळातील पितळेच्या आहेत. देवाचे गुरव प्रशांत शिंदे व त्यांचे कुटुंबीय दररोज सकाळ-संध्याकाळ तेवत असणाऱ्या समईमध्ये भक्तांनी दिलेले तेल वाहतात. या बारा दिवसांच्या काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अखंड दिपदान केले जाते. पहाटे काकडाआरती, सायंकाळी भजन-किर्तन व ढोल लेझीमच्या खेळात गावातील गावकरी देवाची पालखी घेऊन गावात जातात तिथे आरती करुन परत माघारी मंदिरात येतात, असा हा दिनक्रम बारा दिवस चालतो.
शनिवारी 9 रोजी होणाऱ्या मुख्य यात्रेसाठी शुक्रवारी 8 रोजी उत्सव मुर्तींना निरा नदीच्या दत्तघाटावरील पवित्र तिर्थात स्नान घालण्यात येणार आहे. उत्सव मूर्तींना पालखीतून रथात बसून निरेला आणण्यासाठी रथाला उजाळा देण्यात आला आहे. ज्योतिर्लिंग मंदिराचा परिसर व कळसावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराच्या जिर्णोद्धारादरम्यान तुळशी वृंदावनाचे बांधकाम राहिले होते. घटस्थापनेच्या दिवशी नव्याने कोरीव नक्षीकाम असलेल्या दगडी तुळशीवृंदावनाची स्थापना करण्यात आली. गावातील जेष्ठांच्या हस्ते तुळशी वृंदावनाची स्थापना करण्यात आली. यावेळी प्रमुख मानकरी यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.