मंचर – मंचर-पिंपळगांव-निरगुडसर (ता. आंबेगाव) रस्त्यावरील बेलसरवाडी येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात वाहतूक बंद पडण्याचा धोका टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
घोडेगांव, नारोडी, कळंब, चांडोली, खडकी, निरगुडसर, लोणी ते सविंदणे रस्ता प्रमुख जिल्हा महामार्गावरील बेलसरवाडी येथे हा पूल आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागच्या अखत्यारीत्या येतो. घोडनदी पात्रातील भराडी बंधाऱ्याला पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याने तेथे पूल बांधून 35 वर्षे झाली आहेत. मंचर, पिंपळगावमार्गे निरगुडसर ते शिरूर रस्त्यावरील 35 ते 40 गावांतील दूध, भाजीपाला, ऊस आणि इतर व्यावसायिकांच्या शेकडो वाहनांची या रस्त्यावरून वाहतूक सुरू असते.
पुलास कठडे नसल्याने तसेच भेगा पडल्याने पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता होती. बेलसरवाडी येथील रस्त्यावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने पुलाचे नवीन बांधकाम होणे गरजेचे होते. पुलाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पी. डी. शेडेकर, सेवानिवृत्त शाखा अभियंता ए. एस. ताम्हाणे यांनी करून मोडकळीस आलेल्या पुलाची दुरुस्ती केली असली तरी नवीन पूल बांधण्यासाठीचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर करावे. पुलाच्या नवीन उभारणीकामी निधी उपलब्ध करून देऊ, मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्याची माहिती निरगुडसरचे माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांनी दिली.