पुणे -राज्यात बहुतांशी साखर कारखान्यांची गळीत हंगामासाठीची पूर्वतयारी झालेली नाही. गळितापूर्वी कारखान्यातील संपूर्ण मशीनरीच्या दुरुस्तीचे काम या दिवसांत सुरू असते. साडेचार ते सहा महिने हे काम चालते; परंतु करोनामुळे या विभागातील कामगारांना सुट्टी देण्यात आली आहे. अनेक कारखान्यांचा हा विभाग अद्यापही विश्रांती घेत असल्याने राज्यात किती कारखाने गळीत हंगामासाठी परवानगी मागतील, याचा अंदाज आताच बांधणे कठीण जात आहे. मात्र, करोनाचा फटका कारखान्यांना बसत आहे.
राज्यात उसाचे उपलब्ध क्षेत्र साडेदहा लाख हेक्टरपेक्षा अधिक असते. साधारणतः कारखाने 170 ते 190 दिवस सुरू असतात. याचा विचार करता सध्याचा हंगाम संपल्यानंतर लागलीच कारखान्यांनी मशीनरीची देखभाल दुरुस्तीची कामे सुरू करणे अपेक्षित होते; परंतु मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला.
यातून लॉकडाऊन जाहीर केल्याने कारखान्यांनाही देखभाल दुरुस्तीची कामे बंद ठेवावी लागली. ज्या कंपन्यांकडून दुरुस्तीसाठीचे सुटे भाग येतात तेथील उत्पादनही बंद झाले होते. तेथून मालाचा पुरवठा होत नसल्याने दुरुस्तीच्या कामात अडचणी येत होत्या, त्यामुळे या विभागातील कामगारांना सुट्ट्या द्याव्या लागल्या. याचा परिणाम देखभाल दुरुस्ती लांबणीवर पडण्यावर झाला.
आता पुढील हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू करावा लागेल. त्यानुसार राष्ट्रीय साखर संघ, राज्य साखर संघाने पाठपुरावा केल्याने देखभाल-दुरुस्तीच्या कामाला परवानगी मिळाली असली तरी अवघ्या चार महिन्यांत दुरुस्तीची कामे कशी करायची, असा प्रश्न कारखान्यांपुढे निर्माण झाला आहे.
साखर कारखान्यांतील मशीनरी दुरुस्तीसंदर्भातील परवानगीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. सरकारने या संदर्भातील सर्व परवानग्या दिल्या असल्या तरी कमीत कमी वेळेत दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे आव्हान कारखान्यांपुढे आहे.
-प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ