नवी दिल्ली : महाचक्रीवादळ अम्फनने रौद्र रूप धारण केले आहे. या वादळाने पश्चिम बंगालमध्ये ताशी १९० कि.मी वेगाने प्रवेश केला आहे. दरम्यान, या चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशामधील १२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या वादळाला करोनापेक्षाही भयानक असल्याचे म्हटले आहे.
#WATCH West Bengal: Rooftop of a school in Howrah was blown away by strong winds earlier today. #CycloneAmphan pic.twitter.com/nJY0KhAC3Z
— ANI (@ANI) May 20, 2020
अम्फन वादळामुळे पश्चिम बंगाल व ओडिशाच्या किनारी जिल्ह्य़ांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम बंगालमधील दिघापासून ६७० कि.मी. आणि ओडिशातील पारादीपपासून ५२० कि.मी. अंतरावर बंगालच्या उपसागरात या वादळाचे केंद्र असून ते ताशी १४ कि.मी. वेगाने उत्तरपूर्वेकडे सरकत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची ४१ पथके दोन राज्यात तैनात केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
Visuals of #AmphanSuperCyclone,
Earlier from Andhra Pradesh before it left for coastal areas of Bengal & Odisha .
Note : Their is no driver in this bus . pic.twitter.com/gjNZOPSTDD— Rahul Jha (@JhaRahul_Bihar) May 20, 2020
पश्चिम बंगालमधील दिघा व बांगलादेशातील हातिया येथे वादळाने बुधवारी दुपारी २.३० वाजता जमिनीला स्पर्श केला, त्यानंतरच्या झंझावातात अनेक झाडे, घरे उन्मळून पडली असून विद्युत खांबही कोसळले आहेत. सुमारे ६ लाख ५८ हजार लोकांना दोन राज्यात सुरक्षित ठिकाणी हलवले असून वादळाचा वेग सुरुवातीला ताशी १६०-१७० किमी होता तो नंतर १९० कि.मी झाला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रमुख एस.एन प्रधान यांनी सांगितले की, ओडिशात २० पथके रस्ते मोकळे करण्याचे काम करीत असून पश्चिम बंगालमध्ये १९ पथके लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत. दिघा येथे वादळाने भरतीच्या मोठ्या लाटा आल्या. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होऊन कच्ची घरे कोसळली, झाडेही पडली आहेत.
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले की, दक्षिण व उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ात वाऱ्यांचा वेग ताशी १६०-१७० कि.मी होता. नंतर तो १९० कि.मी झाला. वादळाचा डोळा हा फार स्फोटक भाग असतो तो जमिनीला टेकला असून तीन जिल्ह्य़ात मुसळधारा पाऊस सुरू आहे. वादळाच्या डोळ्याचा व्यास ३० कि.मी आहे. वादळाचा मागचा भाग जमिनीला टेकल्यानंतर आणखी हानी होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.
मंगळवारी या वादळाला महावादळ संबोधण्यात आले होते पण नंतर त्याची तीव्रता थोडी कमी झाली. या वादळाने पूर्वेकडील दोन राज्यात मोठी हानी होत आहे. ओडिशात पुरी, खुर्दा, जगतसिंहपूर, कटक, केंद्रपारा, जाजपूर, गंजम, भद्रक, बालासोर येथे मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. पश्चिम बंगालमध्ये उद्या दुपापर्यंत वाऱ्याचा वेग कायम राहणार आहे. पश्चिम बंगालमधील नादिया व मुर्शीदाबाद जिल्ह्य़ातील भाग पार केल्यानंतर वादळ कमकुवत होणार असून नंतर कमी दाबाच्या पट्टय़ाच्या स्वरूपात बांगलादेशमध्ये प्रवेश करून नंतर नष्ट होईल. चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) ४१ तुकडय़ा पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत, असे एनडीआरएफचे प्रमुख एस. एन. प्रधान यांनी मंगळवारी सांगितले.