मुंबई: अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला असून सिंचन घोटाळ्याची चौकशी बंद करण्याचा निर्णय एसीबीने जाहीर केला. दरम्यान 9 प्रकारणांमधील फाईल्स बंद करण्यात आल्या आहेत. तसं एक पत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा निर्णय शासनाने घेतला नसल्याचे खासदार रावसाहेब दानवे म्हणाले. परंतु बंद केलेल्या फाईल्सचा अजित पवारांनशी संबंध नसल्याचे एसीबीने स्पष्ट केले आहे.
अजित पवार हे देखील सिंचन घोटाळ्यातील आरोपी आहेत, त्यांनी शनिवारी फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. बंद झालेल्या नऊ प्रकरणे अजित पवारांशी संबंधित नाहीत, असे एसीबीचे म्हणणे आहे. परंतु या घोटाळ्याची काही प्रकरणे सध्या परिस्थितीत बंद होणे हा फक्त योगायोग आहे का ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) वरिष्ठ अधिकारी परमबीर सिंह म्हणाले ‘सिंचनासंदर्भात तक्रारी झाल्यास सुमारे 3 हजार निविदांची आम्ही चौकशी करीत आहोत. ही नियमित तपासणी असून ती बंद आहे आणि इतर प्रकरणांमध्ये पूर्वीप्रमाणेच चौकशी सुरू आहे. ते म्हणाले की, आज बंद झालेले कोणतेही प्रकरण अजित पवारांशी संबंधित नाहीत.
मात्र, ही प्रकरणे बंद झाल्यामुळे नवीन चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांवर पाणी फेरून अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 54 आमदार त्यांच्यासोबत आहेत, असा दावा सुद्धा त्यांनी केला आहे, मात्र पक्षप्रमुख शरद पवार यांनी त्यांचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे.
सिंचन घोटाळ्याबाबत देवेंद्र फडणवीस आणि भाजपने अजित पवारांना नेहमीच लक्ष्य केले आहे. 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी केलेली पहिली कारवाई म्हणजे सिंचन घोटाळ्यातील अजित पवारांच्या कथित भूमिकेची चौकशी करण्याचे आदेश दिले. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार असताना अजित पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हा सुमारे 70 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार झाल्याचे आरोप आहेत.
सिंचन घोटाळ्यांमध्ये महाराष्ट्रातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात अनेक सिंचन प्रकल्पांना मान्यता व अंमलबजावणी करण्यामध्ये अनियमितता केल्याचा आरोप आहे. गेल्या महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अगोदर, शरद पवार आणि अजित पवार या दोघांवर ईडीने सहकारी बँकेशी संबंधित मनी लाँड्रिंगचा आरोप सुद्धा केला होता.
विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एका रॅलीत म्हटले होते की निवडणुकीनंतर अजित पवार तुरूंगात दळत असतील. मात्र आता सरकार स्थापनेसाठी त्यांचाच पाठिंबा घेतल्यामुळे भाजपच्या कार्यपद्धतीवर प्राणचिन्ह निर्माण होत आहेत. अँटी करप्शन ब्युरोच्या अधिसूचनेनुसार, जी 9 प्रकरणे बंद झाली आहेत ती विदर्भातील वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि बुलढाणा येथील सिंचन प्रकल्पांशी संबंधित आहेत.