पणजी : ध्वनी प्रदूषणाशी तसेच या प्रदूषणाचा आजूबाजूला विशेषत: मुलांवर होणार परिणाम हा विषय भोंगा चित्रपटात दाखवण्यात आल्याचे ज्येष्ठ मराठी दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांगितले.
लोकांवर ध्वनी प्रदूषणाचा दुष्परिणाम होत असून या विषयाकडे कोणीतरी लक्ष वेधण्याची गरज होती. हा संवेदनशील विषय आहे.
प्रादेशिक चित्रपट निर्मात्यांपुढील समस्यांबाबत बोलतांना ते म्हणाले की, या चित्रपटांच्या निर्मितीत जोखीम असते. मराठी चित्रपट उद्योगात तुम्हाला चांगले विषय मिळतात पण त्यासाठी कोणालाही निधी द्यायचा नसतो, असेही ते म्हणाले.
चांगली प्रसिद्धी केली नाही तर हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृहही उत्सूक नसतात. त्यामुळे कमी खर्चात उत्तम चित्रपट बनवण्यासाठी आम्हाला आधी कष्ट करावे लागतात, असेही ते म्हणाले.
भोंगा चित्रपटाचे निर्माते अरुण हिरामण महाजन आणि कलाकार श्रीपाद जोशी तसेच कपिल कांबळे यावेळी उपस्थित होते.
भोंगा(ध्वनीक्षेपक) चित्रपटाची पार्श्वभूमी
ध्वनीक्षेपकावरून आझानची घोषणा होत असताना एका गावातील नऊ महिन्याचा मुलगा झोपत नाही आणि सारखा रडत राहतो आणि ध्वनी क्षेपकाच्या आवाजामुळे त्याला त्रास होत असल्याचे त्याच्या कुटुंबाच्या लक्षात येते.
ध्वनीक्षेपकाचा आवाज बंद करावा अथवा तो दुसरीकडे हलवावा, अशी या कुटुंबियांची विनंती मान्य होत नाही. एके दिवशी या मुलाचा मृत्यू होतो आणि संपूर्ण गावाला धक्काच बसतो.
त्याचे वडील बांग देणाऱ्याला दोषी धरतात आणि मुलाच्या अंत्यसंस्कारापासून दूर राहावे, असेही सुनावतात. या सर्वांमुळे दु:खी झाल्यानंतर आता बांग देणारा ध्वनीक्षेपकाशिवाय बांग देतो.