आंबेगावातील गावांना दरडी कोसळण्याचा धोका
डिंभे – धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज असून, पुनर्वसित गावठाणांसाठी जमिनी संपादित करणे हे एक सरकारी यंत्रणेपुढील मोठे आव्हान असल्याचे आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी सांगितले.
भगतवाडी येथील 13 कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार असून, येथेही योग्य जागा मिळण्याचा प्रश्न आहे. जांभोरीची काळवाडी येथे अनेक घरांना तडे गेले असून, काही घरांच्या भिंती कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. येथील नं.1 मधील 34 घरे व नं. 2मधील 17 अशा एकूण 51 घरांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याचे ठरविण्यात आले आहे. जांभोरी ‘काळवाडी 1’ व बेढारवाडी या गावातील ग्रामस्थ, सरपंच यांच्याशी भेट घेऊन येथील कावजी देवजी पारधी, सोमा देवजी पारधी यांची 429 गट क्रमांकातील 60 हेक्टर जमीन शपथपत्र केले आहे.
तसेच सखाराम भेंडारी, विजय भेंडारी इत्तर 14 अशाप्रमाणे बेंढारवाडी यासाठी तसेच पसारवाडी येथील 27 घरांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. येथे जागा उपलब्ध असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. आसाणे हे गावही अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे. गावाच्या वरील बाजूस असणारे दगड व डोंगरामुळे हे गाव धोकादायक झाले आहे.
गावात जवळपास 100 ते 125 घरे आहेत. ग्रामपंचायतीला नोंदी असणाऱ्या प्रत्यक्षात किती मिळकती आहेत, याचा आढावा घेऊन वस्तूनिष्ठ माहितीसह पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर करण्याचे ठरविण्यात आले आहे. बेंढारवाडी गावाच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी उपलब्ध केलेल्या जागेची प्राथमिक मोजणी केली आहे; परंतु ही जागा पुनर्वसनासाठी कमी पडत आहे.
धोकादायक गावची लोकसंख्या, घरांच्या नोंदी, हॉटेल्स, शाळा, दवाखाने तसेच आपत्तीजन्य विभागाचे नकाशे आदींचा समावेश करून तालुका प्रशासनाला कळवावे. यामध्ये प्रशासन आणि ग्रामस्य यांच्यामध्ये समनवय असणे गरजेचा आहे.
आंबेगाव तालुक्यात असलेल्या असंवेदनशील गावांची तात्काळ पाहाणी करूण लवकरात लवकर यांचे पुनर्वसन कसे करता येईल, यासाठी सरपंच, ग्रामस्थ व शासकीय यंत्रणांना योग्य सूचना देऊन लवकरात लवकर अहवाल सादर करून योग्य ती कार्यवाही करू.
-संजय नागटिळक, तहसीलदार आंबेगाव
यामुळे होतोय पुनर्वसनाला विलंब
तात्पुरते पुनवर्सन नको, तर कायमस्वरूपी पुनवर्सन करा अशी या धोकादायक पाच गावांतील ग्रामस्थांची मागणी आहे. यामध्ये पोखरी, बेंढारवाडी, जांभोरी, काळवाडी, माळीण, पसारवाडी या गावांचा समावेश आहे; मात्र शासनाने जमिनीची खरेदी जमीन मालकांना द्यावयाचा मोबदला, गावचा आराखडा, घरकुलांची मंजुरी यासाठी यंत्रणेचा पाठपुरावा कमी पडत असल्याने पुनर्वसनात विलंब होत आहे.
भूस्सखलनाचा अहवाल 2015 लाच प्रशासनाकडे
माळीण दुर्घटना ज्यावेळी झाली त्याच वेळेस राज्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी भूजल सर्वेक्षण विभाग यंत्रणा सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणे यांनी धोकादायक गावांची पाहणी करून 23 गावे धोकादायक तसेच त्याचे पुनवर्सन होणे गरजेचे आहे. याचा अहवाल 2015 सालीच पुणे जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आला आहे.
डोंगरपायथ्याशी राहणाऱ्यांच्या काळजात भरतेय धडकी
डिंभे – थकलेल्या डोंगराचा “भार नाही पेलवला कुशीतला गावे त्याच्या अंगाखाली चिरडला.
आंबेगाव तालुकयाच्या पश्चिम पट्ट्यात पडत असणाऱ्या संततधार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील डोगर दऱ्यांच्या कुशीत जीव मुठीत घेऊन आज आदिवासी बांधव राहत असताना आज या आदिवासी जनतेला काळजात धडकी बसेल, अशा माळीण गावची आठवण येते.
माळीण दुर्घटनेत 44 कुटुंबे व त्यातील 151 लोक दगावले. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत या शासकीय इमारती, तसेच 16 घरे व त्यातील लोक नशिबाने वाचले; मात्र त्यांची घरे बाधित झाली.
आज झालेल्या रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गेले. 22 जुलै रोजी तळाये गावावर दरड कोसळून 87 जणांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे सह्याद्री पर्वतरांगात वसलेल्या धोकादायक गावांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र या घटनेला निसर्गाचा कोप मानले जाते; मात्र मानवाने केलेल्या विकृतीला निसर्गालाच जबाबदार धरले जाते. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. डेव्हलपमेन्टच्या नावाखाली सह्याद्रीचे लचके तोडले जातात. खाणी, हॉटेल, ढाबे यामुळे डोंगर पर्वतांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यामुळे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक गावांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.