सातारा – जिल्हा परिषदेच्या एकूण 21 संवर्गातील 972 पदांसाठी 74 हजार 578 अर्ज प्राप्त झाले आहेत. आरोग्य सेवक (पुरुष) 40 टक्के, आरोग्य सेवक (पुरुष) 50 टक्के व आरोग्य सेवक (महिला) पदासाठी 32 हजार 230 तर कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी 13 हजार 550 उच्चांकी अर्ज आले आहेत. आता इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे वेध असून अद्याप परीक्षेची तारीख निश्चित झालेली नाही.
जिल्हा परिषदेच्या 21 संवर्गातील 972 जागांसाठी राबवण्यात येणारी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. गैरव्यवहार टाळण्यासाठी आयबीपीएस या खासगी कंपनीकडे भरतीची जबाबदारी शासनाने दिली आहे. जिल्हा परिषदेतील विविध पदांची भरती प्रक्रिया 2019 पासून रखडली होती. ऑनलाइन पध्दतीने अर्ज नोंदणी दि. 5 ऑगस्टपासून सुरु झाली. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 25 ऑगस्ट होती. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेत भरती प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला होता.
अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत आरोग्य पर्यवेक्षक एका जागेसाठी 11 अर्ज, आरोग्य सेवक (पुरुष) 40 टक्के 76 जागांसाठी 20 हजार 865, आरोग्य सेवक (पुरुष) 50 टक्के (हंगामी फवारणी कर्मचारी) 170 जागांसाठी 9 हजार 447, आरोग्य सेवक (महिला) 353 जागांसाठी एक हजार 918, औषध निर्माण अधिकारी 35 जागांसाठी 4 हजार 991, कंत्राटी ग्रामसेवक 101 जागांसाठी 13 हजार 550, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ग्रामीण पाणी पुरवठा) 32 जागांसाठी 2 हजार 627, कनिष्ठ अभियंता (विद्युत) 1 जागेसाठी 384, कनिष्ठ आरेखक 2 जागांसाठी 12 अर्ज, कनिष्ठ लेखाधिकारी 4 जागांसाठी 133, कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन) 69 जागांसाठी 9 हजार 345 अर्ज, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 7 जागांसाठी 1 हजार 133, पर्यवेक्षिका 3 जागांसाठी 407 अर्ज, पशुधन पर्यवेक्षक 42 जागांसाठी 916 अर्ज,
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 4 जागांसाठी 1 हजार 75 अर्ज, वरिष्ठ सहाय्यक (प्रशासन) 2 जागांसाठी 683, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) 10 जागांसाठी 863, विस्तार अधिकारी (कृषी) 1 जागेसाठी 111, विस्तार अधिकारी (शिक्षण) 2 जागांसाठी 125 अर्ज, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 5 जागांसाठी 1 हजार 960 अर्ज, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 52 जागांसाठी 3 हजार 822 अर्ज अशा 972 पदांसाठी 74 हजार 578 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले आहेत.
एका जागेसाठी असणार 77 इच्छुक
जिल्हा परिषदेच्या सरासरी एका जागेसाठी 77 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. बऱ्याच कालखंडानंतर भरती प्रक्रिया होत असल्याने अर्जांची संख्या वाढली आहे. या भरतीसाठी लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा नसून सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने ही भरती प्रक्रिया पारदर्शक होणार आहे.