मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय संकट जसजसे गडद होत चालले आहे, तसतशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढत आहे. बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होत असल्याचे पाहून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. रश्मी ठाकरे आता बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधून त्यांचे मन वळवणार असल्याच्या चर्चा आहेत. तर अशातच दुसरीकडे मुंबईच्या महापौर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासंदर्बात एक मोठा दावा केला होता.
तर आज माध्यमांशी बोलतांना बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी या चर्चांवर खुलासा केला आहे. होय, रश्मी वहिनींचा मला फोन आला होता. तुम्ही बंड का केलं? असं रश्मी ठाकरे म्हणाल्या असेही मानसी दळवी यांनी सांगितले आहे.
वृत्त वाहिनीच्या पत्रकरांशी बोलतांना मानसी दळवी म्हणाल्या,’होय रश्मी वहिनींचा मला फोन आला होता. तुम्ही बंड का केलं? असं रश्मी ठाकरे म्हणाल्या. पण त्यांना उत्तर देताना मी म्हणाले की, तुमच्या म्हणण्यानुसार ही बंडखोरी आहे. पण एका आमदाराची पत्नी म्हणून मी सांगेन की, त्यांनी जो निर्णय घेतला आहे, तो योग्य आहे. त्याचं मी आणि आमचं कुटुंब समर्थन करतो,’
दळवी पुढे म्हणाल्या,’आम्ही कालही कट्टर शिवसैनिक होतो. आजही आहोत आणि भविष्यातही शिवसैनिक राहणार. आमचं म्हणणं मातोश्रीवर ऐकण्यात आलं नाही. पण त्याचवेळी एकनाथ शिंदे आमच्यासाठी देवदूतासारखे धावून आले. आम्हाला आमदार निधी मिळवून दिला. त्यामुळे लोकांची कामं करता आली. त्यामुळे आम्ही शिंदे यांच्या पाठिशी आहोत’ असंही दळवी म्हणाल्या.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सतत राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसहित आसाम मधील गुवाहाटी येथे आहेत. मात्र आज पहिल्यांदाच ते रॅडिसन हॉटेलच्या बाहेर आलेले दिसले. यावेळी मुंबईत लवकरच येणार असल्याचे त्यांनी म्हंटले.