वाघोली (पुणे) – रयत शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर कार्यरत राहणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल यांनी दिली.
हवेली तालुक्याच्या युवक अध्यक्षपदी नीलेश वारघडे, हवेली तालुका युवक सचिवपदी संदीप साठे, तर हवेली तालुका विभाग प्रमुखपदी अष्टापूरचे सुमित कोतवाल यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल व उपजिल्हाध्यक्ष सुशील शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी अष्टापूरचे पोलीस पाटील कैलास कोतवाल, संघटनेचे युवक अध्यक्ष संदीप सातकर, अनिल कोतवाल, देविदास भोरडे, संदीप भोरडे नितीन इंगळे भवरापूरचे सरपंच सचिन सातव, दादा कोतवाल, विलास साठे आदी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात रयत शेतकरी संघटना पोहोचू व शेतकरी वर्गाला येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू तसेच शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडू, असे मत रामदास कोतवाल यांनी व्यक्त केले.