– वंदना बर्वे
काँग्रेसने राहुल गांधी यांना रायबरेलीमधून उतरविल्यानंतर भाजप थोडा का होईना पण नक्कीच गोंधळला असेल! कारण ‘रायबरेली’मागे काँग्रेसने काही डावपेच आखले आहेत.
काँग्रेसने राहुल गांधी यांना रायबरेलीमधून उतरवून आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांना उमेदवारी न देऊन मुत्सद्दीपणाचा मोठा डाव खेळला असंच म्हणावं लागेल. काँग्रेस राहुल गांधी यांना अमेठीतून आणि प्रियंका गांधी यांना रायबरेलीतून किंवा मतदारसंघ बदलून बहीण-भावाला निवडणुकीच्या मैदानात उतरवेल, असे भाजपला वाटत होते. किंबहुना, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची उमेदवारी जाहीर होण्याची प्रतिक्षा जेवढी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नसेल त्यापेक्षा जास्त भाजपच्या नेत्यांना होती. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यापुढे राहुल गांधी यांचा निभाव लागणार नाही आणि प्रियंका गांधी यांना रायबरेलीतून कसं पराभूत करायचं? याची इत्थंभूत योजना भाजपने आखून ठेवली होती.
परंतु, ऐनवेळी काँग्रेसने गुगली टाकली. राहुल गांधी यांना रायबरेलीमधून तिकीट दिले आणि प्रियंका गांधी यांना वेटिंगवर ठेवलं. तसं बघितलं तर, अमेठी आणि रायबरेलीतील उमेदवारांची नावे शेवटपर्यंत जाहीर न करून काँग्रेसनं भाजपची अस्वस्थता वाढविण्याचं कामही केलं, असं म्हणावं लागेल. राहुल गांधी यांनी पराभव डोळ्यापुढे दिसत असल्यामुळे अमेठीतून पळ काढला, असा टोमणा स्मृती इराणी यांनी मारला होता. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ‘डरो मत, भागो मत’ असा टोमणा मारला. काँग्रेसच्या या निर्णयामुळे भाजपला राहुल गांधी यांचा समाचार घेण्याची संधी मिळाली असली तरी ही संधी प्रचारापुरती मर्यादित असून त्याचा रायबरेलीच्या निकालावर फारसा परिणाम होण्याची शक्यता तशी कमीच आहे.
उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या आजोबा आणि आजीचा वारसा सांभाळण्याची क्षमता आपल्यात असल्याचे सिद्ध केले आहे. रायबरेलीची जागा ही गांधी घराण्याची आवडती जागा मानली जाते कारण राहुल यांचे आजोबा फिरोज गांधी निवडणूक लढवत असत. त्यांच्यानंतर राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधीही या जागेवरून निवडणूक लढवत लोकसभेवर जात होत्या. यानंतर राहुल यांच्या आई सोनिया गांधी यांनीही हा वारसा पुढे नेला आणि 2004 ते 2019 पर्यंत त्या या जागेवरून लोकसभेत पोहोचल्या.
या जागेसाठी भाजपने शेवटच्या क्षणी दिनेश सिंह यांना उमेदवारी दिली आहे. 2019 मध्ये त्यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि दोन लाखांहून अधिक मतांनी त्यांचा पराभव झाला होता. मात्र, राजकारणात कोणताही मतदारसंघ मालकीचा नसतो. उत्तर प्रदेशातील फूलपूर ही जागा काँग्रेसच्या वारशाची सर्वात मोठी जागा मानली जायची. येथूनच पं. जवाहरलाल नेहरू आयुष्यभर निवडणूक जिंकत राहिले. हाच त्यांचा मतदारसंघ होता. 1964 मध्ये पं. नेहरूंच्या निधनानंतर त्यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित यांनी 1967 मध्ये फूलपरमधून निवडणूक लढवली पण नंतर त्यांनी ही जागा सोडली. यानंतर इतर पक्षांचे लोकही या जागेवरून विजयी होत राहिले.
अमेठीमधून स्मृती इराणी मैदानात आहेत. काँग्रेसने येथून किशोरीलाल शर्मा यांना तिकीट दिलं आहे. स्मृती इराणी यांनी 2014 पासून अमेठीत आपले पाय रोवायला सुरुवात केली होती आणि आता त्यांचा इथे चांगला प्रभाव निर्माण झाला आहे. अशात, काँग्रेसनं राहुल गांधी यांना अमेठीऐवजी रायबरेलीमधून तिकीट देऊन गांधी कुटुंबाची येथील जनतेशी नाळ जुळवून ठेवण्याची व्यवस्था केली आहे.
खरं सांगायचं झालं तर, काँग्रेससाठी रायबरेलीची जागा अमेठीपेक्षा नेहमीच जास्त सुरक्षित राहिली आहे. सोनिया गांधी यांनी अलीकडेच राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर रायबरेलीवासीयांना एक भावनिक पत्र लिहिलं होतं.
आता, रायबरेलीत त्यांचा वारसा कोण सांभाळणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. मुलगा राहुल गांधी किंवा मुलगी प्रियांका गांधी? या दोघांपैकी एक जण नक्कीच वारसा सांभाळणार हे लोकांना माहिती आहे. पण कोण? हा प्रश्न निरूत्तरीतच होता. आता या प्रश्नाला विराम मिळाला आहे. संजय गांधी यांनी 1977 मध्ये अमेठीतून पहिली निवडणूक लढवली होती. तर इंदिरा गांधी रायबरेलीमधून उमेदवार होत्या. जनता पक्षाच्या लाटेत दोघांचाही पराभव झाला. परंतु 1980 मध्ये दोघांनीही पुन्हा आपली जागा लढवली. या दोघांचेही जनतेने स्वागत केले. दोघांनाही विजय मिळाला.
1980 मध्ये संजय गांधी यांचे निधन झाल्यानंतर या जागेसाठी मुलगा राजीव गांधी आणि सून मनेका गांधी असे दोन पर्याय त्यांच्यापुढे होते. इंदिरा गांधी यांनी राजीव गांधी यांची निवड केली. 1984 च्या निवडणुकीत मनेका गांधी यांनी बंडखोरी केली आणि राजीव गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र, मनेका गांधी यांना पराभवाचे तोंड बघावे लागले. 1991 मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. या हत्येच्या आठ वर्षांनंतर 1999 मध्ये सोनिया गांधी यांचे राजकारणात पदार्पण झाले. 2004 मध्ये सोनिया गांधी यांनी अमेठीचा मतदारसंघ राहुल गांधी यांच्या हाती सोपविला आणि स्वतः रायबरेलीमधून लढल्या.
प्रियंका गांधी यांना निवडणुकीच्या मैदानात न उतरविण्याच्या निर्णयामागे काँग्रेसची दूरदृष्टी आहे. त्यांनी निवडणूक लढविली असती तर त्यांना आपल्या मतदारसंघात अडकून रहावे लागले असते. आता त्या अमेठी आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघात वेळ देऊ शकतात आणि राहुल गांधी देशभर पक्षाचा प्रचार करू शकतात. तर अमेठीतून निवडणूक लढविणारे किशोरीलाल शर्मा कार्यकर्त्यांसाठी नवीन नाहीत. ते सोनिया गांधी यांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. असे असले तरी ते जनतेशी थेट जुळले नव्हते.
राहुल गांधी यांना रायबरेलीमधून उतरवून काँग्रेसने भाजपला धक्का दिला असला तरी भाजपाने अमेठीमधून जसा पराभव केला होता तसाच पराभव रायबरेलीमधूनही करण्याचा डाव आखला आहे. आता रायबरेली आणि अमेठी या दोन्ही जागा कुणाच्या हातात जातात याकडे अख्खा देशाचे लक्ष असणार.