मुंबई – विराट कोहलीचे संघातील काही खेळाडूंशी वर्तन अत्यंत वाइट असते. त्याच्या लेखी अन्य खेळाडूंबाबत आदरभाव नाही. त्याच्या याच वर्तनामुळे संघातील एका वरिष्ठ खेळाडूने बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याकडे तक्रार केल्याचे सांगितले जात होते.
आता हा खेळाडू रविचंद्रन अश्विनच असल्याची माहिती समोर येत आहे. अश्विनचे नाव बीसीसीआयच्या सदस्याने थेट घेतले नसले तरीही तो खेळाडू अश्विनच असल्याचे संकेत मिळाले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीने संघातील अनेक सहकारी खेळाडूंचा अनेकदा अपमान केला आहे. तो काही ठरावीक खेळाडू वगळता अन्य खेळाडूंशी सभ्यपणे बोलतही नव्हता.
या कसोटी मालिकेतील चारही कसोटीत अश्विनला संघात स्थान देण्यात आले नव्हते. जेव्हा तिसरी कसोटी पार पडली त्याचवेळी अश्विनच्या संघातील समावेशाबाबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूतोवाच केले होते. त्याला चौथ्या कसोटीत संघात खेळवले जाईल, असे संकेत त्यांनी दिले होते. मात्र, सामन्याच्या आधी झालेल्या नाणेफेकीपूर्वी कोहलीने जाहीर केलेल्या संघात अश्विनचा समावेश नव्हता. त्यावेळी अश्विनसह संघातील अन्य अनुभवी व वरिष्ठ खेळाडूंच्या मनात कोहलीबाबत तेढ वाढत होती. त्यामुळेच अश्विनने कोहलीची तक्रार थेट शहा यांच्याकडे केली.
मुळातच कोहलीच्या नेतृत्वाबाबत निवड समितीच्या सदस्यांमध्येही नाराजीच होती. संघ निवडीदरम्यान त्याचे निवड समितीच्या सदस्यांशी अनेकदा खटकेही उडाले होते. त्यातच कोहलीला आयसीसीच्या एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नसल्याने निवड समितीलाही तो मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी कर्णधार म्हणून नको होता. त्याची संघाच्या कर्णधारपदावरूनच नव्हे तर संघातूनच गच्छंती होण्याची शक्यताही निर्माण झाली होती. याचीच कुणकुण शास्त्री यांना लागल्यामुळेच त्यांनी कोहलीला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा सल्ला दिला होता.
अखेर अश्विनचा संयम सुटला
त्यातच भर म्हणून इंग्लंड दौऱ्यात अश्विनला एकाही कसोटीत खेळवले गेले नव्हते, त्यामुळे त्याच्या संघ निवडीवरही निवड समिती नाराज होती. त्यातच कोहलीबाबत अश्विनसह संघातील अन्य वरिष्ठ खेळाडूंच्या मनात नाराजी होती. मात्र, कोहलीविरुद्ध भूमिका घेण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. अखेर अश्विनचा संयम सुटला व त्याने थेट शहा यांच्याकडे आपले मत व्यक्त केले, असे सांगण्यात येत आहे.