बुलढाणा – राज्यासह देशातील कोट्यवधी कुटुंबांना रेशनिंग व्यवस्थेचा मोठा आधार आहे. असे असतानाच देशातील रेशन व्यवस्था कायमची बंद करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे. यावेळी त्यांनी देशातील 80 कोटी जनता ऐतखाऊ असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
बुलढाण्यात रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते. सदाभाऊ खोत म्हणाले, राज्यात 40 टक्के समाज फक्त शेतीवर आहे आणि देशातील 80 कोटी माणसे आयते खात आहेत. त्यामुळे देशातील रेशन व्यवस्था बंद करून देश बलशाली बनवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आपल्या देशातील ऐतखाऊ लोकांची संख्या वाढली असून देशातील 80 कोटी माणसे आयते खात आहेत. जर इतकी माणसे आयते खात असतील तर, हा देश भिकाऱ्यांचा आहे. माणसे भिकारी बनवण्याचे काम सुरू आहे. राजकीय पक्षांची चढाओढ लागली आहे. हे फुकट ते फुकट, त्यामुळे देश भिकाऱ्यांचा बनत चालला आहे. प्रत्येकाने श्रम करावे, श्रमावरच देश बलशाली होईल, असे विधानही त्यांनी केले.