नागपूर – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आधी महायुतीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 26 जागांवर तर शिंदे आणि अजित पवार गट 22 जागांवर लढणार होती.
या फॉर्म्युल्याची बातमी आल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे फडणवीस यांनी लगेच पलटी मारली आहे. आता फडणवीस यांनी असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागपूर येथे ते मीडियाशी संवाद साधत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभा जागा वाटपाबाबत चर्चा अजून व्हायच्या आहेत. फॉर्म्युला चर्चेनंतरच ठरेल. जो पक्ष ज्या सीट लढला आहे, त्या सीट त्याच्याकडे जाव्यात हा जागा वाटपाचा आधार असेल.
पण जागा वाटपाचा हा आधार असला तरी याचा अर्थ ते स्टॅटिक आहे का? तर तसे नाही. त्यात आवश्यक ते बदलही आम्ही आपापसात बसून करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
अवकाळीचा अहवाल मागितला –
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अवकाळी पावसासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेतय. कुठे किती नुकसान झालं याचा प्राथमिक अहवाल पाठवण्याचा सूचना दिल्या आहेत.
निश्चितपणे राज्य सरकारची भूमिका कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा मदत करण्याचीच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी रब्बी पीक वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत. पण जिथे नुकसान होईल त्या ठिकाणी सरकार नक्कीच मदत करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.