मुंबई – फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी रश्मी शुक्ला यांची अखेर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती याआधीच म्हणजेच 30 डिसेंबर रोजी समोर आली होती. परंतु, याबाबतचा अधिकृत शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी ही रजनीश शेठ यांच्याकडे होती. मात्र, ते 31 डिसेंबरला सेवानिवृत्त झाले आहेत. पण निवृत्त होताच शेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष करण्यात आले. ज्यानंतर या पोलीस दलाची संपूर्ण जबाबदारी आता पहिल्यांदा एका महिलेकडे देण्यात आली आहे.
या शासन निर्णयानंतर IPS अधिकारी रश्मी शुक्ला या राज्यातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत रश्मी शुक्लांना महासंचालक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रश्मी शुक्लांची 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने चौकशी सुरू केली होती. एकनाथ खडसे, संजय राऊत, नाना पटोले, आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत देखील केली होती. त्या दरम्यानच्या काळात रश्मी शुक्ला या प्रतिनियुक्तीवर CRPF मध्ये रुजू झाल्या होत्या.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर फोन टॅपिंगच्या प्रकरणातील त्यांच्या विरोधातील चौकशी बंद झाली होती. मुंबई हायकोर्टाने रश्मी शुक्लांच्या विरोधातील फोन टॅपिंग प्रकरणातील याचिका फेटाळून लावल्या होत्या. राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती. ज्यानंतर या प्रकरणात सीबीआयने केलेल्या चौकशीत काहीही आढळून न आल्याने त्यांना महायुतीचे सरकार येताच क्लीन चीट देण्यात आली होती.