मुंबई – राखी बांधणाऱ्या रश्मी शुक्लांना फडणवीसांकडून बढतीची ओवाळणी मिळाली असून आता अधिकृतपणे फोन टॅप होतील, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे.
राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप प्रकरणी त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यांची आज झालेल्या नियुक्तीने पुन्हा चर्चांना उधाण आहे. त्यावर खडसे यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे.
खडसे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांना बढती होईल हे माहिती होते. त्यांनी माझा फोन टॅप केला होता. आपल्या सरकारमध्ये आपले ऐकणारे अधिकारीही हवे आहेत. आता पोस्टिंग मिळाली. पूर्वी अनधिकृतपणे आता अधिकृतपणे टॅप होतील, अशी टीका खडसे यांनी केली.
तसेच, राज्याला पहिल्या पोलीस महासंचालक मिळाल्या आहेत. त्यामुळे आता महिला सुरक्षेवर लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा असल्याचे खडसे यांनी म्हटले. राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, राज्यात महिला सुरक्षित नाहीत, असेही त्यांनी म्हटले.