मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यच लक्ष लागून असलेल्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. तत्पूर्वी राज्यभरातील राजकारणात वेगवान हालचाली घडताना दिसत आहेत. अशात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतल्याचे समजते.
विशेष म्हणजे काल रात्री उशिरा मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, शिंदे, फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांच्यात बैठक पार पडली होती. त्यानंतर पुन्हा रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्या आहेत.
आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. आमदार अपात्रतेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात जोरदार हालचाली सुरु आहेत. ठाकरे गटाच्या सर्व वकिलांची आज झूम कॉल मीटिंग झालीय.
वकील अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल हे देखील या बैठकीत उपस्थित होते.
निकालाबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणतात
की शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाने दिली. धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला दिलं आहे. बहुमताच्या जोरावर विधानसभेत ६७ टक्के बहुमत आमच्याकडे आहे तर लोकसभेत ७५ टक्के बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिली आहे.