Rahul Gandhi – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) पुन्हा एकदा आपली यात्रा सुरू करणार असून त्यांची यात्रा १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. मात्र आता या यात्रेचे नाव बदलून “भारत जोडो न्याय यात्रा’ (Bharat Jodo Nyaya Yatra) असे करण्यात आले असल्याची माहिती कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी दिली आहे. अगोदर केवळ भारत न्याय यात्रा असे नामकरण करण्यात आले होते.
मणिपूरची राजधानी इम्फाळ येथून १४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता यात्रेला सुरूवात होईल. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार असून यात्रेत राहुल गांधी हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या विषयावर जनतेसमोर आपली भूमिका मांडणार आहेत.
६७०० किमी एवढा मोठा यात्रेचा मार्ग असणार आहे आणि पंधरा राज्यातून यात्रा मार्गक्रमण करणार आहे. बसने आणि पायी असा दोन्ही पध्दतीने राहुल प्रवास करतील आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांनाही यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले जाणार आहे. देशाच्या ११० जिल्ह्यांतून यात्रा जाईल आणि लोकसभेचे १०० मतदारसंघ त्यात कव्हर केले जाणार आहेत.
दरम्यान, याच यात्रेच्या संदर्भात खर्गे आणि राहुल गांधी यांची बैठक झाली असून त्यात कॉंग्रेसचे विविध राज्यांचे अध्यक्षही सहभागी झाले होते. यापूर्वी राहुल यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ४ हजार किमीची यात्रा काढण्यात आली होती व त्यामुळे देशातील वातावरण पूर्ण बदलले होते. ही यात्रा मैलाचा दगड ठरली होती असा दावा जयराम रमेश यांनी केला. आता मणिपूर येथून सुरू होणाऱ्या यात्रेचा मुंबईत समारोप होणार आहे.