मावळातील दऱ्याखोऱ्यात बहर; मेव्याची लज्जत न्यारी
लोणावळा – डोंगरची काळी मैना म्हणून ओळख असलेल्या करवंदांसह रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जांभूळ, आवळा, आळू, जाम, रायवळ आंबा यांसारख्या रान फळांना सध्या मावळच्या दऱ्या खोऱ्यात चांगलाच बहर आलेला आहे. डोंगरदऱ्यामध्ये रानमेव्याच्या पक्वान्नांची ताटे भरू लागली आहेत.
रानमेवा म्हणजे करवंदे, जांभूळ, आंबा, फणस, आवळा, कोकम ही होत. याचबरोबर दरवर्षी तोरणं, जाम, आमगुळे, आळू हा रानमेवा देखील बहरतो. गुढीपाडव्याला करवंदे, जांभूळ, आंबा या फळांना “पाड’ आलेला असतो. आणि साधारणपणे अक्षयतृतीयेला ती फळे पूर्ण पक्व होऊन चाखावयास मिळतात. त्यावरूनच मावळ खोऱ्यात एक म्हणं रूढ आहे, “पाडव्याला पाड आणि अखितीला (अक्षय तृतीया) गोड’.
चैत्र आणि वैशाखाच्या महिन्यात डोक्यावरील रणरणते उन्ह आणि काटेरी पायवाटेची पर्वा न करता सह्याद्रीच्या डोंगरदरीत पायपीट करून स्वतःच्या हाताने हा रानमेवा खुडून स्वाहा करणं म्हणजे. कोणीतरी म्हटलंच आहे की चैत्रात सह्याद्रीत केवळ फेरफटका मारायचा अवकाश. हा फेरफटका म्हणजे खायची नुसती चंगळ. मावळ तालुक्यात आणि विशेषतः लोणावळा परिसर नजरेस पडणाऱ्या जवळपास प्रत्येक डोंगरावर आणि जंगलात हा रानमेवा आढळून येतो. मे महिन्याचा पहिला पंधरवडा संपला असून, दुसरा पंधरवडा सुरू झाला आहे. त्यामुळे सध्या आमगुळे आणि तोरणं ही जंगलातून जवळजवळ दिसेनाशी झाली आहे. मात्र करवंद, जांभळं खाण्यास तयार आहेत. सध्या जंगलात त्यांची चांगलीच भरमार आहे. फणस, आळू ही दोन फळे तयार होण्यास अजून थोडा अवकाश आहे. या उपलब्ध रानमेव्याची चव चाखण्यासाठी अस्सल जाणकार मंडळी येथील जंगलात तसेच डोंगरावर किमान एकतरी फेरफटका मारून येत आहेत.
आपल्यालाही हा रानमेवा चाखण्याची जर खरंच मनापासून इच्छा झाली असेल, तर लोणावळ्या जवळील राजमाचीचे जंगल यासाठी एक उत्तम “डेस्टिनेशन’ आहे. जर आपण या जंगलवाटा, डोंगरवाटा तुडवून या रानमेव्याची लज्जत घेण्यासाठी जाण्याचा विचार करीत असाल, तर या रानमेव्याबाबत काही माहिती गाठीशी ठेवणे निश्चितच उपयोगी ठरेल.