जोधपुर – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी पहिल्या दिवसअखेर यजमान राजस्थानने भक्कम स्थिती प्राप्त केली आहे. त्यांच्या कुकना अजय सिंगच्या गोलंदाजीसमोर महाराष्ट्राचा पहिला डाव ५५.५ षटकांत १८९ धावांवर गुंडाळला गेला तर राजस्थानने पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आपल्या पहिल्या डावात २६ षटकांत २ बाद ११० धावा केल्या आहेत. ते आता ७९ धावांनी पिछाडीवर आहेत.
– कुकना अजय सिंगचे ५ बळी
– महाराष्ट्र पहिला डाव सर्वबाद १८९
– राजस्थान पहिला डाव २ बाद ११०
त्यापूर्वी, राजस्थानचा कर्णधार दीपक हुडा याने नाणेफेक जिंकत महाराष्ट्राला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय सार्थ ठरवताना अजय सिंगने ५ तर अराफत खान याने ३ गडी बाद केले व महाराष्ट्राचा पहिला डाव १८९ धावांवर संपवला. महाराष्ट्राकडून निखिल नाईकने सर्वाधिक ४८ धावा केल्या. कर्णधार केदार जाधवने ४२ धावांचे योगदान दिले.
आशय पालकरने ३५ तर सलामीवीर पवन शहाने २९ धावांची खेळी केली. पहिल्या दोन्ही लढतींत अफलातून फलंदाजी केलेल्या महाराष्ट्राची या सामन्यात मात्र, घसरण झाली. राजस्थानच्या डावाची सुरुवातही निराशाजनकच झाली होती.
संघाच्या ३३ धावा झालेल्या असताना त्यांनी दोन्ही सलामीवीर गमावले होते. त्यानंतर मात्र, करण लांबाने कर्णधार हुडाच्या साथीत डाव सावरला व संघाचे शतक फलकावर लावले. खेळ थांबला तेव्हा लांबा ४५ तर हुडा ३६ धावांवर खेळत आहेत. महाराष्ट्राकडून हितेश वळुंजने २ बळी घेतले.